Monday, 6 July 2026

विपश्यना

 


मी विपश्यना प्रकारावर लिहिण्याचे अनेकदा टाळले आहे. परिवर्तनवादी मित्र दुखावले जावु नयेत म्हणुन; परंतु गेल्या पंधरा दिवसांत पाली भाषा व साहित्य संबंधी प्रवचन ऐकताना मला काही मुलभूत प्रश्न पडले. ते प्रश्न आणि त्यातून निर्माण झालेले विचार मांडणे आवश्यक वाटले म्हणून हा लेखप्रपंच.


त्या शिबिरात अरहंत होण्यासाठी चमत्कार (जादू) दाखवणे ही कसोटी होती, असे उदाहरणासह सांगण्यात आले. बुद्धपूर्वी २८ (सम्यक) बुद्ध होऊन गेले आणि प्रत्येक जन्माचा दुसऱ्या जन्माशी संबंध होता, असेही सांगितले गेले. तसेच बुद्धत्वाच्या सोतापन्न → सकृदागामी → अनागामी अशा पायऱ्या असतात, असेही मांडण्यात आले. विपश्यना केल्याने "पॉझिटिव्ह एनर्जी" जाणवते, हाही एक मुद्दा सांगितला गेला.


या संदर्भात काही प्रश्न उपस्थित होतात.


१. अरहंत होण्यासाठी चमत्कार दाखवणे ही कसोटी होती, असे बाबासाहेबांनी कुठे म्हटल्याचे माझ्या निदर्शनास आले नाही. उलट बाबासाहेबांच्या मांडणीत बुद्धांचा धम्म विवेक, नैतिकता, समता आणि चिकित्सक दृष्टिकोनावर आधारित दिसतो.


२. २८ बुद्धांची संकल्पना ही पारंपरिक बौद्ध साहित्यात आढळते. (डी डी कोसंबी) परंतु बाबासाहेबांनी आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात या संकल्पनेला स्थान दिलेले दिसत नाही. पुनर्जन्माच्या बाबतीतही त्यांची मांडणी पारंपरिक बौद्ध व्याख्यांपेक्षा वेगळी आणि अधिक चिकित्सक स्वरूपाची वाटते.


३. सोतापन्न, सकृदागामी, अनागामी हे टप्पे पारंपरिक बौद्ध साहित्यात आहेत. मात्र बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात त्यांना स्थान दिलेले मला आढळले नाही.


४. पॉझिटिव्ह एनर्जी या संकल्पनेबद्दल मला स्वतःला कोणताही अनुभव नसल्यामुळे त्याबाबत मी आता भाष्य न करता तटस्थ राहतो.


आता बाबासाहेबांच्या काही विचारांचा संदर्भ घेऊया. त्यातील अर्थ लावताना माझ्याकडून चुका होऊ शकतात, याची नम्र जाणीव ठेवून हे लिहित आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये बौद्ध धम्म स्वीकारण्यापूर्वी मानवास धर्माची गरज काय? (मुक्ती कोण पथे?) व इतर ठिकाणी स्पष्ट केले आहे. बाबासाहेबांच्या लेखनात “धम्म” हा शब्द पारंपरिक अध्यात्माच्या अर्थाने नाही, तर नैतिक-सामाजिक नियमव्यवस्था म्हणून आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार म्हणून पुढे येतो.. बाबासाहेब बुद्धाला चमत्कारिक आध्यात्मिक गुरु म्हणून नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा सामाजिक क्रांतिकारक म्हणून पाहतात. त्यांना उघड्या डोळ्यांचा व चालता बोलता बुद्ध अभिप्रेत होता.


त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात बुद्धधम्माचा पाया प्रज्ञा, करुणा आणि समता यांवर उभारलेला दिसतो. त्यांच्यासाठी धम्म म्हणजे केवळ कर्मकांड किंवा वैयक्तिक मोक्षाचा मार्ग नव्हता. धम्माने समाजातील दुःख, अन्याय, विषमता आणि शोषण कमी केले पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. धम्म म्हणजे नीती व धम्माचा उद्देश या जगाची पुनर्रचना करणे हा होय.


विपश्यनेच्या संदर्भात असे म्हणता येईल की पारंपरिक बौद्ध परंपरेत विपश्यना ही मनाचे निरीक्षण, दुःखाचे स्वरूप समजून घेणे आणि एकाग्रता विकसित करण्याची साधना मानली जाते. बाबासाहेबांनी ध्यान-साधनेला थेट नाकारले असे म्हणता येणार नाही; मात्र त्यांच्या धम्माच्या मांडणीत नैतिकता, प्रज्ञा आणि सामाजिक परिवर्तनाला केंद्रस्थान आहे. 


४ डिसेंबर १९५४ ला म्यानमार ला रंगून येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद झाली.या परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकराचे भाषण झाले.आपल्या भाषणाचे ते म्हणाले की,ध्यान,मनाचे निरीक्षण व अभीधम्म यावर फार भर दिला जात आहे .या मार्गाने भारता मधे बौद्ध धम्म नवनिर्मित ग्रंथात प्रस्तुत केला तर आमच्या धेय्यात अडथळा निर्माण होईल.


त्यांचा प्रसिद्ध विचार आहे:

"मला असा धर्म आवडतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो."


म्हणून आंबेडकरी दृष्टिकोनातून मला प्रश्न असा उभा राहतो की कोणतीही साधना व्यक्तीला अंतर्मुख करण्याबरोबरच समाजातील अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देते का?


१९५६ नंतरचा धम्म हा पारंपरिक मोक्षकेंद्रित अध्यात्मापेक्षा सामाजिक परिवर्तनाशी अधिक जोडलेला दिसतो.


बाबासाहेबांचा दृष्टिकोन समजून घेताना एक गोष्ट विशेष महत्त्वाची आहे. त्यांनी नागपूर येथे बौद्ध धम्म स्वीकारला आणि त्याच वेळी २२ प्रतिज्ञा दिल्या. हा केवळ वैयक्तिक आध्यात्मिक निर्णय नव्हता; तर जातिव्यवस्था, सामाजिक गुलामी आणि मानवी अपमानाविरुद्धचा सार्वजनिक विद्रोह होता.


म्हणूनच धम्माला केवळ वैयक्तिक साधनेपुरते मर्यादित करणेही चुकीचे ठरेल. त्यांच्या मते धम्म हा मनुष्याच्या अंतर्मुक्तीहुन अधिक सामूहिक समाजाच्या मुक्तीचाही मार्ग आहे. केवळ व्यक्तिगत विकास हा हेतू नसुन सामाजिक विकास हेतु आहे.

त्यामुळे व्यक्तिगत नैतिक परिवर्तन हे सामाजिक परिवर्तनाचे साधन बनले, तरच धम्माचा क्रांतिकारी आशय जिवंत राहील; अन्यथा तो परिवर्तनाच्या मूळ उद्देशापासून दूर नेणारा घटक ठरू शकतो.”


क्रमश:

गोष्टी / जातक कथा/ झेन कथा

गोष्टी / जातक कथा/ झेन कथा

Uploading: 1486848 of 2434378 bytes uploaded.

 
इसापची कोल्हा आणि द्राक्षांची कथा सगळ्यांनाच माहिती आहे.


आपली उडी वरपर्यंत पोहोचत नाही म्हटल्यावर उंचावरची द्राक्षं आंबटच असणार, असा निष्कर्ष सगळेच कोल्हे काढतात.


ओशो त्यापुढची गोष्ट सांगतो.


त्याच्या गोष्टीत हा कोल्हा थेट जिममध्ये गेला, त्याने भरपूर व्यायाम केला. बायसेप, ट्रायसेप कमावले, उंच झेप घेण्याचं कौशल्य आत्मसात केलं आणि पुन्हा त्याच ठिकाणी येऊन त्याने द्राक्षवेलीवर त्याच घोसावर झेप घेतली.


तो घोस त्याच्या हातात आला.


त्याने मोठ्या उत्सुकतेने द्राक्षं खाल्ली.


ती खरोखर आंबटच होती.


पण, आता कोल्हा ती द्राक्षं किती मधुर आहेत, हेच सांगत फिरतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : सामाजिक न्यायाबरोबरच आर्थिक न्यायाचेही प्रणेते

 

अनेकांना वाटते की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य केवळ सामाजिक न्याय, अस्पृश्यता निर्मूलन आणि आरक्षणापुरते मर्यादित होते. परंतु हे पूर्ण सत्य नाही. बाबासाहेबांचे ध्येय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या तिन्हींची स्थापना करणे हे होते. म्हणूनच भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत "सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय" या मूल्यांना अग्रक्रम देण्यात आला आहे.

सामाजिक न्यायासाठी त्यांनी संविधानिक हक्क, मूलभूत अधिकार, प्रतिनिधित्व आणि आरक्षणाची व्यवस्था केली. परंतु आर्थिक न्यायासाठीही त्यांनी एक स्पष्ट आणि दूरदृष्टीचा आराखडा मांडला होता.

१९४७ मध्ये त्यांनी States and Minorities या दस्तऐवजात *राज्य समाजवाद (State Socialism)* ही संकल्पना मांडली. त्यांचा उद्देश कोणत्याही प्रकारच्या हुकूमशाहीची स्थापना करणे नव्हता, तर लोकशाही मार्गाने आर्थिक विषमता कमी करणे हा होता.

बाबासाहेबांच्या मते भारतातील आर्थिक विषमतेचे एक प्रमुख कारण म्हणजे जमिनीचे असमान वाटप. काही मोजक्या जमीनदारांकडे मोठ्या प्रमाणावर जमीन होती, तर लाखो शेतकरी आणि शेतमजूर भूमिहीन किंवा अल्पभूधारक होते. त्यामुळे त्यांनी पुढील उपाय सुचवले:

* सर्व शेतीजमीन राज्याच्या मालकीची असावी.

* खाजगी जमिनदारी व्यवस्था संपुष्टात यावी.

* राज्याने जमीन प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भाडेपट्ट्याने (Lease) द्यावी.

* सामूहिक किंवा सहकारी पद्धतीने शेतीला प्रोत्साहन द्यावे.

* सिंचन, बियाणे, खत, यंत्रसामग्री, कर्ज इत्यादी सुविधा राज्याने उपलब्ध करून द्याव्यात.

* शेतीतील उत्पन्नाचे वाटप न्याय्य नियमांनुसार व्हावे.

याचा अर्थ सरकार स्वतः शेती करणार, असा नव्हता. जमिनीची मालकी राज्याकडे, पण शेती प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी करावी, ही त्यांची संकल्पना होती.

बाबासाहेबांचा दृष्टिकोन पारंपरिक साम्यवादापेक्षा वेगळा होता. ते हिंसक क्रांती, एकपक्षीय हुकूमशाही किंवा वैयक्तिक स्वातंत्र्याच्या दडपशाहीचे समर्थक नव्हते. त्यांनी संसदीय लोकशाही, घटनात्मक शासन, मूलभूत अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांना सर्वोच्च स्थान दिले.

म्हणूनच त्यांच्या आर्थिक विचारांना *लोकशाही राज्य समाजवाद (Democratic State Socialism)* असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

भूमिहीनांच्या प्रश्नावर भारतात तीन मार्ग समोर आले होते.

१. तामिळनाडू आणि कम्युनिस्ट चळवळी:

तामिळनाडूत तसेच इतर काही राज्यांत (विशेषतः तेलंगणा, केरळ, पश्चिम बंगाल) कम्युनिस्ट शेतकरी चळवळी झाल्या. काही ठिकाणी त्या हिंसकही झाल्या. कारण त्यांचा विचार असा होता की जमीनदार स्वेच्छेने जमीन देणार नाहीत; म्हणून वर्गसंघर्ष अपरिहार्य आहे.

हा दृष्टिकोन मार्क्सवादी होता.


२. विनोबा भावे यांचे भूदान

भूदान चळवळीचा आधार नैतिक परिवर्तन होता.

विनोबा भावे यांचा विश्वास होता की जमीनदारांनी स्वेच्छेने काही जमीन भूमिहीनांना द्यावी. यात संघर्षापेक्षा सद्भावना आणि नैतिक आवाहन यावर भर होता. या चळवळीमुळे लाखो एकर जमीन दान म्हणून जाहीर झाली; परंतु प्रत्यक्षात सर्व जमीन कायदेशीररीत्या भूमिहीनांना मिळालीच असे नाही. अनेक जमिनी वादग्रस्त, नापीक किंवा हस्तांतरणास अयोग्य होत्या.


३. दादासाहेब गायकवाडांचा भूमिहीनांचा सत्याग्रह

हा बाबासाहेबांच्या विचारांशी जोडलेला होता.

दादासाहेब गायकवाडांनी भूमिहीनांसाठी मोठा सत्याग्रह उभारला. घोषवाक्य होते:

"कसेल त्याची जमीन; नसेल त्याचे काय?"

हा हिंसक नव्हता.त्यात संविधानिक मार्ग,सत्याग्रह,अटक,मोर्चे,लोकशाही आंदोलन यांचा अवलंब करण्यात आला.

या चळवळीमुळे महाराष्ट्रात भूमिहीनांना सरकारी पडीत जमीन वाटपाचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला.


बाबासाहेबांचा मार्ग नेमका कोणता?

मला वाटते, येथे एक महत्त्वाचा फरक समजून घ्यायला हवा.

बाबासाहेब:

भूदानासारख्या केवळ स्वेच्छेच्या मार्गावर अवलंबून नव्हते.

कम्युनिस्टांप्रमाणे हिंसक क्रांतीचे समर्थकही नव्हते.


त्यांनी तिसरा मार्ग सुचवला:

राज्याने कायद्याने जमीनव्यवस्था बदलावी.

जमिनीचे राष्ट्रीयीकरण करावे.

भूमिहीनांना लागवडीचा हक्क द्यावा.

हे सर्व संविधान आणि लोकशाहीच्या चौकटीत करावे.


म्हणूनच त्यांच्या आर्थिक विचारांना लोकशाही राज्य समाजवाद (Democratic State Socialism) असे संबोधले जाते.


 क्रमशः

Friday, 29 May 2026

बाबासाहेब


 

Cultivation Of Mind Should Be The 

Ultimate Aim Of The Human Existence.


-Dr. B.R. Ambedkar 

🌸🌸🌸


बाबासाहेब सांगतात की, धर्माच्या अधिष्ठानावर उभी असलेली जातव्यवस्था ही अशी रचना आहे की ती शोषितांविषयी सहानुभूती निर्माण करत नाही; उलट अस्पृश्यांविरुद्ध ‘धार्मिक रोष’ निर्माण करते. परिणामी, माणसाची न्यायबुद्धी बोथट होते आणि तो धार्मिक शिकवणीच्या प्रभावाखाली अन्यायातही सहभागी होतो. इतकंच नव्हे, तर त्या अन्यायालाच न्याय्य समजू लागतो. 


म्हणूनच, सामाजिक परिवर्तनाचा प्रश्न केवळ शोषितांच्या सक्षमीकरणापुरता मर्यादित राहत नाही. उलट, ज्या समाजघटकांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यातच जाणीव (consciousness) निर्माण करणे अधिक महत्त्वाचे ठरते. कारण अन्याय ‘न्याय्य’ आहे अशी धारणा सतत पेरली जाते आणि तीच व्यवस्था टिकवून ठेवते. त्यामुळे या चुकीच्या समजुतींना आव्हान देणारे, त्यांचे चिकित्सक विश्लेषण करणारे आणि नैतिकतेच्या नव्या चौकटी उभ्या करणारे प्रयत्न अत्यावश्यक ठरतात.


व्यक्तीच्या विचारात बदल करणे महत्त्वाचे असते. न्यायव्यवस्था, वकिली आणि धोरणनिर्मिती हाताळणारे हेच, लोक समाजातील नैतिक दिशा ठरवणार आहेत.परंतु अशा जाणीवा शैक्षणिक संस्था क्वचितच निर्माण करतात

जयंती - 02

 



पोस्ट क्रमांक ०२

🟦🟨🟥⬜️🟧

📖 पुस्तक आणि बाबासाहेब 


बाबासाहेबांना ५०,००० हून अधिक पुस्तके होती. मुंबईतील राजगृह हे बाबासाहेबानी खास ग्रंथालयासाठी बनविले होते. त्यात इंग्रजी,मराठी,उर्दू,संस्कृत,पारसी,फ्रेंच,जर्मन अशा अनेक भाषांतील ग्रंथांचा समावेश होता. साधारणपणे सोशल सायन्स चे पंधरा भाग,हिस्ट्री ऑफ दि वर्ल्ड चे पंचवीस भाग होते,तसेच इतिहासावर २६००,कायद्यावर आधारित ५०००,राजकारणा संबंधित ३०००,धर्मशास्त्रावर २००० तर १२०० चरित्रे ग्रंथ होती. अर्थशास्त्राची १०००,तत्त्वज्ञानावर ६०००,युद्धशास्त्रावर ३०००,इतर साहित्य ३००० आणि इतर वेगवेगळ्या विषयांवर ७९०० ग्रंथ होते.


राजगृहाच्या या ग्रंथालयामध्ये त्यांच्या गैरहजेरीत कोणालाही जाण्याची मुभा नव्हती,त्यांचा पाळीव कुत्रा पीटर हा राजगृहाच्या दाराशी ग्रंथालयाची राखण करीत असे,हे ग्रंथ वर्गीकरण करून लेबलसह रचून ठेवले होते, त्यामुळे इतक्या प्रचंड ग्रंथालयात त्यांना कोणतेही पुस्तक हवे असल्यास ते अचूक मिळत होते,इंग्लंड मधील ठक्कर कंपनीतुन त्यासाठी बाबासाहेबानी ग्रंथालय कार्ड बनवून घेतले होते,व श.शा.रेगे यांच्याकडे ती जबाबदारी देऊन पुस्तकांची यादी पूर्ण करून घेतली होती.


बाबासाहेबांनी अभ्यास केलेले तत्वज्ञ :

बाबासाहेबांनी हिंदु धर्म ग्रंथ व पुराणे, बौद्ध साहित्य, ख्रिश्चन व मुस्लिम धर्मांचा तौलनिक अभ्यास केला होता.

त्यांनी हेगल, मार्क्स,एंगेल्स,लेनिन,मुसोलिनी,

वोल्टअर,प्लेटो, सोक्रेटीस,महात्मा फुले,कार्लाईल, जॉन ड्युई, प्रो. सेलिंगमन, बरंट्रँड रसेल, फ़्रेंड्रिंक नितशे, लासकी, मॅक्स म्युलर, एडमंड बर्के, वूल्फ गँग गॉथे, सिगमांड फ्राईड , जॉन स्टुअर्ट मिल,जेरेमी बेंथम, जेम्स मिल, थॉमस पेन, अॅडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो इत्यादी विचारवंतांचे लेखन व विचार अभ्यासले होते.


त्यांनी बुद्ध, कबीर आणि फुले यांना अभ्यासांती गुरु मानले.


📚 बाबासाहेबांची ग्रंथसंपदा

॰ कास्ट्स इन इंडिया: त्यांची रचना, उत्पत्ती आणि विकास (1917)

॰ स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमेडीज (1918)

॰ द प्रॉब्लेम ऑफ द रुपी: त्याची उत्पत्ती आणि उपाय (1923)

॰ दि इव्हॉल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (1925)

॰ वेटिंग फॉर अ व्हिसा (1935–36)

॰ अनायलेशन ऑफ कास्ट (1936)

॰ मिस्टर गांधी अँड द एमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स (1943)

॰ रानडे, गांधी अँड जिन्ना (1943)

॰ थॉट्स ऑन पाकिस्तान (1941 / 1945)

॰ व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स (1945)

॰ महाराष्ट्र अॅज अ लिंग्विस्टिक स्टेट

॰ हू वेअर द शूद्राज? (1946)

॰ स्टेट्स अँड मायनॉरिटीज (1947)

॰ द अनटचेबल्स: हू वेअर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स (1948)

॰ थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स (1955)

॰ बुद्ध ऑर कार्ल मार्क्स

॰ कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सॉल्व इट (1945)

॰ बुद्ध अँड द फ्युचर ऑफ हिज रिलिजन (1950)

॰ द फ्युचर ऑफ पार्लियामेंटरी डेमॉक्रसी

॰ लिंग्विस्टिक स्टेट्स नीड फॉर चेक्स अँड बॅलन्सेस

॰ बुद्धिझम अँड कम्युनिझम (1956)

॰ द बुद्धा अँड हिज धम्मा (1957)

॰ द राईज अँड फॉल ऑफ हिंदू विमेन


बाबासाहेबांच्या जिवन व तत्वद्यानावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत.

अनेकांनी आपापल्या वैचारिक बैठकीनुसार आंबेडकरांवर लेखन केले आहे. व्यक्तीगत समज आणि वैचारिक दृष्टिकोनानुसार वेगवेगळ्या लोकांनी लिहलेली वेगवेगळी चरित्र, लेख आणि पुस्तके लिहिली आहेत. वसंत मून ( इंग्रजी, मराठी), सहारे, कुबेर, चांगदेव खैरमोडे, शंकरराव खरात, झेलीयट बाई, ख्रिस्तोफर जेपरलॉट, डी. आर. जाटव, कंवल भारती, उमेश बगाडे, रावसाहेब कसबे, बी. सी. कांबळे, डी. आर कांबळे, आनंद तेलतुंबडे, गेल ऑम्वेट, धनंजय कीर, दत्तोपंत ठेंगडी, रमेश पंतगे, विमलसुर्य चिमनकर, य. दी. फडके, भा. ल. भोळे, शेषराव मोरे, नानकचंद रत्तु, सोहनलाल शास्त्री, आर. संगीता राव,  सुधाकर गायकवाड, सुरेश माने अशा सगळ्यांची ( अजूनही अनेक जन आहेत)  पुस्तके आहेत आणि सोबतच, बाबासाहेबांचे मूळ साहित्य प्रामुख्याने वाचावेत.


लक्षात घ्या. बाबासाहेब केवळ तत्वज्ञानी नव्हते. त्यांनी कृतियुक्त संघर्षपूर्ण जीवन व्यतीत केल. अर्थशास्त्र, संविधान तज्ञ, लेखक, पत्रकार, इतिहास, मानववंशशास्त्र, धर्मशास्र इत्यादीमध्ये ते पारंगत होते.

चळवळ : 05


 

“आर्थिक, सामाजिक आणि जातीय विषमता या नैसर्गिक किंवा दैवी नसतात; त्या ऐतिहासिक सत्तासंबंध, संसाधनांवरील अनाधिकृत नियंत्रण आणि संस्थात्मक सिस्टेमॅटिक शोषण यांच्या दीर्घ प्रक्रियेतून निर्माण झालेले आपत्ये असतात. समाजातील काही वर्चस्वशाली गटांनी आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय साधनांवर नियंत्रण ठेवून ही विषमता टिकवून ठेवली.”


परंतु या व्यवस्थेचं सर्वात मोठं कौशल्य म्हणजे ही विषमता “न्याय्य”, “नैसर्गिक” आणि “धार्मिक” आहे असा भास निर्माण करणे. त्यामुळे मुळात विषमता अस्तित्वात आहे हेच अनेकांना मान्य होत नाही.


आज जगभरातील व्यवस्थांनी सामान्य लोकांच्या मनात एक गोष्ट खोलवर रुजवली आहे. तुमच्या दुरवस्थेला व्यवस्था किंवा सरकार जबाबदार नाही. तुमच्या आयुष्यातील अपयशासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात, नाहीतर तुमचं नशीब; आणि कधी दुसऱ्या जातीचा, धर्माचा, परप्रांतीय किंवा परदेशी माणूस. परंतु वेल्फेअर स्टेट म्हणून ही सरकारंअपयशी ठरलीत हे ते मान्य करणार नाहीत.


म्हणजेच व्यवस्थेला प्रश्न विचारायचा नाही; तुमच्या प्रश्नांची उत्तरं इतरत्र शोधायची. फेक न्यूज, फेक मीडिया व नीतिशून्य, विवेकहीन समाजात हा विषारी, विखारी विचार फोफावला आणि हा विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी सर्वात प्रभावी अस्त्र ठरली; माध्यमं.


सोशल मीडिया, सिनेमा, टीव्ही, वर्तमानपत्रं आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून जनमत घडवलं जातं, भीती निर्माण केली जाते, दिशाभूल केली जाते आणि खऱ्या प्रश्नांपासून लोकांचं लक्ष हटवलं जातं.


याच कारणामुळे सत्ताधारी वर्ग शिक्षण आणि संस्कार प्रक्रियेवर विशेष लक्ष केंद्रित करतो. सत्ताधारी विचारसरणी लोकांच्या मनात संस्कारांच्या रूपाने रुजवली जाते. त्याला पूरक अजेंडे राबवले जातात आणि शिक्षणाच्या मूळ उद्देशालाच शेंदूर फासला जातो. परिणामी “होयबा वर्ग” निर्माण होतो.


हा होयबा वर्ग सामाजिक, राजकीय किंवा नैतिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेत नाही. अन्याय, विषमता आणि शोषण दिसत असूनही “आपल्याला काय करायचं?” अशी भूमिका घेऊन तो तटस्थ राहतो. परिवर्तनाच्या चळवळींपासून दूर राहणारा, सत्तेच्या भीतीने गप्प बसणारा आणि सुरक्षित तटस्थतेत राहणारा हा वर्ग व्यवस्थेला सर्वाधिक सोयीचा असतो.


म्हणूनच अन्याय ओळखणे, त्याची कारणमीमांसा करणे आणि तो दूर करण्यासाठी सक्षम साधन उभे करणे आवश्यक ठरते. या परिवर्तन प्रक्रियेतील सर्वात प्रभावी आणि मूलभूत साधन म्हणजे शिक्षण.


शिक्षण म्हणजे केवळ शाळा किंवा महाविद्यालयातील अध्यापन नव्हे; तर समाज, कुटुंब, धर्म, सण-उत्सव, परंपरा आणि संस्कृती यांच्या माध्यमातून घडणारी विचारप्रक्रियाही शिक्षणाचाच भाग असते. समाजातील सांस्कृतिक व्यवहार लोकांना “काय योग्य आहे” आणि “काय स्वाभाविक आहे” हे शिकवत असतात.


म्हणूनच प्रश्न विचारणं, चिकित्सक विचार करणं आणि शिक्षणाला मुक्तीचं साधन बनवणं आज पूर्वीपेक्षा अधिक आवश्यक आहे.

चळवळ : 04

 


“एक ना धड, भाराभर चिंध्या” अशीच आज चळवळीची अवस्था झाली आहे. भूछत्राप्रमाणे जणू नवी संघटना जन्माला येते; पण विचार, संघटनशक्ती, दीर्घकालीन कार्यक्रम आणि जनाधार यांच्या अभावामुळे अशा अनेक संघटना काही काळातच निष्प्रभ होतात किंवा समाजात दखलपात्रही ठरत नाहीत.


आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येक गल्लीबोळात “राष्ट्रीय अध्यक्ष” निर्माण झाले आहेत; पण राष्ट्रीय पातळीवर प्रभाव निर्माण करणारे नेतृत्व मात्र दिसत नाही. परिणाम स्वरूप चळवळीमध्ये सुसूत्रता राहत नाही. प्रत्येक संघटना वेगवेगळ्या दिशेने धावत असल्यामुळे सामूहिक ताकद विखुरते. 


याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे ठोस मागण्यांचा अभाव. कोणत्या मुद्द्यावर संघर्ष करायचा, कोणत्या मागणीसाठी जनदबाव उभा करायचा आणि कोणत्या दिशेने समाजाला न्यायचे याबाबत स्पष्टता दिसत नाही. त्यामुळे “प्रेशर पॉलिटिक्स” उभी राहत नाही. सत्ताधाऱ्यांवर प्रभाव टाकण्यासाठी आवश्यक असलेली संघटित ताकद तयार होत नाही. उलट पाकीटबाजी व दलालांना सुकाळ येतो.


इतिहास पाहिला तर आंबेडकरी चळवळ एका स्पष्ट अजेंड्यावर उभ्या राहिल्या. त्यांच्याकडे विचार होता, दिशा होती, शिस्त होती आणि व्यापक नेतृत्व होते. आज मात्र व्यक्तिकेंद्रीकरण वाढले आहे. संघटना समाजासाठी कमी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी जास्त उभ्या राहताना दिसतात.


देशव्यापी नेता अचानक निर्माण होत नाही; त्यासाठी दीर्घकालीन सामाजिक काम, वैचारिक प्रगल्भता, त्याग आणि व्यापक स्वीकार आवश्यक असतो. त्याचप्रमाणे देशव्यापी अजेंडाही फेसबुक पोस्ट किंवा घोषणांनी तयार होत नाही; तो जनतेच्या वास्तविक प्रश्नांशी भिडून सातत्यपूर्ण संघर्षातून घडतो.


पण संघटनांच्या अधोगतीमागे केवळ विखुरलेपणा कारणीभूत नाही. वैचारिक अपरिपक्वता, अज्ञान, अहंकार आणि परस्परांतील द्वेष यांतून आंतरिक संघर्ष निर्माण होतात. त्यातच स्वार्थासाठी होणारी दलाली, गटबाजी आणि व्यक्तिपूजा यामुळे चळवळीची दिशा भरकटते. हजारो संघटना असूनही चालले असते केवळ त्यांची मागणी एकसुरात संघटीत हवी होती मात्र तसेही दिसत नाही.


अशा सर्व वातावरणात प्रामाणिक, समर्पित, त्यागी, वैचारिक आणि सुशिक्षित कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होते. त्यांच्या प्रामाणिकपणाचा उपयोग करून घेतला जातो; पण निर्णयप्रक्रियेत त्यांना स्थान दिले जात नाही. अनेकदा त्यांची फसवणूक, पिळवणूक आणि मानसिक उपेक्षा केली जाते.


परिणामी संघटना समाजपरिवर्तनाचे माध्यम न राहता काही स्वार्थी लोकांचा अड्डा बनते. विचारांपेक्षा व्यक्ती मोठ्या होतात, तत्त्वांपेक्षा अंधनिष्ठा महत्त्वाची ठरते आणि कार्यकर्त्यांपेक्षा चापलूस लोकांना स्थान मिळते. अशा संघटनांमध्ये अभ्यास, शिस्त, नैतिकता आणि जनतेशी असलेले जिवंत नाते हळूहळू नष्ट होत जाते.


याचा गंभीर परिणाम म्हणजे प्रामाणिक कार्यकर्ता निराश होतो. समाजासाठी काम करण्याची जिद्द असलेली माणसे अशा वातावरणापासून दूर जातात. सामान्य जनतेचाही विश्वास उडतो. कारण जनता केवळ घोषणा पाहत नाही; ती संघटनांचे वर्तन, अंतर्गत संस्कृती आणि नेतृत्वाची नैतिकता देखील पाहते.


ज्या संघटनांमध्ये संवादाऐवजी कटकारस्थान, विचाराऐवजी अंधनिष्ठा आणि समाजकारणाऐवजी स्वार्थाचे व्यवहार चालतात, त्या संघटना काही काळ गाजल्या तरी टिकाऊ परिवर्तन घडवू शकत नाहीत. चळवळ उभी राहते ती त्याग, प्रामाणिकपणा, वैचारिक स्पष्टता आणि जनतेशी असलेल्या विश्वासाच्या नात्यावर. भीती, द्वेष आणि स्वार्थावर नाही.


म्हणूनच चळवळ मजबूत करायची असेल तर संघटनांची संख्या वाढवण्यापेक्षा विचारांची एकजूट, सामूहिक नेतृत्व, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, आत्मपरीक्षण आणि समान किमान कार्यक्रम यावर भर द्यावा लागेल. शीलवान नेतृत्व स्वीकारावे व घडवावे लागेल. कॉमन मिमिमम प्रोग्रामवर एकजूट करावी लागेल. अन्यथा प्रत्येकजण स्वतःचा झेंडा घेऊन उभा राहील; पण समाजाची सामूहिक ताकद मात्र कमकुवतच राहील.

चळवळ - 03


नामधारी पदाधिकारी आणि निष्क्रिय संघटना : चळवळीच्या क्षयाची लक्षणे


कोणतीही चळवळ तिच्या घोषणांनी मोठी होत नाही; ती मोठी होते कार्यकर्त्यांच्या सामाजिक हस्तक्षेपाने, वैचारिक प्रगल्भतेने आणि जनतेशी असलेल्या जिवंत नात्याने. पण आज अनेक सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संघटनांमध्ये एक गंभीर वास्तव दिसून येते ती म्हणजे पदांची वाढ आणि कार्याची घट. यातुन अनेकदा निष्क्रिय, नाममात्र, निकामी व मरणासन्न अवस्थेतील संघटना दिसतात.


पूर्वी चळवळींमध्ये पद हे कामातून निर्माण होत असे. लोक एखाद्याला “नेता” म्हणत, कारण तो समाजात सक्रिय असे. आज अनेक ठिकाणी उलट चित्र दिसते.  आधी पद घेतले जाते आणि नंतर काम शोधले जाते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संघटक अशा पदांच्या घोषणा मोठ्या उत्साहात होतात; पण प्रत्यक्ष समाजकार्य, प्रश्नांवर संघर्ष, लोकांशी संवाद, अभ्यास किंवा नवीन कार्यकर्ते घडवण्यामध्ये त्यांचा सहभाग दिसत नाही.


ही केवळ संघटनात्मक समस्या नाही; हा वैचारिक ऱ्हास आहे.


ज्या चळवळीमध्ये अभ्यास कमी होतो, तिथे घोषणाबाजी वाढते. जिथे सामूहिक नेतृत्व संपते, तिथे व्यक्तिपूजा सुरू होते. जिथे कार्यकर्ते घडत नाहीत, तिथे “फोटोतील पदाधिकारी” निर्माण होतात. प्रत्येकाला प्रभावशाली दिसायचे असते; पण समाजासाठी सातत्याने काम करणारा कार्यकर्ता व्हायचे नसते.


आज सोशल मीडियाने या प्रवृत्तीला अधिक खतपाणी घातले आहे. पोस्टरवर फोटो असणे, नावापुढे मोठे पद लिहिणे आणि कार्यक्रमानंतर अभिनंदनाच्या पोस्ट टाकणे.  यालाच अनेकांनी सामाजिक काम समजले आहे. पण चळवळ ही डिजिटल प्रतिमांनी उभी राहत नाही; ती उभी राहते लोकांच्या विश्वासावर, त्यागावर आणि सातत्यपूर्ण कृतीवर.


पद जबाबदारीचे प्रतीक असते, प्रतिष्ठेचे नाही. पण जेव्हा पद हे केवळ ओळख आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचे साधन बनते, तेव्हा संघटना बाहेरून जिवंत दिसते पण आतून निष्क्रिय होत जाते. अशा संघटना समाजात विश्वास निर्माण करू शकत नाहीत. लोकांना भाषणे नको असतात; त्यांना कृती दिसावी लागते.अन्यथा संघटनेचे अस्तित्व केवळ नावापुरते उरते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघटन ही केवळ लोकांची गर्दी नसून शिस्तबद्ध, अभ्यासू आणि ध्येयवादी सामूहिक शक्ती मानली होती. संघटना म्हणजे केवळ कार्यालय, बॅनर किंवा पदांची यादी नाही; संघटना म्हणजे विचारांचे कृतीत रूपांतर करणारी सामाजिक ऊर्जा. जर त्या ऊर्जेऐवजी निष्क्रियता आली, तर चळवळींचा र्हास अटळ आहे.

चळवळ - 02

चळवळ वाढायची असेल, तर संघटक घडवावे लागतात. पण आज संघटक उरलेत कुठे? आज प्रत्येकाला influencer प्रभावशाली व्हायचं आहे. ही केवळ पिढी बदलल्याची गोष्ट नाही; ही सामाजिक-राजकीय संस्कृती बदलल्याची खूण आहे.


संघटक होणं म्हणजे स्वतःला केंद्रस्थानी न ठेवता समाजाला केंद्रस्थानी ठेवणं. संघटक प्रकाशझोतात नसतो; तो पडद्यामागे असतो. तो भाषणांपेक्षा संवाद करतो. तो भक्त गोळा करत नाही; तो कार्यकर्ते घडवतो. त्याचं काम संथ, कठीण आणि अनेकदा नाव प्रसिद्धीस न येणार असतं. म्हणूनच संघटक होण्यासाठी संयम, सातत्य, वैचारिक स्पष्टता आणि लोकांविषयी खोल आस्था लागते.


इटालियन मार्क्सवादी विचारवंत अँटोनियो ग्रामशीने सांगितलं होतं की ,सत्ता केवळ पोलिस, कायदे किंवा दडपशाहीने टिकत नाही; ती लोकांच्या मनांवर सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करून टिकते. लोकांना एखादी व्यवस्था “नैसर्गिक” वाटू लागते, तेव्हा त्या व्यवस्थेचं खऱ्या अर्थाने वर्चस्व निर्माण होतं. ग्रामशी याला सांस्कृतिक वर्चस्व म्हणतो. हे वर्चस्व मोडायचं असेल, तर समाजात पर्यायी विचार, पर्यायी संस्कृती आणि पर्यायी संघटनात्मक शक्ती उभी करावी लागते. आणि ते काम influencer (प्रभावी वक्ते) करत नाहीत; संघटक करतात.


माणसं घडवणं ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. एखाद्या गावात, वस्तीत किंवा कामगार भागात जाऊन लोकांचा विश्वास जिंकावा लागतो. त्यांच्या दुःखात उभं राहावं लागतं. त्यांच्या भाषा, भीती, आशा समजून घ्याव्या लागतात. एकेक व्यक्ती जोडावी लागते. त्यातून लहान गट तयार होतात, गटातून संघटना तयार होते आणि संघटनांतून चळवळ जन्म घेते. ही प्रक्रिया एका प्रसिद्ध video पोस्टने किंवा एका भाषणाने होत नाही. यासाठी वर्षानुवर्षे काम करावं लागतं.


ग्रामशीने पारंपरिक बुद्धिजीवी आणि लोकमान्य बुद्धिजीवी असा एक महत्त्वाचा भेद केला होता. पारंपरिक बुद्धिजीवी म्हणजे विद्यापीठं, परिसंवाद, लेखन, चर्चांमध्ये रमणारे; पण अनेकदा जनतेपासून दूर गेलेले बुद्धिजीवी. तर लोकमान्य बुद्धिजीवी हे लोकांमधून उभे राहतात. ते फक्त विचार मांडत नाहीत; ते लोकांना संघटित करतात, संघर्षाला दिशा देतात आणि सामाजिक शक्ती निर्माण करतात. ते समाजाविषयी केवळ बोलत नाहीत; ते समाजासोबत उभे राहतात.


आज आपल्या चळवळींसमोरची मोठी समस्या हीच आहे की संघटक कमी होत आहेत आणि दिखाऊ बुद्धिजीवी वाढत आहेत. समाजात जाऊन कार्यकर्ते घडवण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा मोठी करणं महत्त्वाचं वाटू लागलं आहे. प्रदर्शनतेला बांधिलकी / निष्ठा पेक्षा जास्त किंमत मिळू लागली आहे.


एकेकाळी भारतातील डाव्या, समाजवादी, आंबेडकरी आणि इतर पुरोगामी चळवळींमध्ये संघटनात्मक कार्य / संघटन उभारणी ही केंद्रस्थानी कल्पना होती. पन्नास, साठ, सत्तरच्या दशकातील कार्यकर्ते तळागाळात राहत, लोकांमध्ये मिसळत, अभ्यासवर्ग घेत, पत्रकं वाटत, संघटनात्मक बैठका घेत. त्यांना माहिती होतं की परिवर्तन हे फक्त विचारांनी होत नाही; ते संघटित लोकशक्तीने होतं.


याच संघटनात्मक कार्य / संघटन उभारणी च्या तत्त्वाला संघ परिवाराने अत्यंत गंभीरपणे समजून घेतलं. शाखा, नियमित बैठक, वैचारिक प्रशिक्षण, स्थानिक संपर्क, सांस्कृतिक कार्यक्रम, शाळा, सेवा उपक्रम या सगळ्यांतून त्यांनी सातत्याने माणसं जोडली. त्यांनी समाजात खोलवर शिरकाव केला. त्यांची विचारधारा विषमता वाढवणारी आणि द्वेष पसरवणारी असू शकते; पण संघटन उभारणीचं महत्त्व त्यांनी कधीच कमी लेखलं नाही. त्यांनी भाषणबाजांपेक्षा पेक्षा प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी निर्माण केले.


दुसरीकडे, अनेक पुरोगामी प्रवाहांनी हळूहळू संघटनेची परंपरा गमावली. वैचारिक पातळीवर ते मजबूत असले, तरी जनतेशी त्यांचा जिवंत संपर्क कमी होत गेला. विद्यापीठं, परिसंवाद, लेखन, सोशल मीडिया हे महत्त्वाचे असले तरी ते जनसंघटनांची जागा घेऊ शकत नाहीत. विचार जर लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडले गेले नाहीत, तर ते केवळ बौद्धिक, अकादमीक चर्चांपुरते मर्यादित राहतात.


१९८० नंतर स्वयंसेवी संस्था संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला. समाजकारणाचं प्रकल्पकेंद्रीकरण झालं. निधी, अहवाल, कार्यशाळा, देणगीदार याभोवती अनेक उपक्रम फिरू लागले. काही चांगलं काम नक्कीच झालं; पण संघर्षाची जागा उत्तम व्यवस्थापनाने घेतली. कार्यकर्त्याचं रूपांतर व्यावसायिक कार्यकर्ता मध्ये होऊ लागलं. त्यानंतर नवउदारवादी अर्थव्यवस्थेने व्यक्तिवादाला आणखी आक्रमक बनवलं. “स्वतःचा विकास”, “वैयक्तिक प्रगती ”, “वैयक्तिक यश” या मूल्यांनी सामूहिक राजकारण कमकुवत केलं.


सोशल मीडिया आल्यानंतर दिखाऊपणा म्हणजेच कार्य, अशी समजूत निर्माण झाली. likes, shares, followers, reels, viral clips याभोवती राजकीय-सामाजिक अभिव्यक्ती फिरू लागली. त्यामुळे आंदोलनवादी भाषणबाजांचा एक नवा वर्ग तयार झाला. हा वर्ग सतत दिसतो, बोलतो, प्रतिक्रिया देतो; पण जमिनीवर संघटनात्मक कामात त्याचा सहभाग मर्यादित असतो.


यातली मोठी समस्या म्हणजे चळवळ ही “विक्रीयोग्य आशय” बनते. दुःख, अन्याय, संघर्ष हे लोकांच्या जगण्याचे प्रश्न न राहता लोकांचं लक्ष वेधून घेणारा प्रतिसाद मिळवण्याची, टाळीखाऊ साधनं बनतात. वर्तमाना व भविष्याविषयी सांगायला काही नसले की इतिहासाचे अलंकारिक उदात्तीकरण होते. भाषणं, पोस्ट्स, घोषणा यांना महत्त्व राहतं; पण माणसांशी नातं बांधणं मागे पडतं. अशा परिस्थितीत चळवळीचा गाभा कमकुवत होतो.


भाषणबाज वक्ता लोकांवर प्रभाव टाकतो; संघटक लोकांना सक्षम करतो.

भाषणबाज स्वतःभोवती केंद्र निर्माण करतो; संघटक सामूहिक नेतृत्व घडवतो.

भाषणबाज ला दुखाऊपणा लागते; संघटकाला विश्वास लागतो.

भाषणबाजचा प्रभाव अनेकदा क्षणिक असतो; संघटक व संघटनेची ची उभारणी दीर्घकालीन असते.


चळवळींचा इतिहास पाहिला, तर कोणतीही मोठी सामाजिक क्रांती भाषणबाजमुळे घडलेली नाही. त्या संघटित लोकांच्या शक्तीने घडल्या आहेत. कामगार चळवळी, शेतकरी आंदोलनं, स्त्रीवादी लढे, दलित आंदोलनं, स्वातंत्र्य चळवळ या सगळ्यांच्या केंद्रस्थानी संघटक होते. अशी माणसं जी स्वतःपेक्षा ध्येयाला मोठं मानत होती.


आज सर्वात मोठी गरज आहे ती संघटन निर्माण करण्याची. लोकांमध्ये राहणारे, अभ्यास करणारे, ऐकणारे, संयमाने काम करणारे संघटक . जे समाजाला फक्त प्रतिक्रियावादी करायला नाही, तर संघटीत व्हायला शिकवतील. कारण ग्रामशीच्या भाषेत सांगायचं तर, प्रतिवर्चस्ववादी संस्कृती उभी करायची असेल तर तळागाळातील संघटक आणि जनआधारित, लोकमान्य, लोकाभिमुख बुद्धिजीवी निर्माण करावे लागतील.


कारण शेवटी चळवळ भाषणांने ने नाही, संस्थात्मक बांधणी ने उभी राहते.

ती hashtags ने नाही, तर मानवी नात्यांनी टिकते.

ती प्रसिद्धीने नाही, तर संघटित जनतेच्या विश्वासाने वाढते.


आणि म्हणूनच :

चळवळ भाषणबाज नाही, संस्थात्मक बांधणीने संघटक उभे करतात.

चळवळ


दलित-बहुजन समाजातील शिक्षण, नोकरी आणि आर्थिक संधींमुळे निर्माण झालेला मध्यमवर्ग हा एक महत्त्वाचा सामाजिक बदल आहे. पण त्या वर्गातील काही घटकांनी सामाजिक बांधिलकी विसरून केवळ वैयक्तिक प्रगतीवर भर दिला, तर त्यातून चळवळीची सामूहिक ताकद कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो.


सत्तेच्या जवळ राहून लाभ मिळवणारा, मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाखाली सामाजिक विषमता दुर्लक्षित करणारा आणि स्वतःच्या उन्नतीसाठी आपल्या समाजातील लोकांचाच वापर करणारा मध्यमवर्ग ही अनेक सामाजिक चळवळींसमोरची वास्तविक समस्या आहे. हा प्रश्न फक्त आर्थिक नाही; तो नैतिक आणि राजकीयही आहे.


मात्र याचवेळी संपूर्ण मध्यमवर्गाला एकसारखे ठरवणेही योग्य ठरणार नाही. कारण याच वर्गातून शिक्षक, लेखक, वकील, कार्यकर्ते, पत्रकार आणि सामाजिक नेतृत्वही उभे राहिले आहे. प्रश्न “मध्यमवर्ग” असण्याचा नाही, तर आपल्या उन्नतीची दिशा समाजाशी जोडलेली आहे का याचा आहे.


म्हणूनच संघर्ष दोन पातळ्यांवर आहे.

अन्यायकारक सत्ताव्यवस्थेविरुद्ध,

आणि समाजातील स्वार्थी, चळवळविरोधी प्रवृत्तीविरुद्ध.


डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी “Educate, Agitate, Organize” दिलेला संदेश केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हता; तो सामूहिक मुक्तीसाठी होता. समाजातून वर आलेल्या प्रत्येकाने “मी समाजासाठी काय परत देतो?” हा प्रश्न विचारणे तितकेच आवश्यक आहे.


बाबासाहेबांनी बुद्धाला डोळे मिटलेला बुद्ध म्हणून समोर न आणता बुद्ध हा सामाजिक क्रांतिकारक म्हणून मांडला आहे हे आपण समजलो पाहिजे. धम्माचा उद्देश त्यांना या जगाची पुर्रचना करणे व ती धम्माचा तत्त्वांवर करणे अपेक्षीत होते.

दलित-बहुजन समाजातील शिक्षण, नोकरी आणि आर्थिक संधींमुळे निर्माण झालेला मध्यमवर्ग हा एक महत्त्वाचा सामाजिक बदल आहे. पण त्या वर्गातील काही घटकांनी सामाजिक बांधिलकी विसरून केवळ वैयक्तिक प्रगतीवर भर दिला, तर त्यातून चळवळीची सामूहिक ताकद कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो.


सत्तेच्या जवळ राहून लाभ मिळवणारा, मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाखाली सामाजिक विषमता दुर्लक्षित करणारा आणि स्वतःच्या उन्नतीसाठी आपल्या समाजातील लोकांचाच वापर करणारा मध्यमवर्ग ही अनेक सामाजिक चळवळींसमोरची वास्तविक समस्या आहे. हा प्रश्न फक्त आर्थिक नाही; तो नैतिक आणि राजकीयही आहे.


मात्र याचवेळी संपूर्ण मध्यमवर्गाला एकसारखे ठरवणेही योग्य ठरणार नाही. कारण याच वर्गातून शिक्षक, लेखक, वकील, कार्यकर्ते, पत्रकार आणि सामाजिक नेतृत्वही उभे राहिले आहे. प्रश्न “मध्यमवर्ग” असण्याचा नाही, तर आपल्या उन्नतीची दिशा समाजाशी जोडलेली आहे का याचा आहे.


म्हणूनच संघर्ष दोन पातळ्यांवर आहे 

१. अन्यायकारक सत्ताव्यवस्थेविरुद्ध,

२. समाजातील स्वार्थी, चळवळविरोधी प्रवृत्तीविरुद्ध.


बाबासाहेबांनी “Educate, Agitate, Organize” दिलेला संदेश केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हता; तो सामूहिक मुक्तीसाठी होता. समाजातून वर आलेल्या प्रत्येकाने “मी समाजासाठी काय परत देतो?” हा प्रश्न विचारणे तितकेच आवश्यक आहे.


बाबासाहेबांनी बुद्धाला डोळे मिटलेला बुद्ध म्हणून समोर न आणता बुद्ध हा सामाजिक क्रांतिकारक म्हणून मांडला आहे हे आपण समजलो पाहिजे. धम्माचा उद्देश त्यांना या जगाची पुर्रचना करणे व ती धम्माचा तत्त्वांवर करणे अपेक्षीत होते.

जयंती महामानवांची भाषणाचा अंश

 


आजच्या काळात बोलणे हि जणूकाही क्रांतीच झाली आहे. वर्तमानात अनेक मुद्दे सुरु आहेत. EVM ,एप्सटिन फाईल सारखे मुद्धे आहेतच. त्यासोबत डेलिमिटेशन, जंगलतोड व त्यामुळे झालेली प्रचंड तापमानवाढ, महाबोधी विहार मुक्तीआंदोलन, पालीभाषा आंदोलन,डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या समितीतील आक्षेपार्ह सभासदांची वर्णी आणि अर्थात वर्गीकरण असे अनेक मुद्दे आहेत. वर्गीकरण होऊ नये परंतु जर झालेच तर ते किमान लोकसंख्येचा आधारावर, इम्पिरिकल डेटाच्या आधारावर व्हावे असे साहजिक वाटते.


यानंतर आपण मुख्य विषयाकडे वळूयात तो म्हणजे महामानवांची जयंती. आज १ मे अर्थात कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा असा हा त्रिवेणी संगम. बुद्धांच्या जीवनात वैशाख पौर्णिमेचे विशेष स्थान आहे. बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण. बुद्धांचा जन्म इसवीसन पूर्व ५६३ साली झाला . त्यांच्या वडिलांचे नाव शिद्धोधन व मातेचे नाव महामाया. त्याकाळात गणराज्य पद्धती होती. शक्य गणातील शिद्धोधन हे राजा होते. कपिलवस्तू हे राजधानी होती. या दाम्पत्याला अनेकवर्ष संतानप्राप्ती नव्हती आणि अशातच एका रात्री महामायेला एक सुंदर स्वप्न पडते. सुमेध नावाचे मुनी स्वप्नात येऊन महामायेला तू माझी माता होशील का? अशी विचारणा करतात. एक पांढरा शुभ्र हत्ती महामायेच्या स्वप्नात येतो. या स्वप्नाचा अर्थ विचारण्यासाठी महाराज दुसऱ्या दिवशी आठ विद्वान ब्राह्मणांना पाचारण करतात. ते अर्थबोध सांगतात कि राजे तुम्हाला पुत्ररत्नाचा लाभ होणार आहे तसेच हे बालक सार्वभौम सम्राट होईल किंवा एक संन्याशी बनून जगाचा मार्गदर्शक बनेल, बुद्ध होईल.


बुद्धांच्या जन्माची देखील मोठी रंजक कथा आहे. त्यांचा जन्म लुम्बिनी येथील वनात शाल वृक्षाखाली झाला आहे. त्यांच्या जन्मानंतर असितमुनी नावाचे महान तपस्वीचे आगमन या बालकाला पाहण्यासाठी होते. ते भरल्या डोळ्याने बालकाचे दर्शन घेतात आणि एक दुःखद भविष्यवाणी करतात. ती भविष्यवाणी खरी ठरून अवघ्या ७ दिवसांनी महामायेचे देहावसन होते. बाळाची मावशी महाप्रजापती सर्व लालन पालन करते. सिद्धार्थ बालपणापासून करून आणि गहाण विचार करणारे होते. वयाच्या १२ -१३ व्य वर्षी त्यांचा आत्येभाऊ देवदत्त यासोबत झालेला वाद व बुद्धाची करुणा व दृष्टिकोन आपणास ज्ञात आहे. मारणाऱ्या पेक्षा तारणारा श्रेष्ठ आहे व न्यायासनाने न्यायदान करतांना शिकार करणाऱ्याच्या बाजूने न्यायदान करण्यापेक्षा जीवदान करणाऱ्याच्या बाजूने न्यायदान केले पाहिजे असे पटवून दिले.


बुद्धांचा विवाह हा वयाच्या १६ व्या वर्षी दंडपाणी यांची मुलगी यशोधरा सोबत झाला. वयाच्या २० व्या वर्षी सिद्धार्थ शक्य संघाचे सदस्य झाले. काही वर्षांनी शाक्य आणि कोलीय या गणात रोहिणी नदीच्या पाणीवाटपावरून वाद झाला. शाक्य संघाने व सेनापतीने युद्धाचा निर्णय घेतला या संघाच्या निर्णयाला बुद्धाने विरोध केला व सामोपचाराने चर्चेने वाद मिटवण्याचा पर्याय सुचवला. बुद्धाने संघाच्या विरोधात गेल्याने त्यांना देशत्याग, देहत्याग अथवा सामाजिक बहिष्कार अशा पर्यायांपैकी एक शिक्षा स्वीकारण्याचे सुनावण्यात आले. बुद्धाने परिव्राजक होण्याचा मार्ग स्वीकारला. हि बातमी वायुवेगाने शुद्धोधन, प्रजापती व माता यशोधरे पर्यंत पोहचते. माता यशोधरा सिद्धार्थाच्या निर्णयाला योग्य ठरवून आल्या माता पित्याची व पुत्र राहुलची मी माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत देखभाल करेन. तुम्ही एक असा जीवनमार्ग शोधून काढा कि, तो सकाळ मानवजातीला कल्याणकारी ठरेल. अशी इच्छा व्यक्त करते.


सिद्धार्थ भारतद्वज यांच्याहस्ते माता पिता व पत्नी समक्ष परिव्रजा घेतात. त्यावेळी त्यांचे वय २९ वर्ष असते.

छन्न हा सेवक व कंठक घोडा अनोभा नदीच्या तीरापर्यंत सोबत येतात. सिद्धार्थ आता कपिलवस्तू कडून राजगृहाकडे प्रयाण करतात. राजा बिंबिसार सन्यस्थ होण्यापासून सिद्धार्थाचे मन अनेक प्रलोभने देऊन वळवण्याचा निष्फल प्रयत्न करतात. कपिलवस्तूमध्ये स्त्री-पुरुष घोषणांचे फलक हातात युद्धाचा विरोध करतात व एक लवादमंडळाची स्थापना करून युद्ध कायमचे टाळले जाते.


सिद्धार्थ मात्र परतीचा प्रवास न करता भृगऋषी यांच्याकडे जातात निरनिराळे आत्मक्लेश देणारे तपस्येचे वैराग्य मार्ग तेथे पाहतात. त्यानंतर आलारकालाम यांच्याकडे सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करतात त्यानंतर ते उदक रामपुत्त यांच्याकडून ध्यान व समाधी मार्गाची शिकवणूक घेतात. त्यानंतर निरंजना नदीच्या काठी वैराग्यमार्गाचा अभ्यास करतात. अत्यंत उग्र आत्मक्लेश, पीडा, अन्नत्याग अशी सहा वर्ष जातात. शरिर अगदी जर्जर, पिंजरा व क्षीण होऊन जाते. उरुवेला ठिकाणावरील सुजाताने दिलेल्या खीर प्राशन केल्याने वैराग्य कसोटी भंग होते. त्यानंतर पुन्हा निश्चयाने पिंपळवृक्षाखाली बसून चार आठवडे चार पायऱ्याने त्याने ज्ञान प्राप्त केले.


क्रमश:

Saturday, 4 April 2026

जयंती - 2026




पोस्ट क्रमांक ०१

🟦🟨🟥⬜️🟧


🔹 १. बालपण आणि शिक्षण (१८९१–१९१६)

१८९१ (१४ एप्रिल) जन्म – महू (मध्यप्रदेश)

१९०७ मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण (दलित समाजातील पहिले)

१९१२ पदवी (कला शाखा) पूर्ण

१९१३ वडिलांचे निधन, बडोदा शिष्यवृत्ती मिळून अमेरिकेला प्रस्थान

१९१५–१९१६ कोलंबिया विद्यापीठ येथे पदव्युत्तर शिक्षण. “भारतातील जातीव्यवस्था” या विषयावर संशोधन.


🔹 २. परदेश शिक्षण व करिअरची सुरुवात (१९१७–१९२४)

१९१७ इंग्लंडला शिक्षणासाठी प्रयाण (नंतर शिष्यवृत्ती बंद → भारतात परत)

१९१८ सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक

१९२० (३१ जानेवारी) ‘मूकनायक’ वर्तमानपत्र सुरू.

१९२२–१९२३ कायद्याची पदवी व उच्च शिक्षण पूर्ण (लंडन)


🔹 ३. सामाजिक क्रांतीची सुरुवात (१९२४–१९३५)

१९२४ बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापना.

१९२७ (२० मार्च) महाड चवदार तळे सत्याग्रह

१९२७ (२५ डिसेंबर) मनुस्मृती दहन 

१९३० कालाराम मंदिर प्रवेश आंदोलन (नाशिक)

१९३०–३२ गोलमेज परिषदेत सहभाग

१९३२ (२४ सप्टेंबर) पुणे करार

१९३५ येवले येथे धर्मांतराची घोषणा.


🔹 ४. राजकारण आणि विचारक्रांती (१९३६–१९४६)

१९३६ “जातिभेदाचा नाश” ग्रंथ प्रकाशित.

स्वतंत्र कामगार पक्ष स्थापना

१९३७ निवडणूक विजय

१९४२ व्हाइसरॉयच्या कार्यकारी परिषदेवर कामगार सदस्य.

१९४५–४६ पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना. संविधान सभेत प्रवेश.


🔹 ५. संविधान निर्मिती (१९४७–१९५०)

१९४७ भारताचे पहिले कायदामंत्री, संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष

१९४९ (२६ नोव्हेंबर) भारतीय संविधान स्वीकारले गेले.

१९५० (२६ जानेवारी) संविधान लागू.


🔹 ६. शेवटची वर्षे (१९५१–१९५६)

१९५२ (५ जून) कोलंबिया विद्यापीठाकडून सन्माननीय कायद्याची पदवी.

१९५२ राज्यसभा सदस्य.

१९५६ (१४ ऑक्टोबर) नागपूर येथे बौद्ध धम्म स्वीकार.

१९५६ (६ डिसेंबर) महापरिनिर्वाण (दिल्ली) 

Thursday, 19 March 2026

वैचारिक मतभेद

मला टोकाचे वैचारिक मतभेद मान्य आहेत. कारण विचारभिन्नता ही कोणत्याही व्यक्तीला, समूहाला, संघटनेला व समाजाला अधिक समृद्धच करत असते. ती समाजाची, संघटनेची ताकद असते. वेगवेगळे दृष्टिकोन हे आपल्या भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक माहिती व ज्ञान यावर अवलंबून असतात. त्यामुळे आपसुकच भिन्न अनुभव आणि भिन्न विचारधारा असु शकतात. खरतर यामुळेच समाजात निरंतन चिंतनाची प्रक्रिया चालू राहते. मतभेद असणे हे धोकादायक नसते; उलट ते बौद्धिक प्रामाणिकतेचे आणि स्वातंत्र्याचे लक्षण असते.

प्रामाणिक बुद्धिवंत म्हणजे आपण जे मानतो ते प्रामाणिकपणे मांडणे व आचरण करणे. तर्काने चर्चा करणे आणि गरज पडली तर स्वतःची चूक मान्य करण्याची तयारी ठेवणे. मी म्हणतो केवळ तेच बरोबर हा अट्टाहास न करता. आणखीन, नवीन बाजु अधिक योग्य असु शकते यावर विश्वास ठेवणे होय. 

परंतु; जेव्हा चर्चा सत्य शोधण्यासाठी नसते, तर दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी असते. जेव्हा विचार मांडणे हा उद्देश नसतो, तर बौद्धिक चातुर्य व आकडेवारीचा खेळ करून. दिशाभूल करणे हा हेतू असतो. तेव्हा ती चर्चा राहत नाहीत, ती लबाडी, खोडसाळपणा आणि बौद्धिक दिवाळखोरी ठरते. अशा हुशार असणाऱ्या व्यक्तींना प्रामाणिक बुद्धिवंत म्हणता येणार नाही.

तेव्हा अशी चर्चा केवळ मतभेदांची राहत नाही; ती नैतिक अध:पतनाची सुरुवात असते. कदाचित होऊ घातलेल्या संकटाची पेरणी असते.

म्हणूनच शतदा टोकाचे वैचारिक मतभेद मान्य आहेत. तुम्ही माझ्याशी असहमत असू शकता, माझ्या विचारांवर कठोर टीका करू शकता. त्यात काहीच गैर नाही. पण चर्चा प्रामाणिक असावी, तर्कावर आधारित असावी आणि नैतिकतेची किमान सीमा तरी पाळणारी असावी. कारण एकता म्हणजे आपण सगळे एकसारखे होणे,किंवा एकच ध्येयाप्रती एकसमान वेगाने व दिशेने विचार करणे नव्हे. खरी एकता म्हणजे वैचारिक मतभिन्नता असून व त्या मत स्वातंत्र्याचा आदर करत विविधतेत देखील एकता साधणे होय. 

कारण शेवटी विचारांचा संघर्ष समाजाला पुढे नेतो; पण लबाडी आणि खोडसाळपणा समाजाला अंधाराकडे ढकलतात. म्हणूनच मला अज्ञान व अशिक्षितपणा मान्य आहेत. अशांना सज्ञानी व सुशिक्षित केले जाऊ शकते. परंतु बौद्धिक आणि नैतिक भ्रष्टता अधिक घातक आहे व ती मला कधीच मान्य नाही.

Wednesday, 18 March 2026

शोषितांचे अंधानुकरण


🟦🟨🟥🟧

शोषित वर्ग (वर्ण) म्हणजे: ज्यांचे शोषण होत आहे. शोषण हे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, लैंगिक अशा अनेक अर्थाने व अंगाने असू शकते . भारतात शोषित वर्ग आणि शोषित वर्ण अनेकदा एकाच आहे. हा शोषित वर्ग अनेकदा शोषक वर्गाच्या जीवनशैलीचे (संस्कृती), वर्तनाचे, भाषेचे किंवा (निकृष्ठ )मूल्यांचे आंधळेपणाने अनुकरण करत असतो. ब्राम्हो-भांडवली व्यवस्था तसे करवून घेत असते.

हे अंधअनुकरण प्रामुख्याने मानसशास्त्रीय दडपणातून आणि सामाजिक स्वीकाराच्या इच्छेतून जन्माला येते. शोषित वर्गास वाटते की, असे केल्याने त्यांना समाजात मान-पान , प्रतिष्ठा (सगे-सोयरे ) आणि उच्च स्थान मिळेल.परंतु अशी प्रतिष्ठा अनेकदा आभासी असते. ती बाह्य स्वरूपावर आधारलेली असते, आत्मसन्मानावर नव्हे. शोषित वर्गाने शोषक वर्गाचे आंधळे अनुकरण करणे हा केवळ वर्तनाचा प्रश्न नसून तो मानसिक गुलामगिरी स्वीकारण्याचा प्रकार देखील आहे. मूलत: सत्ता, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान यांच्या परस्परसंबंधांचा तो परीपाक असतो.

प्रथम, या विचारामागील सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे. समाजात जेव्हा आर्थिक, सांस्कृतिक किंवा शैक्षणिक विषमता वाढते, तेव्हा श्रेष्ठत्वाची प्रतिमा शोषक वर्गाशी जोडली जाते. परिणामी, शोषित वर्गाला त्या प्रतिमेचे अनुकरण करणे म्हणजे सामाजिक उन्नतीचा मार्ग आहे असे वाटते. मानसशास्त्रीयदृष्ट्या पाहता, ही कृती स्वीकृतीची गरज आणि निम्नगंड यांमधून उद्भवते. त्यामुळे हे अनुकरण त्यांना तात्पुरती आत्मतृप्ती आणि आभासी सामाजिक प्रतिष्ठा प्रदान करते.

मात्र, या प्रक्रियेत एक मूलभूत विरोधाभास दडलेला आहे. ते स्वीकारतांना शोषक उलट, स्वतःच्या संस्कृतीचा, भाषेचा आणि ओळखीचा त्याग करत असतो.व त्यास दुय्यम स्थान देत असतो. अशा प्रकारचे अनुकरण हे सामाजिक संरचनेतील असमानतेला आव्हान देत नाही; ते त्या असमानतेला अधिक दृढ करते. म्हणूनच शोषित वर्गाने व त्यांच्या वर्तमानातील म्होरक्यांनी याचे ‘भान ठेवावे’.

तथापि, या चिकित्सा करताना एक दुसरा पैलूही लक्षात घ्यावा. सर्वच अनुकरण हे नकारात्मक असते असे नाही. प्रगतीसाठी, शिक्षणासाठी किंवा जीवनमान उंचावण्यासाठी काही मूल्यांचे स्वीकारणे आवश्यक असू शकते. प्रश्न आंधळेपणाचा आहे.जिथे विवेक हरवतो आणि स्वतःची अस्मिता दुय्यम ठरते. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय नाही. तेथे अनुकरण आणि आत्मविकास यांमध्ये भेद करणे आवश्यक आहे. हा भेद उलगडून सांगणे हे जुन्या जाणत्या व प्रज्ञाशीलांचे काम आहे.

शोषितांना आत्मभान जागृत करण्याचा संदेश देऊन. खरी प्रतिष्ठा ही दुसऱ्याचे रूप धारण करण्यात नसून, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून समानतेसाठी उभे राहण्यात आहे. हे अधोरेखीत व्हावे व होत राहावे इतकंच.

Sunday, 8 February 2026

निद्रिस्त जन आणि भरकटलेल्या संघटना

 निद्रिस्त जन आणि भरकटलेल्या संघटना

मी जेथे उभा आहे तेथून मला चळवळी बाबत फार आशादायी चित्र दिसत नाही . मुळात सामाजिक सुधारणावादी चळवळ आणि वैचारिक भुमिकांच्या शेवटाचा हा काळ असावा असे एकूण चित्र आहे . जगभरात भांडवशाही  ही हुकूमशाही सोबत मिरवत आहे. असे असले तरी सामाजिक जाणिवेतून आलेले कार्यकर्ते आणि मोजक्या संघटना खिंड लढवत आहेत. परंतु त्यांच्यापाठी जनसमूह प्रामाणिकपणे उभा राहताना दिसत नाही.  समाजाला आता चळवळीची गरज उरली नाही काय? हा प्रश्न पडावा. अशी स्थिती आहे. कारण ज्यांच्यासाठी कार्यकर्ते हि चळवळ चालवतात त्यांनीच पाठ फिरवलेली दिसते आहे. 


वर्तमान स्तिथीत व्यवस्थेने घडवून आणलेली एक गोष्ट म्हणजे संघटनांची केलेली मोडतोड. संघटित नसल्यामुळे कार्यकर्ते एकाकी लढत आहेत .व्यवस्थेशी थेट दोन हात करत आहेत. मात्र अशा असंघटित लढ्याला चिरडणे, खच्चीकरण व  खिळखिळे करणे. व्यवस्थेला सहज शक्य असते .


सुमारांच्या सद्दीचा हा काळ आहे . असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . माथी भडकावणारी भाषणबाजी आणि त्यात रील स्टार्सनी उथळपणाचे हिडीस प्रदर्शन करण्याची जणू स्पर्धाच सुरु केली आहे .


भुछत्रा प्रमाणे उगवणाऱ्या संघटना आहेत. निवडक तरुण काही तरी करायचे आहे हा उद्देशाने बाहेर पडत आहेत. परंतु त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन करणारे नेतृत्व जवळपास दिसत नाही.


अस्तित्वात असणाऱ्या संघटना नामधारी व बहुतांशी भरकटलेल्या आहेत. सांस्कृतिक दहशतवादाच्या संकटाचे आकलन नसल्याने सांस्कृतिक चळवळीकडे सपशेल कानाडोळा आहे. फसव्या पुरोगाम्यांची धर्माबाबत बोटचेपी भुमिका जैसेथे सुरूच आहे.

मीडियाच्या माध्यमातून विकासाची धुळफेक, धर्माची अफू व द्वेषाची पेरणी करून जनतेला बेअक्कल केले आहे. 


आता पुन्हा सगळे नव्याने सुरू करणासाठी अवधी उरलेला नाही. आपण साध्या शिक्षण संस्था उभ्या करू शकलेलो नाहीत. होत्या त्या सांभाळू शकलो नाहीत. सगळीकडे लोकशाहीच्या स्तंभांची पोखरणी झालेली आहे.

Saturday, 7 February 2026

चळवळीची गरज काय?

 मुळात या देशात सामाजिक, आर्थिक, धार्मिक, लैंगिक विषमता हजारो वर्षापासून आहे; आणि ही विषमता फक्त व्यवहारात नसून व्यक्तींच्या विचारात, मना-मनात ठासून भरलेली आहे. ही विषमता कायम त्यांच्या मनात धगधगती राहो यासाठी काही समाज विघटनकारी शक्ती कायम कार्यरत असतात. अगदी या विषमतावादी व्यवहाराला वैचारीक समर्थन व पाठबळ देणारी पुस्तके, धर्मग्रंथ देखील लिखीत आहेत. या विषमतावादी विचारांच्या संघटना मग त्या राजकीय , धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक स्तरावरील असतील. जाती वा या जातींचा  मिळून तयार झालेला शोषक वर्ग असेल. संस्कृतीच्या नावाने आर्थिक शोषण करणारे, वैचारिक दारिद्र्य देणारे असतील अथवा शैक्षणिक क्षेत्रात कायम स्वतःचे अजिंडे पिढ्यान पिढ्या राबवणारे भामटे असतील.हे सर्व या विषमतावादी व्यवस्थेला बळ देत असतात. स्वतःच्या स्वार्थासाठी  विषमतावादी व्यवस्था पुढे नेत असतात. बहुसंख्य समाजाचे शोषण करत असतात.








जोपर्यंत ही विषमतावादी शोषण करणारी व्यवस्था आहे. त्या विषमतावादी व्यवस्थेचे लाभार्थी व पुरस्कर्ते आहेत. अन्याय करणारे अन्यायकर्ते आहेत. शोषण करणारे शोषक आहेत. जातीवाद करणारे जात्यांध आहेत. 


अगदी उलट त्याच्या दुसऱ्या बाजूला शोषित आहेत. जे पीडित आहेत. दीन दलित व वंचित आहेत. जेव्हा-जेव्हा शोषितांना गुलामीची, अन्याय अत्याचाराची जाण होईल. स्वाभिमानाची जाग येईल. 

तेव्हा त्या व्यक्तीला, समाजाला, देशाला चळवळीची गरज असेल. 


प्रस्थापितांच्या विरोधात ज्यांना- ज्यांना म्हणून स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय हवा आहे. त्यांना चळवळीची गरज आहे. प्रत्येक काळात स्वतःच्या न्याय हक्कासाठी बंडाचे निशाण घेऊन लढाईच्या मैदानात उतरणाऱ्या सैनिकांना चळवळीची गरज आहे. सामाजिक अस्थिरता, अगतिकता व अल्पसंख्यांकांच्या दडपशाहीच्या काळात तर चळवळी शिवाय त्यांना गत्यंतर नाही. चळवळ करणे हा त्यांच्या जगण्याचा अपरिहार्य भाग आहे. त्यांना जगण्यासाठी देखील चळवळ करावी लागेल. ज्यांना गुलामीच्या बेडीतुन मुक्त व्हायचं असेल ;तर त्यांना चळवळ करावी लागेल. जरी ते थेट चळवळीत नसतील तरी चळवळ नाकारण्याचे प्रिव्हिलेज त्यांच्याकडे नाही. त्यांचे जिवंत असणेच हे चळवळ आहे. तुमचे उच्च शिक्षण घेणे, तुमचे उंची कपडे परिधान करणे, मोठ-मोठ्या हुद्यावर काम करणे, तुम्ही नेतृत्व करणे हे सगळे चळवळ आहे. कारण या सगळयालाच त्यांचा विरोध आहे.


त्यामुळे जोपर्यंत विषमतावादी व्यवस्था आहे. तोपर्यंत आपसुकच चळवळ असेल. ही संविधानवादी व्यवस्था टिकवून ठेवणे हे या चळवळीचे काम आहे. 

Saturday, 27 December 2025

माणसं











माणसं पोरकी असतात..

अनेक अर्थाने.. 

कधी उन्मळून पडतात.


खूप बोलणारी माणसे रीती होतात अनेकदा..हातच काहीही न ठेवता. भर-भर बोलतात आणि विसरून जातात. 


काही बोलत राहतात. तेच-तेच, तेच-तेच.. कुरवाळत राहतात. सुखाला, दुःखाला..मोठं करतात प्रतिमेला. स्वतःहून, स्वतःपेक्षा अनेकदा…


न बोलणारी माणसे. आसुसलेली असतात.ऐकायला…. तुम्ही त्यांना ओरडा-बोला. ती ऐकत राहतात फक्त.. तंद्री लागल्यासारखी.. ती कुणाच्याही प्रेमात पडतात. त्यांना सगळेच चांगले भासतात. प्रेमात असतात प्रेमाच्या, चांगुलपणाच्या..


अगदी शेवट पर्यंत…

शेवटा पर्यंत. आनंदाने.

ते खूप बोलतात- खूप बोलतात स्वतःशी.. एकांताशी.. गप्पा करतात स्वप्नांशी,चित्र रंगवतात..कधी घाबरतात. पळतात,रडतात. कधी पडतात,धडपडतात,घडतात..कधी रेंगाळतात जिवन प्रवासात… चित्रावर, मित्रावर,रंगावर, गंधावर..ढेपाळतात. सावरतात स्वतःला. मग लपतात,लपवतात स्वतःला, स्वप्नाला

अनेकदा..

मग ती घाबरतात. त्यामुळे चिडचिड करतात..रागे भरतात सगळ्यांना…भीती पोटी.

ती प्रेमानेच बोलतात पण मोठ्याने..आतला आवाज दाबण्यासाठी.


माणसं ती…. चुकतात. शिकतात. काही फूलतात, काही गळतात.. मागे पडतात. त्याचं गाळात. 


काही संपतात..

उरतात..कायमची.  

Saturday, 20 September 2025

परिवर्तन


 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म का स्वीकारला त्याचं स्पष्ट आणि सरळ उत्तर बाबासाहेबांनी दिल आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की, बाबासाहेबांनी अनेक धर्मांचा आणि पंथांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांना त्यांच्या बुद्धीला पटला. तो धम्म, ते विचार त्यांनी स्वीकारले आहेत. त्यामुळे विचारांच आपलं एक महत्त्व आहे. यात काही शंका नाही. 


परंतु अडीच हजार वर्षांपूर्वी जो धम्म या देशाचा प्रमुख जीवन मार्ग होता. तो धम्म या भूमीवरती संपुष्टात आला होता. अर्थात बाबासाहेबांनी जर त्याला  पुनर्जीवित केले नसते; तर भारतात बौद्ध धम्म पुन्हा गतिमान झाला असता का? तर याचे उत्तर नाही असे मिळते. 


त्यामुळे सदर दोन मुद्द्यातून हे स्पष्ट होते विचार चांगले असले की ते कालातीत असतात. परंतु असे असले तरी त्या विचारांचे लोक,विचार प्रचार प्रसार व संरक्षण करणारे लोक जर नसतील; तर विचार कितीही चांगला असला तरी तो कायमचा संपुष्टात येऊ शकतो. हे बाबासाहेबांनी देखील म्हटले आहे.


त्यामुळे वरील मुद्द्यातून हे स्पष्ट होते की विचाराला राजश्रय आणि लोकाश्रय दोन्हीही मिळाले तरच तो टिकतो. आजच्या भाषेत राजकीय पाठबळ असेल तरच अधिक विस्तृत होतो.


उदाहरण दाखल आपण बुद्धांकडे वळूया. बुद्ध हे राजपुत्र होते. बुद्ध हे अडीच हजार वर्षांपूर्वी राजपुत्र होते आणि साधेसुधे राजपुत्र नसून सुखाच्या पायघड्या त्यांच्या पायाशी लोळण घालत होत्या असे अत्यंत विलासित जीवन ते व्यतीत करत होते. आता विचार करा अडीच हजार वर्षांपूर्वी असा सुंदर आणि श्रीमंत राजपुत्र जर गृहत्याग करत असेल तर त्याचा परिणाम  इतर जनमानसात व राज संबंधात सर्व दूर पोहोचल्यानंतर त्याचे ऐतिहासिक परिणाम होणार नाहीत का? मला येथे सांगायचं आहे की बुद्ध हे राजपुत्र होते.  सत्तेशी- शक्तीशी जवळचे असल्यामुळे जनमानसावरती ऐतिहासिक प्रभाव टाकणे व पडणे साहजिक होते. त्या काळात अहिंसा,शांतता प्रिय इतरही धर्म, पंथ ,विचार व प्रचारक होते. अडीच हजार वर्षांपूर्वी गृहत्याग करून अंतिम सत्य शोधण्यासाठी न जाणो कित्येक जीव डोंगरदर्या खोऱ्यात फिरत होते. बुद्धांच वेगळ पण त्यांच्या सामान्यजनापासून वेगळ असण्यात आहे. त्यांच्या राजपुत्र असण्यात आहे. हे मला येथे नमूद करावयाच आहे. विचार करा जर बौद्ध धम्माला राजश्रय प्राप्त झाला नसता. तर त्याला लोकश्रय प्राप्त झाला असता का? देशा परदेशात धम्म पोहोचु शकला असता काय?


अजून उदाहरण पाहू. लक्षात घ्या बुद्ध राजपुत्र होते. महात्मा फुले हे एक श्रीमंत आजच्या भाषेत बिल्डर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील त्या काळात मिलिटरी मध्ये शिक्षक होते. जेव्हा दलितांना शिक्षणाचा गंध देखील नव्हता. तेव्हा बाबासाहेब या जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये पदव्या घेत होते. बाबासाहेब जेव्हा मॅट्रिक उत्तीर्ण झाले तेव्हा दस्तूरखुद्द केळुस्कर गुरुजी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला आहे. राजश्री शाहू महाराजांचा राजश्रय त्यांना लाभला आहे. सयाजीराव गायकवाड यांचे सहकार्य त्यांना लाभले आहे. ही गोष्ट त्या काळातली आहे जेव्हा अस्पृश्यांना माणूस म्हणून जगण्याचाही अधिकार नव्हता. लक्षात घ्या बाबासाहेब ब्रिटिश राजवटीत देखील प्रबळ नेता व मंत्री होते. गांधींच्या व काँग्रेसच्या काळात देखील ते संविधानाचे निर्माते व मंत्री होते. सत्ता आणि शक्ती बाबासाहेबांचा हातात असल्यामुळे अनेक धाडसी निर्णय व कार्य ते करू शकले. ही सत्तेची किमया बाबासाहेब भलीभाती जाणत होते.


मला येथे हे सांगायचं आहे की ही चळवळ चालवण्यासाठी राजश्रय व लोकश्रय खूप महत्त्वाचा असतो. शक्तीचे स्त्रोत तुमच्या हातात असल्याखेरीज तुम्ही विधायक काम करू शकत नाहीत. सम्राट अशोक जर राजा नसते तर ते इतके शिलालेख व धम्मकार्य निर्माण करू शकले असते काय? ते शिलालेख लिहिणाऱ्या किती सामान्य कारागिरांची नावे आपल्याला ज्ञात आहेत? त्यामुळे सत्ता नेहमी महत्त्व ठेवून असते.


मार्क्सवादाचे उदाहरण घेऊ. कार्ल मार्क्स हयात असताना मार्क्सवाद किती फोफावला? आणि त्यानंतर लेनिन जेव्हा सत्तेत आला त्यानंतर मार्क्सवादाचे स्वरूप आणि आवाका किती मोठा होता हे आपण नजरेआड करून चालणार नाही.


आता वर्तमानाकडे येऊ या. भारतातील जेवढे काय म्हणून अब्जाधीश श्रीमंत लोक आहेत ते आपसूकच जातीने सवर्ण वर्गातून कसे येतात? संख्येने केवळ तीन ते पाच टक्के असणारे हे लोक भारतीय अब्जाधीशांच्या यादीत 90 ते 95 टक्के जागा व्यापून आहेत. हा केवळ योगायोग नाही. जगभरात देखील स्थिती काही फार वेगळी नाही. जगभरातील 90% साधन संपत्ती ही केवळ तीन ते पाच टक्के लोकांकडे आहे. आणि तरीही सर्व काही अलबेल सब चंगा सुरू आहे.


या देशातील जेलमध्ये जाणारे लोक बेल न मिळाल्याने जेलमध्ये कोंबलेले लोक कोणत्या वर्णाचे व कोणत्या वर्गाचे आहेत? हे गुपित सत्य आहे.


या देशातील सर्वोच्च न्यायालय व सुप्रीम कोर्टातील जज कोण आहेत. या देशातील निरनिराळ्या इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्री, व्यापार, सोने-चांदीचे, हिरे व्यापार, शेकडो एकर जमिनीचे मालक कोण आहेत हे उघड सत्य आहे.


ललित मोदी, नीरव मोदी, मेहुल चौकसी, विजय मल्या, जतिन मेहता या सर्वांची जातकुळी कोणती? 

एका ठराविक वर्गाच्या हातात येथील व्यवस्था राहिली आहे. नीरा रडिया टेप केस यांची साठ गाठ उघडी पाडते. 


देशातील गरीब जनतेला मग डुकरांना कोंबावे व खाणे द्यावे तशी स्थिती आहे. ८० कोटी लोकांना अल्पदरात (निकृष्ट) धान्य दिले जाते. लाडकी बहीण, भाऊ योजना दिली जाते. मूळ समस्यांवर बगल देऊन. धर्मांधतेची फोडणी दिली जाते.


हे सगळे बदलण्यासाठी व विधायक रित्या परिवर्तन करण्यासाठी बहुसंख्य बहुजनांने आर्थिक सत्तेचे, राजकीय सत्तेचे महत्व समजून घेतले पाहिजे व त्या अनुषंघाने नियोजन केले पाहिजे इतकंच.

Sunday, 31 August 2025

तुमचा पुरोगाम्यांवर विश्वास नाही. का?

 



तुमचा पुरोगाम्यांवर विश्वास नाही. का? त्यांनी असे काय करावे ज्यामुळे विश्वासार्हता येईल?

सदर प्रश्नावर माझे उत्तर मी येथे देत आहे.

———-

भारत स्वातंत्र्य झाला. परकीय उच्चभ्रू इंग्रजांकडून भारतीय उच्चभ्रू नेत्यांकडे शक्तीचे हस्तांतरण करण्यात आले. ते आजतागायत राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा अनेक आघाड्यांवर टिकून आहे. त्यामुळे लोकशाही हि जरी "एकमत म्हणजे एक मूल्य" असे कागदोपत्री सांगत असली तरी; हि बहुसंख्य प्रतिनिधित्व लोकशाही आहे. तुमच्या मताला येथे केराची टोपली दाखवली जाते हि वास्तविकता आहे. अनुपाती प्रतिनिधित्व (Proportional Representation) देणारी निवडणूक पद्धती असती तर आपल्याला तसे म्हणत आले नसते. स्वातंत्र्यानंतरही अशी व याहून विदारक स्थिती असल्या कारणाने येथील बुद्धिजीवीवर्ग काय करतोय हे पाहणे क्रमप्राप्त होते .


पुरोगामीवर्ग हा भारतीय बुद्धीजीवी वर्ग आहे आणि तो उच्चभ्रू देखील आहे. तो खरंच बुद्धिजीवी आहे का तो विषय निराळा. असो.  तरीही अशी एक साधारण मान्यता आहे. जनसामान्य नेहमी या उच्चभ्रू / बुद्धिजीवी वर्गाचे अनुकरण करत असतो. त्यामुळे या वर्गावर आपसूकच अधिकची नैतिक जबाबदारी येते. पुरोगामी हे आंबेडकरी चळवळीचे उघड मित्र आहेत? बाबासाहेबांमुळे जसे गांधीजी बदलत व अधिक वृद्धिंगत होत गेले. असे पुरोगामी म्हणतात. तसे पुरोगम्यांनी देखील आंबेडकरवाद्यांकडून शिकावे व अधिक व्यापक व मूळ भूमिकेवर यावे असे माझे मला वाटते. 


त्यामुळे तत्सम बुद्धीजीवी वर्गाने केवळ आंबेडकरी विचारमंचावर, आंबेडकर नगरात, आंबेडकरी जनतेला बुद्ध आणि बाबासाहेब भाषणातून सांगण्याची तितकीशी गरज उरली नाही. त्या उलट इतर मोठमोठ्या वस्तीत, सण-उत्सवात प्रामुख्याने प्रबोधनाचे कार्यक्रम करावेत.ज्यांच्यावर अन्याय झालाय व ज्यांनी बौद्धधम्म व आंबेडकरवाद स्वीकारलाय अशा शोषितांनाच भाषणं देण्यात काय हाशील ? शोषितांचे नेतृत्व हडपण्याची ही कला असू शकते फार तर. जे अन्याय करतात आणि जे शोषक आहेत त्यांचे परिवर्तन पुरोगाम्यानी करावे. ते खरे कार्य होईल.


आंबेडकर वादाचा अभ्यास व अनुभव आंबेडकरवाद्यांना जास्त आहे. आंबेडकरी विचारवंत केवळ एट्रोसिटी व समाजकल्याण विभाग यापुर्ती सीमित नाहीत. त्यामुळे पुरोगाम्यांनी आंबेडकरी नेत्यांना व विचारवंतांना त्यासाठी पाचारण करावे. यासाठी त्यांनी श्रीधर टिळकांचा आदर्श घ्यावा.


या पुरोगामी / बुद्धीजीवी मंडळीने श्रीधर टिळकांच्या प्रमाणे SSD स्थापन करावी. नुसते भाषण न देता कृतीतून रिपब्लिकन, वंचित सारख्या पक्षात प्रवेश करावा. धर्मांतर करून बौद्ध व्हावे. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन, पाठिंबा द्यावा. बाबासाहेब स्वीकारताना संविधानिक बाबासाहेब, राजकीय बाबासाहेब व धार्मिक बाबासाहेब असे वेगवेगळे व सोईस्कर बाबासाहेब न स्वीकारता समग्र बाबासाहेब स्वीकारावेत. भाषणात बाबासाहेबानी १९५६ धम्मक्रांती केली सांगायची आणि व्यक्तिगत जीवनात अंगीकार नाही करायचा. हा मुखवटेबाजपणा नव्हे काय? बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, लोकशाही सामाजिक समतेशिवाय चालू शकत नाही.


स्कॉलरशिप, आरक्षण, एट्रोसिटी, बैकलॉग भरणा, जल-जमीन-जंगल समान वाटप, झोपडपट्टी बचाव यासाठी मोर्चात यावे. मोर्चात येऊन, नेते न बनता. कार्यकर्ता बनावे. शाहू महाराजांकडून हे गुण त्यांनी शिकावेत. 

पुरोगामी व प्रतिगामी अशा दोन्ही छावण्यात नेतृत्व उच्चवर्णीय असेल तर झाले कल्याण. त्यामुळे आंबेडकरवादी चळवळीने खोट्या पुरोगामी, बुद्धिजीवी लोकांपासून अंतर ठेवावे, यामागे काही मूलभूत वैचारिक आणि व्यावहारिक कारणे देखील आहेत. 


वैचारिक भिन्नता:

आंबेडकरवादी चळवळ ही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित आहे, जी प्रामुख्याने जातीव्यवस्थेच्या विरोधात आणि शोषित-वंचित समाजाच्या उत्थानासाठी लढते. पुरोगामी विचारसरणी, जरी ती सामाजिक बदल आणि समानतेची भाषा बोलत असली, तरी बऱ्याचदा ती उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय दृष्टिकोनातून येते. यामुळे ती जातीच्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने समजून घेण्यात किंवा त्यावर ठोस उपाययोजना करण्यात कमी पडते. बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता, कारण ती प्रत्यक्षात जातीच्या मुद्द्यांना टाळते किंवा त्यांचे गांभीर्य कमी करते.


त्यांचे लक्ष प्रामुख्याने आर्थिक विषमता, धर्मनिरपेक्षता किंवा इतर व्यापक मुद्द्यांवर असते. याउलट, आंबेडकरवादी चळवळीचा मुख्य केंद्रबिंदू आहे जातीचा प्रश्न आणि त्यामुळे होणारा सामाजिक भेदभाव आहे. 


सांस्कृतिक आणि ऐतिहासिक फरक:

पुरोगामी विचारसरणी बऱ्याचदा हिंदू धर्मातील सुधारणांवर आधारित असते, ज्यामध्ये हिंदू संस्कृती आणि परंपरांचा स्वीकार काही प्रमाणात असतो. याउलट, आंबेडकरांनी हिंदू धर्मातील जातीव्यवस्था आणि त्याच्या मूळ संरचनेला नाकारले आणि बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे आंबेडकरवादी चळवळ हिंदू संस्कृतीच्या सुधारणांपेक्षा संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनावर भर देते. पुरोगामी लोकांचा हिंदू संस्कृतीशी असलेला संबंध आंबेडकरवादी चळवळीच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत आहे. 


राजकीय स्वार्थ आणि वापर:

बऱ्याचदा पुरोगामी गट किंवा राजकीय पक्ष आंबेडकरवादी चळवळीचा वापर आपल्या राजकीय फायद्यासाठी करतात, पण दलित आणि शोषित समाजाच्या खऱ्या समस्यांना प्राधान्य देत नाहीत. उदाहरणार्थ, काही राजकीय पक्ष आंबेडकरांचे नाव घेतात, पण त्यांच्या विचारांचा खरा अंमल करताना दिसत नाहीत. अन्याय अत्याचाराच्या शेकडो घटना या काळात घडल्या आहेत. त्यावेळी पुरोगामी भाषणबाज लोक मुग गिळतात.  न्याय मिळत नाही. खैरलांजी, सोनाई, शिर्डी, जवखेडा, नितीन आगे, लातूर, बुलढाणा शेकडो प्रकरणात न्याय नाही. ७००० प्रकरण प्रलंबित आहेत. याउप्पर बावडा, वरळी दंगल, बीडीडी चाळ, नामांतर, पँथरवर केसेस, हिंदू कोड बील प्रकरण असे अनेक ठळक हल्ले झालेत ज्यात वेळेवर न्याय नाही.

मंडल कमिशन असेल,आरक्षणचा बॅकलॉक असेल, शिष्यवृत्ती कपात असे अनेक विषय आहेत. ज्यांत  न्यायसंगत भूमिका नाही किंवा अनुल्लेखाने मारण्याचे प्रकार आहेत. 

 

पुरोगामी राजकीयसत्ता बदलाची भाषा व अवाहन करत असतात. परंतु सत्ता असताना ते अपेक्षित कार्य करत नाहीत. राजकीय सत्ताबदल हे कागदोपत्री होत असतात. त्याउप्पर सांस्कृतिक सत्ताबदल हा मोठा, स्थायी व करण्यास अवघड असतो. पुरोगामी प्रतिगाम्यांसोबत साटेलोटे असल्यासारखे उगी मलमपट्टी करत बसतात. समग्र परिवर्तन करण्यासाठी व खरा सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय बदल करण्याची प्रामाणिक धमक दाखवत नाही.


स्वायत्ततेची गरज:

अल्पसंख्यांकांना जगभरात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वायत्ततेची गरज लागते.

आंबेडकरवादी चळवळीने आपली स्वायत्तता आणि स्वतंत्र ओळख कायम ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून ती आपल्या ध्येयापासून विचलित होणार नाही. पुरोगामी गटांशी खूप जवळीक ठेवल्यास चळवळीचे मूळ उद्दिष्ट, म्हणजे दलित आणि शोषित समाजाचे सक्षमीकरण, धोक्यात येऊ शकते. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनसारख्या स्वतंत्र संस्था स्थापन करून ही स्वायत्तता दाखवली होती.

Thursday, 19 June 2025

भांडा सौख्यभरे

 



नातं कोणतही असो मित्र-मैत्रिणीच, पती-पत्नीच, भावा- भावच, बाप-लेकाच अथवा दुसरे कोणत. नात्यात कायम गोडी गुलाबीचे दिवस असत नाहीत. असले तर त्या नात्यात कुणीतरी एक वरचढ अथवा एडजस्टमेंट करत असतो. भांडण अथवा चर्चा ही अनेकदा दोन स्पर्धकांमध्ये होत असते. बॉस आणि कर्मचारी यांत ऑर्डर्स दिल्या व पाळल्या जातात. तेथे भांडण उद्दभवत नाही. झालीच तर धुसफूस होते. कारण भांडण करण्यासाठी बोलण्याचं व मत मांडण्याचे स्वातंत्र्य असणे ही पूर्वअट असते. नात्यात भांडण होत नसेल तर शक्यता आहे की, ते दिखावू असेल. कारण म्हणतात ना शेंदूर खर्वडल्याशिवाय देव की दगड हे कळत नसत.


भांडणाने अनेकदा मुद्याची चिकित्सा,समीक्षा होते. त्या मुद्याचे निरनिराळे कांगोर समोर आणले जातात. माझा मुद्दा किंवा माझे मत कसे बरोबर आहे हे पटवण्यासाठी अनेक अंगाने विचार मांडले जातात. समरूप उदाहरण दिली जातात. तुमच्या ज्ञानाची, अनुभवाची, भाषेची, व्यक्तिमत्वाची, आकलनाची, पटवण्याच्या क्षमतेची तेथे कसोटी लागते.


तुमचा मुद्दा पटवून देताना तुम्ही कसली मदत घेता त्यावरून तुमची स्व:ची ओळख समजत असते. तुम्ही तत्वद्यानाची व वैचारिक भिस्त लढवता? शिव्या श्राप व हिंसक भाषेवर उतरता? हात पाय चालवून बळाचा वापर करता? हे सगळं तुमच्या आतील माणसावर, कळत नकळत घडलेल्या संस्कारावर अवलंबून असते.



अनेकदा आपण कशासाठी कुणासाठी व कुणासोबत भांडत आहोत हेच अनेक लोक विसरून जातात व भांडण हा मुद्दा बनतो. मुद्यावर भांडण राहत नाही. त्यातून काय मिळणार याचा विचार बाजूला पडून काय बरोबर या पेक्षा मी बरोबर यावर लोक भांडत बसतात. या अहंकार व मी पणाच्या भांडणाला अंत राहत नाही. त्यामुळे मूर्खांशी भांडण देखील करू नये असे म्हणतात ते उगीच नाही.


तुमच्या जिवनात तुमच जिवन समृद्ध करणारे भांडखोर लोक आहेत की कायम मानसिक उच्छाद मांडणारे लोक आहेत यावर खूप काही निर्भर करते.


कॉन्फिडेंट असणारे अनेक लोक मला मूर्ख, श्रीमंत असणारे सरंजामी व भांडणारे स्पष्टोक्ते वाटतात.

Sunday, 18 May 2025

बुद्ध पोर्णिमा (१२ मे, २०२५) पोस्ट क्रमांक ०३

बुद्ध पोर्णिमा (१२ मे, २०२५)    पोस्ट क्रमांक ०३

 


————————————

बौद्ध धम्म हा रूढ अर्थाने धर्म नसून ते तत्त्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान शिकवण्याची बौद्ध धम्म ही एक शिक्षण पद्धती आहे. स्वतः भगवान गौतम बुद्ध वयाची ४५ वर्ष चारिका करून धम्म सांगतात, धम्म शिकवतात. स्वतः तथागत भगवान बुद्ध एक आदर्श शिक्षक,गुरु आहेत. त्यांनी निर्माण केलेला संघ ज्याला आदर्श शिक्षण दिले जात होते. व तो संघ जगभरात बौद्धतत्त्वज्ञानाची शिकवण सद्धधम्माची शिकवण, शिक्षण देत होता. या धम्म आणि संघापासून निर्माण झालेली विहारे, लेण्या हे बौद्ध शिक्षणाचे शैक्षणिक स्थान होते. 


बौद्ध धम्माचा हेतूच या जगाची पुनर्रचना करणे हा आहे. त्यासाठी धम्मात माणसाच्या मनाला योग्य वळण लावण्यावर सर्वाधिक भर दिला गेला आहे. बुद्ध धम्मात (प्रतुत्य समुत्पादात) सर्व दुःखाचे मूळ कारण म्हणजे अज्ञान असे सांगितले आहे. माणसाचे अज्ञान नष्ट करण्यासाठी त्याला योग्य ते शिक्षण दिले पाहिजे. शिक्षणात त्याची प्रगती होण्यासाठी त्यांनी आपले मन केंद्रित केले पाहिजे .कारण शीलवान मनुष्य आपले मन केंद्रित करू शकतो. जो मनुष्य शीलवान नाही; तो आपले मन केंद्रित करू शकत नाही. त्याचे मन इकडे तिकडे भटकत राहते म्हणून खरंतर बौद्ध धम्मात मनाच्या संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नीतिमत्ता, मनाची एकाग्रता आणि यथाभूत ज्ञान आलेले शहाणपण म्हणजेच शील,समाधी आणि प्रज्ञा या भगवान बुद्धांनी दाखवल्या मार्गाच्या पायऱ्या शिकविल्या जातात. 


तथागत भगवान गौतम बुद्धांची शिकवण्याची एक पद्धती होती. ते त्यांना जो सांगावयाचा मुद्दा आहे. त्याचे पूर्ण विश्लेषण करून सांगत. त्या मुद्द्याचे बारीक-सारीक अंग प्रत्यांग सांगितले जायचे. आपला मुद्दा पटवून देताना भगवान बुद्ध उपमा, उत्पेक्षा रूपक यांचा वारंवार उपयोग करीत असत. प्रामुख्याने दररोजच्या व्यवहारात आढळणाऱ्या उदाहरणांचा दाखला दिला जात असे. तथागत प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देत असत. चर्चेतून त्या मुद्द्याला अधिक स्पष्ट करून सांगावयाला ते लावत असत. जर त्यांना तो मुद्दा आवडला नाही तर त्याबद्दल ते विरोधी पक्षाची हेटाळणी करत नसत. तर ते विरोधी पक्षाला प्रश्न विचारून अधिक गोंधळात पाडत असत. त्या प्रतिप्रश्नांमुळे विरोधी पक्षाला मिथ्या धारणांची जाणीव करून देत असत. किंबहुना त्याच्याकडून त्या मिथ्या धारणेबद्दल वदवून घेत असत. अशा तऱ्हेने प्रश्नोत्तरांची अनेक उदाहरणे  सुत्त पिटक, विनयपिटकात जागोजागी पाहावयास मिळतात. 


तथागत भगवान गौतम बुद्ध चर्चा करतांना प्रवचन देतांना अथवा वादविवाद करतांना आपल्या विद्यार्थ्यांची, श्रोता वर्गाची बौद्धिक पातळी लक्षात घेऊन त्यांच्याशी त्या पातळीवर बोलत असत. भगवान बुद्धांनी केवळ मौखिक ज्ञानाला महत्त्व दिले नाही. तर आचरणत्मक ज्ञानाला त्यांनी अधिक महत्त्वाचे मानले. 


भगवान गौतम बुद्धांची शिकविण्याची आणखीन एक अनोखी पद्धत होती. ते शोध घेऊन स्वतः शिकणे या पद्धतीचा उपयोग देखील करत.  किसा गौतमीचे उदाहरण आपण पाहू शकता. किसा गौतमीला शोध घेऊन आणि स्वतः शिकण्यास बोध घेण्यास त्यांनी प्रवृत्त केले. 


आकृती काढून किंवा चित्ररूपात विषय समजावून घेण्याची पद्धती भगवान बुद्धांच्या काळात अस्तित्वात आली. दिव्यवनात महामोग्घलायन प्रत्युत्य समुत्प्पाद शिकविताना बारा निदान (कड्या)असल्याची आकृती काढून शिकविले आहे.


शिकण्याविषयी आणि शिकविण्या विषयाची भगवान बुद्धांची मते महत्त्वाचे आहेत. सिगाल सुत्तात 

भगवान बुद्धांनी शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांचे कर्तव्य सांगितले आहेत. 


भगवान बुद्धांनी लोकांना धम्म शिकवण्याचे ठरविल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, एवढ्या मोठ्या प्रदेशातील लोकांना धम्म शिकवण्यासाठी लोकांत जाऊन त्यांच्या भाषेत धम्म समजावून सांगणारे प्रशिक्षित शिक्षक हवेत. त्यांनी त्यासाठी त्या शिक्षकांचा एक संघ त्यांनी स्थापन केला. त्या संघाचे व्यवस्थापन नीट करण्यासाठी विनयाचे नियम बनविले.

बुद्धांनी पहिल्यांदा साठ भिक्खूंना प्रशिक्षित केले. प्रशिक्षित केलेल्या त्या भिक्खूंना बहुजनांत जाऊन धम्म शिकवण्यास सांगितले.


“धम्म साकच्छा” म्हणजे धम्म विषयक चर्चा करणे. भगवान बुद्धांनी शिकवलेल्या धम्मतत्वज्ञानाचे स्पष्टीकरण करणे, मूल्यमापन करणे आणि त्याचे विश्लेषण करणे. हे एक देखील संघाचे महत्त्वाचे बौद्धिक कार्य होते. या “धम्म साकच्छा” मुळे अभिधम्मपिटकासारखे त्रिपीटकातील ग्रंथ निर्माण झाले. धम्म साकच्छा चे ठळक उदाहरण म्हणजे “मिलिंद प्रश्न” मिलिंद पन्नास भिक्खु नागसेन आणि राजा मिलिंद यांची धम्मावर झालेली चर्चा होय.


बौद्ध धम्माच्या शिक्षण पद्धतीतूनच पुढे नालंदा,विक्रमशीला,तक्षशिला,ओदांतपुरी, घोसरावा, सोमपुरी,जगद्दल इत्यादी उत्तर भारतातील आणि वल्लभी, अमरावती, कान्हेरी, अजंठा, नागार्जुनकोंडा, कांची इत्यादी दक्षिण भारतातील विश्वविद्यालय निर्माण झाली. 


भारतातील सर्वधर्मांची तुलना करता असे दिसून येते की, 

बौद्धांनी सर्वात प्रथम साक्षरतेचे महत्व जाणले इसवी सन पूर्व 84  साली बौद्धांनी सर्व त्रिपिटक लीपीबद्ध केले. छांद किंवा छांदस ही त्यावेळीची वैदिक भाषा होती. संस्कृत भाषा ही भगवान बुद्धांच्या नंतर २०० वर्षांनी पालीचे भाषांतर संस्कार करून बनवली म्हणून त्या भाषेला संस्कृत असे म्हणतात.


भारतात वैदिक ब्राह्मणी धर्माच्या आणि जैन, लोकायत वगैरे इतर धर्मांच्या विरोधाला बौद्धांना तोंड द्यावे लागले. प्रतिस्पर्तांशी वादविवाद करण्यासाठी लागणारे कौशल्य वाढवण्यासाठी आणि स्पर्धकावर मात करण्यासाठी बौद्ध शिक्षण पद्धतीत व अभ्यासक्रमात बदल होऊन धम्माशी प्रत्यक्ष संबंध नसलेले औषधोपचार शास्त्र,  खगोलशास्त्र,गणित इत्यादी लौकिक विषय सुद्धा बौद्ध शिक्षणातून शिकवले जाऊ लागले. बुद्धांनी भिक्खूंना तिथीचा जाणकार होण्यास सांगितल आहे.


बौद्ध समाजाचे मुख्य दोन विभाग आहेत. एक “संघ” आणि दुसरा “उपासक” संघ हा पुरुष व महिला भिक्खू संघाचा मिळून बनलेला असतो. हा भिक्खू संघ त्यांच्या ठाई असणाऱ्या शिक्षण, ज्ञानामुळे होय.

बुद्ध पोर्णिमा (१२ मे, २०२५) पोस्ट क्रमांक ०२

बुद्ध पोर्णिमा  (१२ मे, २०२५)    पोस्ट क्रमांक ०२

 



तथागत भगवान गौतम बुद्धांनी प्रामुख्याने चार आर्य सत्य सांगितले. 

१. जगात दुःख आहे.

२. दुःखाला कारण आहे. 

३. ⁠दुःख निरोध तृष्णेच्या नाशातून दुःख निरोध करता येतो.

४. ⁠दुःख निरोधगामीमार्ग 


दुःख निरोधगामी मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग.

१. सम्यक दृष्टी 

२. ⁠सम्यक संकल्प 

३. ⁠सम्यक वचन 

४. ⁠सम्यक कर्म 

५. ⁠सम्यक जीविका 

६. ⁠सम्यक प्रयत्न 

७. ⁠सम्यक स्मृती 

८. ⁠सम्यक समाधी 


गाडीच्या चाकाला बारा कड्या असतात तसे दुःखाला बारा निदाने,कारण वा हेतू असतात असे बुद्ध म्हणतात.


बौद्ध धर्मातील द्वादश निदान (१२ कड्या) म्हणजेच प्रतीत्यसमुत्पादाची साखळी पुढीलप्रमाणे आहे:

१. अविद्या (अज्ञान)

२. संस्कार – कर्म आणि मानसिक

३. विज्ञान – चेतना 

४. नामरूप – शरीर आणि मन

५. षडायतन – सहा इंद्रिये 

६. स्पर्श – इंद्रिय आणि विषय

७. वेदना – (आनंद, दुःख इत्यादी)

८. तृष्णा – इच्छा किंवा आसक्ती

९. उपादान – आसक्तीला ठेवणे हाव

१०. भव– (अस्तित्व)

११. जाति – जन्म

१२. जरामरण – वार्धक्य आणि मृत्यू


ही साखळी आहे. एका मेकावर ती अवलंबून असते. हे असले की ते होते. या कार्यकारणभावालाच बुद्ध प्रतीत्य (कारण) समुत्पाद (कार्य) म्हणतात. जर आपण अविद्या (अज्ञान) नष्ट केली, तर पुढचं सगळं साखळीतून आपोआप गळून पडतं – आणि त्यामुळे दुःखाची समाप्ती होते वा निर्वाणप्राप्ती होते!


बुद्ध सर्व वस्तुमात्र अनित्य वा क्षणिक असे मानतात. तेव्हा जे अनित्य वा क्षणिक नाही ते सत्य नाही असे ते सांगतात. म्हणून त्यांच्या तत्त्वज्ञानाला  क्षणिकवाद किंवा अनित्यवाद असे देखील म्हणतात.


संदर्भ: बुद्ध भिक्खू आनंद विशाखा- शरद पाटील

बुद्ध पोर्णिमा (१२ मे, २०२५) पोस्ट क्रमांक ०१


बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोंबर, १९५६ रोजी बहुसंख्य अस्पृश्यांना नागभूमीत स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित व भारतीय संविधानाला पुरक अशा बौद्ध धम्माची दीक्षा देऊन बौद्ध धम्माच्या ओटीत टाकले. त्यासोबतच धम्म आणि संविधान अशी दुतर्फा जिम्मेदारी देखील दिली. 


बाबासाहेबांच्या हयातीतच सन १९५६ साली ते सिलोन येथे गेले असता बौद्ध धम्मातील पूजा पाठ व गाथा त्यांनी संग्रहित व रेकॉर्ड करून घेतल्या होत्या.


बाबासाहेब म्हणाल्या प्रमाणे त्यांनी बायबल सदृश्य धम्म ग्रंथ १९५६ ला आपल्यासाठी लिहून देखील ठेवला. परंतु आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “दि बुद्धा अँड हिस धम्मा” या अप्रतिम ग्रंथाला वैश्विक पातळीवरील बौद्धांचा एक आदर्शभूत बायबल सारखा ग्रंथ म्हणून मान्यता मिळवू शकलो नाही आहोत. ही शोकांतिका म्हणावी लागेल.


धम्मदीक्षा दिल्यानंतर अवघ्या ५३ दिवसांत म्हणजे ०६ डिसेंबर, १९५६ रोजी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाले. अर्थातच त्यामुळे बौद्ध धम्माचा प्रचार, प्रसार व संस्कार करण्यासाठी पुरेसा वेळ त्यांना मिळाला नाही. त्यामुळे ही जबाबदारी अपसुकच ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्या नवदीक्षित व शिक्षित उपासकांवर आली. 


या नवदीक्षित आणि शिक्षित आंबेडकरी समाजाला आपण स्वीकारलेल्या नवीन जीवन मार्गाच्या संपन्नते बाबत कुतूहल, निकड व ज्ञान जालसा निर्माण होणे स्वाभाविक होते. त्यामुळे चौफेर वैचारिक घुसळणीतुन अनेक धम्म संस्कार पुस्तकांपासून ते थेट पाली त्रिपीपटकापर्यंतच्या अनुवादापर्यंत अशा अनेक अप्रतिम व उत्तम ग्रंथ संपदा व साहित्य निर्मिती झाली. 


आचार्य राहुल संस्कृत्यायन लिखित “बुद्धचर्या”, पी.एल.नरसू लिखित “इसेन्स ऑफ बुद्धिझम”, पॉल कॅरोस लिखित “दि गॉस्पेल ऑफ बुद्धा”, रा.धर्मानंद कोसंबी लिखित “बुद्धलीलासार”, पंडित कोसंबी लिखित “बुद्ध धर्म आणि संघ”, वा.गो. आपटे यांचे “बौद्ध पर्व”, केळुस्कर गुरुजींचे लिखित “भगवान बुद्धांचे चरित्र”, आचार्य बुद्धघोष लिखित अठ्ठकथा तसेच भदंत कौसल्यायन लिखित असे नानाविध साहित्य संपदा उपलब्ध झाली. 


त्यानंतरच्या टप्प्यात अनेक विद्वानांनी वेळोवेळी लेखन केले आहे. जसे पँथर राजा ढाले सर संपादित “धम्म लिपी” अंक. डॉ. गंगाधर पानतावणे सर संपादित “अस्मितादर्श” मधील समीक्षात्मक लेख असतील. एडवोकेट विमल सूर्य चिमणकर सर “दी पीपल” या मासिकातून संपादित लेख असतील असे अनेक विद्वानांनी निर्लोप लिखाण केले.


पुढील काळात बहुजनवादी,मूलनिवासीवाद,शिवधर्म व गोयंका गुरुजींचे विपश्यना असे अनेक प्रयोग देखील येथे घडले. ते कितपत हितकारक अथवा अहितकारक त्यावर अनेकांनी आपली मते मांडलीच आहेत. राज ढाले, यशवंत मनोहर व तत्सम दोन्ही बाजूचे लिखाण झाले.


बाबासाहेबांनंतर नव दीक्षित आणि शिक्षित समाज आणि त्याची सामाजिक चळवळ याची वर्तमान स्थिती ही निश्चितच काळजी करण्यासारखी आहे. काळजी करण्यासारखी जरी असली तरीही आंबेडकरी चळवळ संपलीआहे का? या बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. 


मात्र विविध महाविद्यालयातून विद्यापीठांमधून प्राध्यापक ,अभ्यासक, भिक्कू संघ, उपासक,साहित्यिक लेखक यांच्याकडून बौद्ध साहित्य,संस्कृती,लेणी, धम्माचे तत्त्वज्ञान व आंबेडकरवाद या सर्वांचा अभ्यास करून अधिक स्पष्ट नवसर्जन नवनिर्माण साहित्य, ग्रंथ निर्मिती व संस्थात्मक काम होणे अपेक्षित आहे.

बौद्ध पौर्णिमा

 



▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🌹  सुखद बुद्धांचा जन्म  🌹


सुखो बुद्धानं उप्पादो सुखा

सद्धम्मदेसना

सुखा संघस्स सामग्गी समग्गानं तपो सुखो ।

      (धम्मपद-बुद्धवग्ग)


▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬


बौद्ध धम्मात पौर्णिमेला खूप महत्व आहे,. सर्व पौर्णिमा ह्या सणासारख्या साजऱ्या झाल्या पाहिजेत. बौद्ध व्यक्तिने विहारात /घरात  सफेद वस्त्र परिधान करून त्रिरत्नांना वंदन केले पाहिजे, वंदना म्हटल्या पाहिजेत व अनुसरण केले पाहीजे.


 पौर्णिमा साजरी कशी करावी.

१. सकाळी लवकर उठून आदर्शना वंदन करून, वंदना सुत्त पठन करावे.

२. ⁠पांढरे वस्त्र परिधान करावे.

३. ⁠खीरदान करावे. 

४. ⁠भिक्कूंना घरी आमंत्रित करून धम्मदेसना घ्यावी.

५. ⁠विहारात जावे.

६. ⁠दिवसभर उपोसथचे पालन करावे.


उपोसथ म्हणजे काय?


 उपोसथ  म्हणजे उपास-तापास करणे किंवा केवळ उपाशी राहणे नव्हे. उपोसथात धम्म जीवनाच्या आठ मूलभूत शीलांचे पालन करीत आपल्यातील  सत्यतेचा  शोध घेत राहावयाचे असते. त्यातून आपल्यातील गुणदोषाचे दर्शन घ्यायचे असते आणि त्या अनुभूतीतून दोषांचे निवारण करून गुणांचे संवर्धन करायचे असते. बाह्य जगातून घडणाऱ्या कुसंस्कारांना ओळखून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा असतो. उपासक-उपासिका म्हणून सांगितलेल्या आठ सद्गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न करायचा असतो.


१. "पाणातिपाता वेरमणी                 सिक्खापदं समादियामि"।

 २."अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि"।

३."अब्रह्मचरिया वेरमणी सिक्खापदं समादियामि"।

४ " मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि"।

५." सुरामेरयमज्जपमाद्ट्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि"।

६ "विकालभोजना वेरमणी सिक्खापदं समादियामि"।

७. नच्च- गीत-वादित-विसुक-दस्सना;माला गंध विलेपन-धारण-  मंडण-विभुसनठ्ठना वेरमणी, सिक्खापदं समादियामि"।

८. "उच्चायसन- महासयाना वेरमणी सिक्खापदं समादियामि"।


 याचा अर्थ असा:

१. प्राणी हिंसा न करण्याचा शिकवणीचा मी स्वीकार करतो.

२. न  दिलेले न घेण्याचा शिकवणीचा मी स्वीकार करतो.

३. अब्रह्मचर्ये पासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.

४. असत्य बोलण्यापासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.

५. सुरा, मेरय, मद्य वगैरे प्रकारच्या मद्यपानापासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.

६. अकाली भोजन करण्यापासून अलिप्त राहण्याच्या शिकवण्याचा मी स्वीकार करतो.

७. नाचगाणे संगीत नाट्य तसेच हार-तुरे घालणे,गंध लावणे, श्रृंगार करणे, अलंकार घालणे, यापासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.

८ ऐषारामी गाद्या गिरदयांचा  वापर करण्यापासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.


दुपारी १२ च्या आत जेवण ग्रहन करावे आणि त्या नंतर दिवसभर काही खाऊ नये त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर अन्न ग्रहण करावे .अश्या रीतीने पंचशील, अष्टशील यांचे पालन करत उपोसथ ग्रहण करावे.


भवतु सब्ब मंगलम !!


तथागत भगवान गौतम बुद्धांच्या २५८७ व्या जयंती निमित्ताने सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

कुटुंब दिन

 


दमा, अस्थमा, मधुमेह असो की उच्चरक्तदाब या सारख्या आजारांना बळी पडण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये महिलांपेक्षा अधिक आहे. या आजाराने मृत्यू पावण्याचे देखील प्रमाण अधिक आहे. स्त्रियांच्या तुलनेत मानसिक आजार देखील पुरुषांमध्ये अधिक आहेत. साधारण आयुर्मान देखील स्त्रियांहून पुरुषांचे कमी आहे. अकाली वृद्धत्व पुरुषांमध्ये अधिक आहे. अपघाती मृत्यूत देखील पुरुष पुढे आहेत. आत्महत्या मग तो शेतकरी असो की नोकरदार त्यात देखील पुरुषांची संख्या जास्त आहे.


या सर्वांच प्रमुख कारण आहे. जबाबदारी… जबाबदारी मग ती कौटुंबिक, सामाजिक व पुरुष प्रधान संस्कृतीने दिलेलीही असेल. या जबाबदाऱ्यांतून येणारा मानसिक- शारीरिक ताण. त्या जबाबदारी व बाजारी गरजा पूर्ण करण्यासाठी सतत घराबाहेर राहून केलेली ओढाताण. घराबाहेर राहून आहार-विहार यामुळे होणारे शारीरिक परिणाम . कुटुंबापासून आपसूकच वेळ व संपर्क नसल्यामुळे तुटल्यागेल्याची भावना व चिंता.


पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांना परावलंबी, दीन व शोषित बनवले असेल तर पुरुषाला शोषक बनवून व्हिलन तर केलेच आहे. परंतु संस्कृतीच्या या काटेरी मुकुटात त्याचेही सामूहिक शोषण झाले आहे . त्यामध्ये त्याला यंत्रमानव बनवून त्याचेही माणूसपण हिरावून घेतले आहे. जीवनाच्या रहाटगाड्यात त्याला सतत जुंपून ठेवण्याचे काम येथील सिस्टीमने केले आहे. एवढे करूनही त्याला सामाजिक- कौटुंबिक स्थैर्य, प्रेमभाव त्याच्या वाट्याला येईलच याची खात्री नसते. किंबहुना अनेकदा त्याला समाज कवी लेखक व कुटुंबीयही घराचा खांब, पाषाण हृदयी समजून तुसड्या सारखी वागणूक देतात. बापाची आणि क्रेडिटकार्डची गरजेपुरता आठवण.


पुरुष सतत ढाल बनून पुढे राहण्याच्या स्पर्धेत..तो आपसूक जन्मताच ढकलला जातो आणि आयुष्यभर ऊसाच्या त्या चरख्यात पिळून टाकला जातो.


त्याला थकायची, थांबायची आणि रडायची मुभा आणि उसंत नसते. कारण तो थकला की बिनकामी. तो थांबला तर रिकाम टेकडा. रडला तर बाईल्या होतो. 


स्त्रियांना झुकते माप देणारे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे कायदे आहेत. पुरुषांनीच निर्माण केलेले हे पुरुषी जग आहे. जे शोषणावर व जीवघेण्या स्पर्धेवर चालते. या भांडवली युगाने स्त्रियांना देखील पुरुषी मानसिकता,वागणूक,अहंकार व संस्कार-सोपस्कार दिला आहे व केला आहे. इथल्या स्त्रीवादी चळवळी स्त्रियांना पुरुष बनवण्यात चळवळ मानतात तो वेगळाच विषय.

Tuesday, 7 January 2025

कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर



०५ जानेवारीस नालंदा शाखेच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरातील मनोगत मांडले ते पुढील प्रमाणे.


बुद्धांनी वज्जींना केलेला संदेश आपणास ज्ञात आहे .


हत्तीस आवरी गवती दोर ।

मुंग्या हि सर्पासी करिती जर्जर। व्याघ्रसिंहसी फाडीती हुशार। 

रानकुत्रे संघटोनी। 

तुकडोजींच्या या कवनांची महती देखील आपण जाणता.


लक्षात घ्या. या देशात विषमता आहे. या विषमतेचे कारण केवळ आर्थिक नसून सामाजिक आहेत. जन्मासोबत जात नावाच लेबल चिटकवून व्यक्तीची प्रतिष्ठा, ओळख, कला-गुण, सामाजिक ओळख, संसाधनांची उपलब्धता यांना एक मर्यादेचे बंधन जन्मभर बांधले जाते.


ही विषमता व ठेकेदारी मोडीत काढण्यासाठी सामाजिक,सांस्कृतिक, धार्मिक,आर्थिक व राजकीय मुठभरांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी. स्वतंत्र्य, समता, बंधूत व न्यायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी संघटनेची गरज भासते.


कारण तुम्ही व्यक्तीशी लढत नसून सिस्टीम सोबत लढत आहात. केवळ लढत नसून एक पर्यायी सिस्टीम उभी करू इच्छिता. त्यामुळे हा लढा सर्व अंगानी विषमतावादी, सरंजामी, जातीयवादी विचारांच्या, व्यक्तींच्या व संघटनेच्या विरोधात आहे.


लक्षात घ्या. तेथे व्यक्तीची मुक्ती किंवा आर्थिक उद्धार शक्य आहे. तुम्ही विषमतावादी टोळक्यात जाऊन त्यांच्या अजिंड्याखाली माना डोलवू शकता. परंतु त्याने समाजाची अथवा सामूहिक मुक्ती शक्य नाही. किंबहुना विषमता वादी शक्ती तुमचा वापर संपला की तुम्हाला देखील कचऱ्याप्रमाणे फेकून देतील.


या क्रांती प्रतिक्रांतीच्या लढ्यात स्वतःला जन्माने उच्चभ्रू समजणारा समाज कायम संघटित,शिक्षित व पर्यायाने सत्तेशी सलगी करत आपले प्रस्थ कायम ठेवण्यात यशस्वी झाला आहे. सत्तेशी सलगी त्यांनी इंग्रजांच्या  काळात केली. मुस्लिम साम्राज्याच्या काळात केली. स्वातंत्र्यानंतर देखील सत्तेत राहुल मलिदा खाण्याचे व बहुजनांचा मलिदा करण्याचे काम अथक अविरत सुरू आहे.


त्यांच्या या यशाचे गमक हा त्यांचं शिक्षण, संघटन, अजिंडा व लबाडी हे आहे. या सगळ्याचा वापर ते विषमतावादी व्यवस्था टिकवण्यासाठी करतात.


या सिस्टिमला पर्याय आपण शिक्षित संघटित व जागृत होऊन आपल्या अजिंड्यावर काम करून दिला पाहिजे.


तत्पूर्वी हे समजून घ्या की, सिद्धार्थ बुद्ध झाले व त्यानंतर त्यांच्या हातून ४५ वर्ष परिवर्तनाचे कार्य झाले. बोधिसत्व बाबासाहेबांनी संपूर्ण जीवन समाजाच्या उद्धारासाठी दिले. जे जे प्रबुद्ध झाले बोधी झाले त्यांनी परिवर्तनाची कास पकडली.


कार्यकर्त्याने त्यासाठी पंचशिलाचे व शिलमार्गाचे महत्व जाणले पाहिजे. शील समाधी प्रज्ञा न जाणता. पंचशील न अंगीकारता काम करणारे कार्यकर्ते अनेकदा भरकटण्याचे व चळवळीला वेगळ्या दिशेला नेण्याचे काम जाणते अजाणते करू शकतात.  त्यामुळे चळवळीत झांगडगुत्ता, संभ्रम देखील झाले. हेही लक्षात घ्या. जातीसंस्थेचे निर्मूलन करा. जातीभेद, धर्मभेद यांना तितकेसे महत्व नाही. शिक्षण व आर्थीक सबलीकरण करा.


धन्यवाद 🙏

Sunday, 29 December 2024

कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृतिदिन

 



नाशिकच्या १२ किलोमीटर आणि उत्तरेस आंबे दिंडोरी नावाच गाव आहे.  येथेच लोकनेते पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा जन्म 15 ऑक्टोंबर 1902 रोजी पवळाबाई यांच्या पोटी झाला. त्याच मुलाचे नाव किसन भाऊंनी भाऊराव असे ठेवले.


०१ जानेवारी 1927 रोजी कोरेगाव जिल्हा पुणे येथील विजय स्तंभावर झालेल्या सभेत भाषण करून दादासाहेब गायकवाड यांनी आपले नाव प्रथम महाड येथील सत्याग्रहात भाग घेण्यासाठी नोंदवली होते आणि बहिष्कृत भारत या वृत्तपत्रात त्यांचे नाव एक सत्याग्रही म्हणून नोंदवली होते. त्या सभेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते.


20 मार्च, 1927 परिषदेच्या शेवटी जो हल्ला होता. त्याची सर्व इथंबूत माहिती नावांनीशी गोळा केली आणि निरपराराध अस्पृश्यांवर एकदम हल्ला करणाऱ्या गुंडाविरुद्ध कोर्टात खटले भरले गेले चार- पाच महिन्यांनी त्या खटल्याचा निकाल लागून सात-आठ गुंड मोरक्यांना प्रत्येकी चार महिन्यांची सश्रम करावासाची शिक्षा देखील झाली. यासगळ्यात दादासाहेबांनी काम केले होते.


इसवी सन 1930 साल उजाडले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी 2 मार्च, 1930 रोजी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची रणशिंग फुंकले. 


रविवारी 13 ऑक्टोबर, 1935 रोजी येवला येथील परिषद भरली. अस्पृश्य समाजातील सुमारे 50 हजार लोक त्या परिषदेला हजर होते. या परिषदेचा प्रचार करताना दादासाहेब आपल्या सहकाऱ्यांसह कधी पाई कधी सायकलवर तर क्वचित मोटरने प्रवास करीत.


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन. दादासाहेब गायकवाड यांना  16605 मते 25 फेब्रुवारी 1937 रोजी पडली व त्यांचा विजय झाला.


14 एप्रिल 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 45 वा वाढदिवस येवला येथे मोठी जाहीर 

परिषद घेऊन साजरा करण्यात आला या परिषदेत दादासाहेबांचे बाबासाहेबांनी अभिनंदन केले.


बाबासाहेबांच्या पश्चात  बाबासाहेबांच्या शवाला साक्ष ठेवून दिनांक 7 डिसेंबर, 1956 रोजी चैत्यभूमीवरच 25 लाख अनुयायांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने बौद्ध धर्माची दीक्षा भदंत आनंद कौशल्यन यांनी त्रिशरण पंचशीलाच्या उच्चाराने दिली.


1957 च्या सार्वजनिक निवडणुकीत शेकाफ हे पक्षाला चांगले यश मिळाले त्यात 21 आमदार आणि 11 खासदार निवडून आले.


दिनांक 3 ऑक्टोबर 1957 रोजी पक्ष स्थापन करण्यासाठी देशाच्या विभागातून नेते कडे नागपूरला एकत्र आले होते. त्याच दिवशी या पक्षाची  स्थापना झाली. अध्यक्ष रावबहाद्दूर एन  शिवराज, जनरल सेक्रेटरी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे व सदस्य दादासाहेब गायकवाड, बी सी कांबळे इत्यादी होते.


खासदार बी.सी कांबळे यांनी 14 मे, 1959 रोजी नागपूर येथे पक्षाचे अधिवेशन भरवले आणि तेथेच त्या दिवशी आपला दुरुस्त गट स्थापन केला व त्याला दुरुस्त रिपब्लिकन पक्ष कांबळे गट म्हणण्यात येऊ लागले.


6 डिसेंबर, 1964 ला देशव्यापी भूमीहीनांचा सत्याग्रह कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. हा सत्याग्रह एवढा प्रचंड होता की दोन महिन्यात संबंध भारतातून तीन लाख 40 हजार सत्याग्रही तुरुंगात गेले त्यात सर्व जाती-जमातींची भूमिहीन शेतकरी होते.


दादासाहेब गायकवाड  पंधरा वर्षे खासदार होते आपल्या भाषणातून त्यांनी पार्लमेंट गाजवली होती. 29 डिसेंबर, 1971 चा तो काळा दिवस ठरला त्याच दिवशी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी जगाचा निरोप घेतला.


यांच्या कार्यास आणी त्यागास विनम्र अभिवादन..!💐🙏