Tuesday, 19 November 2024

बौद्ध धम्म आणि मानवता



(करुणा बुद्ध विहार, मांडा टिटवाळा पूर्व येथे दिनांक १३ ऑक्टोबर,२०२४ रोजी सदर केलेल्या प्रवचनाचा भाग येथे मांडत आहे)


जे लोक श्रद्धाळू असतात ते आपसूकच धर्मावर श्रद्धा ठेवतात. परंतु जे लोक चिकित्सावादी असतात अशा व्यक्तींना डोळस व विज्ञानवादी, आचरण धम्म देण्याचे काम बुद्धांने केले आहे. म्हणून बुद्धांचा धम्म हा बुद्धीचा धम्म आहे. हा बुद्धीवादयांचा धम्म आहे असे म्हणतात. येथे येण्याची कुठली अट नाही. तुम्ही जर किमान समजू शकत असाल,विचार करण्याच्या प्रक्रियेला तयार असाल... तर बुद्ध म्हणतात *"एहि पस्सिको"* या.. पहा.. मानण्याची पूर्वअट नाही. अनुभवा.. आणि पटलं.. तर स्वीकारा.


जगभरातील धर्म हे व्यक्तीला धार्मिक घोषीत करण्यापूर्वी अथवा धर्मात प्रवेश देण्यापूर्वी त्या धर्मावर त्याची श्रद्धा असणे हे प्राथमिक मानतात. जुनी पुराणे, गाथा, अपौरुषी शास्त्र हे त्यासाठी प्रमाणभूत मानतात. 


बुद्धांचा धम्म हा कुठल्याही शास्त्रातून जन्मलेला नाही. तर तो बुद्धांच्या तत्वज्ञानातून, शिकवणुकीतून व अनुभवातून जन्मलेला आहे.बुद्धांचा धम्म हा प्रश्नोत्तरातून, विश्लेषणातून व मानवी नैतीक मूल्यांतून जन्मलेला विचार आहे. त्यामुळे बुद्धांचा आग्रह नाही की, मी सांगतो तेच बरोबर माना अथवा असा कुठलाही दावा ते करत नाहीत. त्याउप्पर ते काळानुरूप योग्य ते बदल स्वीकारण्यास तयार आहेत व तशी मुभा धम्मात देतात.


विचार करा तुम्ही जी श्रद्धा ठेवता. त्या श्रद्धाजर डोळस नसतील? स्व:अनुभवातून, विचारातून, चिंतनातून मंथनातून आलेल्या नसतील? तर अशा श्रद्धा व उपासना खऱ्या असतील काय? तुम्ही ज्या उपासना,पद्धती करता ते केवळ एक दिखावा ठरून पोकळ आचरण ठरणार नाही काय? आशा पोकळ विधीतुन मग अंधश्रद्धा निर्माण होणार नाही काय? म्हणून तथागत गौतम बुद्धांनी पहिल्यांदा सांगितलं की धर्माची/धम्माची /धार्मिक होण्याची पहिली पायरी ही श्रद्ध नसून स्वानुभव, स्वविचार स्वसंमती असली पाहिजे.

या जगात अनेक धर्म संस्थापकांनी मी देव आहे. मी देवाचा अवतार आहे. मी देवाचा पुत्र आहे. मी देवाचा संदेशवाहक आहे. अशा थापा मारलेल्या आहेत असे आपल्या निदर्शनास येते. परंतु बुद्धाने अशी कोणतीही वालग्ना केली नाही. त्यांनी मी मानव पुत्र आहे. मी कुणीही मोक्षदाता नसून मी केवळ मार्गदाता आहे असे सांगितले आहे. आणि हीच गोष्ट त्यांच्या धम्माल मानवीय बनवते.

ज्ञानप्राप्ती नंतरची त्याची साक्ष देणारी भूमीस्पर्शमुद्रा हे त्याचे उत्तम उदाहरण होय.


माणसाने माणसाशी कसे वागावे ही शिकवण बौद्ध धम्माचा केंद्रबिंदू होय.या जगात कुणी मोक्षवाद सांगितला,कुणी आत्मावाद, दैववाद, स्वर्गवाद, मनुवाद,जातीवाद असे निरनिराळे इसम व वाद सांगितले परंतु बुद्धाने आपल्या धम्मातून केवळ मानवतावाद सांगितला.

बुद्धांनी पाप,पुण्य,पुनर्जन्म, स्वर्ग,नरक, आत्मा परमात्मा यांना तिलांजली दिली. तुम्ही मागीलजन्मी काय होते, पुढील जन्मी काय होईल हे न सांगता. वर्तमान जन्मात तुम्ही दुःखमुक्त जीवन कसे जगू शकता हे मानवाला सांगितले. मृत्यू नंतर काय होईल त्यापेक्षा तुम्ही जिवंतपणी निर्वाण,निर्दोष जीवन कसे जगू शकता हे संगितले.


बुद्धांनी मानवाच्या कल्याणासाठी प्रथम अरीहंत झालेल्या ६० भिक्षूंना निरनिराळ्या दिशांना पाठवले. त्यांना पाठवितांना 

*बहुजन हिताय*

*बहुजन सुखाय*

असा मानवजातीच्या कल्याणाचा संदेश दिला.

त्यामुळे बुद्धाच तत्वज्ञान हे केवळ एक व्यक्तीच्या विकासाचे तत्वज्ञान नसुन संपूर्ण समाजाच्या   सामूहिक क्रांतीचे ते मानवतावादी तत्वज्ञान आहे.


समानता हे मानवतावादी मूल्य त्यांनी संघात देखील जोपासले. संघात सुनित नावाचे भंगीसमाजाचे भन्ते होते. न्हावी समाजाचे उपाली जे विनय पिटकाचे प्रमुख देखील होते. चर्मकार समाजाचे सोपान,आम्रपाली गणिका, किसा गौतमी अबला आणि दरोडेखोरी करणारा अंगुलीमान देखील होते.


बुद्धांच्या या मानवतावादी धम्माचे दोन भागात विभागणी करून पाहता येईल. एक जो शिकवणुकीचा भाग आहे. आणि दुसरा तत्वज्ञानाचा भाग आहे.

*शिकवणुकीत* आपण 

1. त्रिसरण (बुद्ध,धम्म,संघ)

2. चार आर्य सत्य

 (दुःख, कारण, समाप्तीचे सत्य, दुःख समाप्ती)

⁠3. पंचशील 

(हिंसा,चोरी,व्याभीचार,खोटे,मद्यपान  न करणे.)

4. अष्टशील

(विकाल आहार,करमणुकीच साधन,सुगंधीत द्रव्ये व इतर अलंकारांपासुन दुर राहण्याचे शील ग्रहण करणे .)

5. दसशील 

( उच्च आसन व स्वर्ण आलंकारापासून अलिप्त राहणे)


ह्या चारही प्रकारात शिलांची विभागणी वेगवेगळी केली आहे. गृहस्थ आणि गृहीणींकरीता पाच शील आहेत, उपासक आणि उपासिकेसाठी आठ शील तर श्रामणेर आणि श्रामणेरींकरींना दहा शिलांचे पालन करावे लागते.


6. आर्य अष्टांगिक मार्ग

(सम्यक दृष्टी,सम्यक संकल्प,सम्यक वाणी,सम्यक कर्मांत,सम्यक उपजीविका,सम्यक व्यायाम,सम्यक स्मृती,सम्यक समाधी)

7. दस पारमिता 

(दान', 'शील', 'नैष्कर्म्य', 'प्रज्ञा', 'वीर्य', 'क्षान्ति', 'सत्य', 'अधिष्ठान', 'मैत्री' व 'उपेक्षा' ya या परमीताचा समावेश होतो.)


तर तत्वज्ञानात आपण 

1. प्रतुत्यसमुत्पाद

2. अनात्मवाद

3. अनित्यवाद

4. पुनर्जन्म सिद्धांत

5. कर्म सिद्धांत


इत्यादीचा समावेश होतो. 


धम्म म्हणजे नीती,धम्म हा मानवी मनावर मानवतावादी विचार रुजवणारा संस्कार होय. आणि म्हणून धम्म म्हणजे मानवता अथवा मानवता म्हणजे धम्म असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


धन्यवाद!


संदर्भ: १. धम्मपद- ओशो 

२. बुध्धम्माचे सार- पी एल नरसू 

३. ⁠बुद्ध चरित्र- प्रा डी डी कोसंबी 

४. ⁠बुद्ध आणि त्यांचा धम्म-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

५. ⁠सर्वोत्तम भूमिपुत्र- अ ह साळुंखे 

चळवळ



जगभरात उपलब्ध धर्म, पक्ष,संघटना विचारसरणी,अथवा नेतृत्व याचे परफेक्ट मॉडेल जिवंत अथवा ऐतिहासिक देखील असू शकत नाही. ते कधीच असत नाही. तसे झाले असते तर निरनिराळ्या संघटना,धर्म,नेते इत्यादी उदयास व लयास कधी गेले/गेल्या नसत्या.

आपल्याला अपेक्षित नेता,धर्म,पक्ष,संघटना कशा असायला हव्यात. याचे आपले काही ठोकताळे असतात. ते ठोकताळे आपल्याला आलेले अनुभव, समस्या आणि आपल्या मर्यादित सामाजिक शैक्षणिक,भौगोलिक,ऐतिहासिक ज्ञान/ अज्ञान या सर्वाचे झालेले आकलन व त्याचा आपण लावलेला अन्वयार्थ या गोष्टीवर अवलंबून असतो . 

परंतु व्यक्तीचे अनुभव अथवा ज्ञान हे काही वैश्विक अथवा कालातीत असत नाही. त्याला अनेक आर्थिक,भौगोलिक,सामाजिक मर्यादा असतात. 

त्यामुळे वर्तमानातील उपलब्ध पर्यायांपैकी अधिक उचित / योग्य/ परफेक्ट पर्याय निवडणे अथवा निर्माण करणे. ही प्रक्रिया असते असे मला वाटते. 

ज्यांना-ज्यांना म्हणून परिवर्तन हवे आहे. त्यांना या प्रवाहात यावेच लागेल. प्रवाहाच्या बाहेर राहुन केवळ निरर्थक उपदेश अथवा टीका-टिप्पणी करता येईल. जे करणे सोपे ही आहे. नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तिरावर जाण्यासाठी पाण्यात उतरणे ही एकमेव अनिर्वार्यता असते. त्यामुळे ज्यांना परिवर्तन हवे त्यांना पाण्यात/ संघटनेत उतरावेच लागेल. व तो प्रवाह योग्य दिशेने न्यावा लागेल. 

संघटनेत उतरणाऱ्या व्यक्तीला त्याचा हेतू स्पष्ट असावा. तुम्ही चळवळीला देण्यासाठी आलात की घेण्यासाठी हे स्पष्ट असावे. असे जरी असले तरी चळवळीच्या नावाने भावनिक करून अनेकांना राबवून/ वापरून घेण्याचा प्रकार देखील होतो. त्यामुळे विद्यार्थीदशेत आपण विद्यार्जन करावे. आपला स्वाभिमान जपता येईल इतके अर्थार्जन करावे. कारण बौद्धिक व आर्थिक दुर्बल कार्यकर्ता चळवळ दुबळी करतो. ज्यांना लिहिता येईल त्यांनी लिहावे, बोलत येईल त्यांनी बोलावे, आर्थिक दान देता येईल त्यांनी ते करावे. परंतु कार्यकर्त्याने आपल्या क्षमता व मर्यादा ओळखून चळवळीत उतरावे.

लक्षात घ्या. चळवळ अथवा त्यातील नेते,पदाधिकारी हे काही परग्रहावरून येत नाहीत. त्यामुळे त्यांना राग,प्रेम,लोभ,मद, मोह,मत्सर असते. या सगळ्यांतून सगळेच यशस्वी होऊन बाहेर पडत नाहीत. त्यामुळे तुम्ही संकटातून सम्राट अशोकाच्या मार्गाने जाता,की बुद्धांच्या मार्गाने जाता, की बाबासाहेबांच्या मार्गाने जाता हे तुमच्या क्षमतेवर अवलंबून असते.

Sunday, 17 November 2024

कार्तिक पौर्णिमा- २०२४

 





प्रवचनात कार्तिक पोर्णिमेचे महत्व खालील प्रमाणे विषद करण्यात आले. 

१. काश्यप बंधूंची धम्मदीक्षा: बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात दुसऱ्या खंडातील तिसऱ्या भागात सदर प्रसंग वर्णिला आहे. वाराणसी नजीक निरंजना नदी काठी उरवेला आश्रमात हे काश्यप बंधू स्थीत होते. 

i .उरवेल काश्यप ii . नदी काश्यप  आणि iii . गया काश्यप अशी त्यांची नावे होत. ते अग्निपूजक व ब्राह्मण गोत्राचे होते. त्यांच्या डोक्यावरील खांद्यापर्यंत लांब केसांमुळे त्यांना जटील/ जटाधारी म्हणतअसत.परिसरात त्यांना प्रतिष्ठा होती. जवळपास १००० शिष्य त्यांचे होते.  त्यांनी कार्तिक पौर्णिमेला धम्मदीक्षा घेतली. वयाच्या १४५ व्या वर्षी कार्तिक पौर्णिमेला उरवेल काश्यप यांना निर्वाण प्राप्त झाले.

२. सारीपुत्त व महामोग्गलायन यांची धम्मदिक्षा : राजगृहात संजय वेलठी यांचे दोन शिष्य होते. उपतिष्य आणि कोलीत. इतरही २५० असे शिष्य होते. उपतिष्य आणि कोलीत यांच्या शंकांचे निरसन अद्याप झाले नव्हते. त्यांनी आपसात ठरवलेलं की ज्याला प्रथम सत्य सापडेल तो दुसऱ्याला सांगेल. राजगृहात बुद्धांचे शिष्य भदंत आनंद यांचे चालणे,बोलणे वागणे व विचार यातून हे दोन्ही शिष्य प्रभावीत झाले. त्यांचे गुरु कोण आहेत? त्यांची शिकवण काय आहे? मार्ग काय आहे? हे सगळे जाणून त्यांनी बुद्धाच्या संघात प्रवेश घेतला व सोबत २५० शिष्य ही आले. उपतिष्य व कोलीत यांचे अनुक्रमे सारीपुत्त व महामोग्गलायन असे नामकरण झाले.    

सारीपुत्त व महामोग्गलायन हे पुढे संघाचे सेनापती व बुद्धांच्या डाव्या व उजव्या भुजा बनले. राहुलचे धम्मगुरू हे सारीपुत्त होते. यावरून त्यांचे महत्व कळते.  इ.स. पूर्व ४८४ मध्ये कार्तिक पोर्णिमेला त्यांनी इच्छामरण स्वीकारले. बुद्धांच्या हयातीतच त्यांचे चैत्य स्तूप श्रावस्थी येथे निर्माण केले. त्यानंतर लगेच १५ दिवसांनी म्हणजे कार्तिक अमावस्येला जैन धर्म प्रचारकांनी (निकंठक) यांनी महामोग्गलायन यांची हत्या केली. 


३. मूलगंध कुटीर विहार

चक्रवर्ती सम्राट अशोकाने नालंदा तक्षशिला निर्माण केले. नालंदा आता भारतात तर तक्षशिला पाकिस्तानात आहे. श्रीलंकेचे पूज्य अनागरिक धम्मपाल यांनी भारतात येऊन तक्षशीलेतून बुद्धांचे अस्थिकलश आणून सारनाथ येथे आधुनिक मूलगंध कुटी विहार निर्माण केले. कार्तिक पौर्णिमेला या अस्थींचे पूजन व मिरवणूक होते.

संदर्भ:

१. बुद्ध धम्म में ऐतिहासिक पौर्णिमायेकां महत्त्व- भदंत आर धम्मीकुर थेरो पान क्रमांक ५१,५२

२. ⁠बुद्ध आणि त्यांचा धम्म ( खंड दोन भाग तीन) - डॉ. बाबासाहेब 

३. ⁠वर्षावास आणि बारा पोर्णिमा - डॉ. लता धनराज