Friday, 29 May 2026

चळवळ : 05


 

“आर्थिक, सामाजिक आणि जातीय विषमता या नैसर्गिक किंवा दैवी नसतात; त्या ऐतिहासिक सत्तासंबंध, संसाधनांवरील अनाधिकृत नियंत्रण आणि संस्थात्मक सिस्टेमॅटिक शोषण यांच्या दीर्घ प्रक्रियेतून निर्माण झालेले आपत्ये असतात. समाजातील काही वर्चस्वशाली गटांनी आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय साधनांवर नियंत्रण ठेवून ही विषमता टिकवून ठेवली.”


परंतु या व्यवस्थेचं सर्वात मोठं कौशल्य म्हणजे ही विषमता “न्याय्य”, “नैसर्गिक” आणि “धार्मिक” आहे असा भास निर्माण करणे. त्यामुळे मुळात विषमता अस्तित्वात आहे हेच अनेकांना मान्य होत नाही.


आज जगभरातील व्यवस्थांनी सामान्य लोकांच्या मनात एक गोष्ट खोलवर रुजवली आहे. तुमच्या दुरवस्थेला व्यवस्था किंवा सरकार जबाबदार नाही. तुमच्या आयुष्यातील अपयशासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात, नाहीतर तुमचं नशीब; आणि कधी दुसऱ्या जातीचा, धर्माचा, परप्रांतीय किंवा परदेशी माणूस. परंतु वेल्फेअर स्टेट म्हणून ही सरकारंअपयशी ठरलीत हे ते मान्य करणार नाहीत.


म्हणजेच व्यवस्थेला प्रश्न विचारायचा नाही; तुमच्या प्रश्नांची उत्तरं इतरत्र शोधायची. फेक न्यूज, फेक मीडिया व नीतिशून्य, विवेकहीन समाजात हा विषारी, विखारी विचार फोफावला आणि हा विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी सर्वात प्रभावी अस्त्र ठरली; माध्यमं.


सोशल मीडिया, सिनेमा, टीव्ही, वर्तमानपत्रं आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून जनमत घडवलं जातं, भीती निर्माण केली जाते, दिशाभूल केली जाते आणि खऱ्या प्रश्नांपासून लोकांचं लक्ष हटवलं जातं.


याच कारणामुळे सत्ताधारी वर्ग शिक्षण आणि संस्कार प्रक्रियेवर विशेष लक्ष केंद्रित करतो. सत्ताधारी विचारसरणी लोकांच्या मनात संस्कारांच्या रूपाने रुजवली जाते. त्याला पूरक अजेंडे राबवले जातात आणि शिक्षणाच्या मूळ उद्देशालाच शेंदूर फासला जातो. परिणामी “होयबा वर्ग” निर्माण होतो.


हा होयबा वर्ग सामाजिक, राजकीय किंवा नैतिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेत नाही. अन्याय, विषमता आणि शोषण दिसत असूनही “आपल्याला काय करायचं?” अशी भूमिका घेऊन तो तटस्थ राहतो. परिवर्तनाच्या चळवळींपासून दूर राहणारा, सत्तेच्या भीतीने गप्प बसणारा आणि सुरक्षित तटस्थतेत राहणारा हा वर्ग व्यवस्थेला सर्वाधिक सोयीचा असतो.


म्हणूनच अन्याय ओळखणे, त्याची कारणमीमांसा करणे आणि तो दूर करण्यासाठी सक्षम साधन उभे करणे आवश्यक ठरते. या परिवर्तन प्रक्रियेतील सर्वात प्रभावी आणि मूलभूत साधन म्हणजे शिक्षण.


शिक्षण म्हणजे केवळ शाळा किंवा महाविद्यालयातील अध्यापन नव्हे; तर समाज, कुटुंब, धर्म, सण-उत्सव, परंपरा आणि संस्कृती यांच्या माध्यमातून घडणारी विचारप्रक्रियाही शिक्षणाचाच भाग असते. समाजातील सांस्कृतिक व्यवहार लोकांना “काय योग्य आहे” आणि “काय स्वाभाविक आहे” हे शिकवत असतात.


म्हणूनच प्रश्न विचारणं, चिकित्सक विचार करणं आणि शिक्षणाला मुक्तीचं साधन बनवणं आज पूर्वीपेक्षा अधिक आवश्यक आहे.

चळवळ : 04

 


“एक ना धड, भाराभर चिंध्या” अशीच आज चळवळीची अवस्था झाली आहे. भूछत्राप्रमाणे जणू नवी संघटना जन्माला येते; पण विचार, संघटनशक्ती, दीर्घकालीन कार्यक्रम आणि जनाधार यांच्या अभावामुळे अशा अनेक संघटना काही काळातच निष्प्रभ होतात किंवा समाजात दखलपात्रही ठरत नाहीत.


आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येक गल्लीबोळात “राष्ट्रीय अध्यक्ष” निर्माण झाले आहेत; पण राष्ट्रीय पातळीवर प्रभाव निर्माण करणारे नेतृत्व मात्र दिसत नाही. परिणाम स्वरूप चळवळीमध्ये सुसूत्रता राहत नाही. प्रत्येक संघटना वेगवेगळ्या दिशेने धावत असल्यामुळे सामूहिक ताकद विखुरते. 


याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे ठोस मागण्यांचा अभाव. कोणत्या मुद्द्यावर संघर्ष करायचा, कोणत्या मागणीसाठी जनदबाव उभा करायचा आणि कोणत्या दिशेने समाजाला न्यायचे याबाबत स्पष्टता दिसत नाही. त्यामुळे “प्रेशर पॉलिटिक्स” उभी राहत नाही. सत्ताधाऱ्यांवर प्रभाव टाकण्यासाठी आवश्यक असलेली संघटित ताकद तयार होत नाही. उलट पाकीटबाजी व दलालांना सुकाळ येतो.


इतिहास पाहिला तर आंबेडकरी चळवळ एका स्पष्ट अजेंड्यावर उभ्या राहिल्या. त्यांच्याकडे विचार होता, दिशा होती, शिस्त होती आणि व्यापक नेतृत्व होते. आज मात्र व्यक्तिकेंद्रीकरण वाढले आहे. संघटना समाजासाठी कमी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी जास्त उभ्या राहताना दिसतात.


देशव्यापी नेता अचानक निर्माण होत नाही; त्यासाठी दीर्घकालीन सामाजिक काम, वैचारिक प्रगल्भता, त्याग आणि व्यापक स्वीकार आवश्यक असतो. त्याचप्रमाणे देशव्यापी अजेंडाही फेसबुक पोस्ट किंवा घोषणांनी तयार होत नाही; तो जनतेच्या वास्तविक प्रश्नांशी भिडून सातत्यपूर्ण संघर्षातून घडतो.


पण संघटनांच्या अधोगतीमागे केवळ विखुरलेपणा कारणीभूत नाही. वैचारिक अपरिपक्वता, अज्ञान, अहंकार आणि परस्परांतील द्वेष यांतून आंतरिक संघर्ष निर्माण होतात. त्यातच स्वार्थासाठी होणारी दलाली, गटबाजी आणि व्यक्तिपूजा यामुळे चळवळीची दिशा भरकटते. हजारो संघटना असूनही चालले असते केवळ त्यांची मागणी एकसुरात संघटीत हवी होती मात्र तसेही दिसत नाही.


अशा सर्व वातावरणात प्रामाणिक, समर्पित, त्यागी, वैचारिक आणि सुशिक्षित कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होते. त्यांच्या प्रामाणिकपणाचा उपयोग करून घेतला जातो; पण निर्णयप्रक्रियेत त्यांना स्थान दिले जात नाही. अनेकदा त्यांची फसवणूक, पिळवणूक आणि मानसिक उपेक्षा केली जाते.


परिणामी संघटना समाजपरिवर्तनाचे माध्यम न राहता काही स्वार्थी लोकांचा अड्डा बनते. विचारांपेक्षा व्यक्ती मोठ्या होतात, तत्त्वांपेक्षा अंधनिष्ठा महत्त्वाची ठरते आणि कार्यकर्त्यांपेक्षा चापलूस लोकांना स्थान मिळते. अशा संघटनांमध्ये अभ्यास, शिस्त, नैतिकता आणि जनतेशी असलेले जिवंत नाते हळूहळू नष्ट होत जाते.


याचा गंभीर परिणाम म्हणजे प्रामाणिक कार्यकर्ता निराश होतो. समाजासाठी काम करण्याची जिद्द असलेली माणसे अशा वातावरणापासून दूर जातात. सामान्य जनतेचाही विश्वास उडतो. कारण जनता केवळ घोषणा पाहत नाही; ती संघटनांचे वर्तन, अंतर्गत संस्कृती आणि नेतृत्वाची नैतिकता देखील पाहते.


ज्या संघटनांमध्ये संवादाऐवजी कटकारस्थान, विचाराऐवजी अंधनिष्ठा आणि समाजकारणाऐवजी स्वार्थाचे व्यवहार चालतात, त्या संघटना काही काळ गाजल्या तरी टिकाऊ परिवर्तन घडवू शकत नाहीत. चळवळ उभी राहते ती त्याग, प्रामाणिकपणा, वैचारिक स्पष्टता आणि जनतेशी असलेल्या विश्वासाच्या नात्यावर. भीती, द्वेष आणि स्वार्थावर नाही.


म्हणूनच चळवळ मजबूत करायची असेल तर संघटनांची संख्या वाढवण्यापेक्षा विचारांची एकजूट, सामूहिक नेतृत्व, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, आत्मपरीक्षण आणि समान किमान कार्यक्रम यावर भर द्यावा लागेल. शीलवान नेतृत्व स्वीकारावे व घडवावे लागेल. कॉमन मिमिमम प्रोग्रामवर एकजूट करावी लागेल. अन्यथा प्रत्येकजण स्वतःचा झेंडा घेऊन उभा राहील; पण समाजाची सामूहिक ताकद मात्र कमकुवतच राहील.

चळवळ - 03


नामधारी पदाधिकारी आणि निष्क्रिय संघटना : चळवळीच्या क्षयाची लक्षणे


कोणतीही चळवळ तिच्या घोषणांनी मोठी होत नाही; ती मोठी होते कार्यकर्त्यांच्या सामाजिक हस्तक्षेपाने, वैचारिक प्रगल्भतेने आणि जनतेशी असलेल्या जिवंत नात्याने. पण आज अनेक सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संघटनांमध्ये एक गंभीर वास्तव दिसून येते ती म्हणजे पदांची वाढ आणि कार्याची घट. यातुन अनेकदा निष्क्रिय, नाममात्र, निकामी व मरणासन्न अवस्थेतील संघटना दिसतात.


पूर्वी चळवळींमध्ये पद हे कामातून निर्माण होत असे. लोक एखाद्याला “नेता” म्हणत, कारण तो समाजात सक्रिय असे. आज अनेक ठिकाणी उलट चित्र दिसते.  आधी पद घेतले जाते आणि नंतर काम शोधले जाते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संघटक अशा पदांच्या घोषणा मोठ्या उत्साहात होतात; पण प्रत्यक्ष समाजकार्य, प्रश्नांवर संघर्ष, लोकांशी संवाद, अभ्यास किंवा नवीन कार्यकर्ते घडवण्यामध्ये त्यांचा सहभाग दिसत नाही.


ही केवळ संघटनात्मक समस्या नाही; हा वैचारिक ऱ्हास आहे.


ज्या चळवळीमध्ये अभ्यास कमी होतो, तिथे घोषणाबाजी वाढते. जिथे सामूहिक नेतृत्व संपते, तिथे व्यक्तिपूजा सुरू होते. जिथे कार्यकर्ते घडत नाहीत, तिथे “फोटोतील पदाधिकारी” निर्माण होतात. प्रत्येकाला प्रभावशाली दिसायचे असते; पण समाजासाठी सातत्याने काम करणारा कार्यकर्ता व्हायचे नसते.


आज सोशल मीडियाने या प्रवृत्तीला अधिक खतपाणी घातले आहे. पोस्टरवर फोटो असणे, नावापुढे मोठे पद लिहिणे आणि कार्यक्रमानंतर अभिनंदनाच्या पोस्ट टाकणे.  यालाच अनेकांनी सामाजिक काम समजले आहे. पण चळवळ ही डिजिटल प्रतिमांनी उभी राहत नाही; ती उभी राहते लोकांच्या विश्वासावर, त्यागावर आणि सातत्यपूर्ण कृतीवर.


पद जबाबदारीचे प्रतीक असते, प्रतिष्ठेचे नाही. पण जेव्हा पद हे केवळ ओळख आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचे साधन बनते, तेव्हा संघटना बाहेरून जिवंत दिसते पण आतून निष्क्रिय होत जाते. अशा संघटना समाजात विश्वास निर्माण करू शकत नाहीत. लोकांना भाषणे नको असतात; त्यांना कृती दिसावी लागते.अन्यथा संघटनेचे अस्तित्व केवळ नावापुरते उरते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघटन ही केवळ लोकांची गर्दी नसून शिस्तबद्ध, अभ्यासू आणि ध्येयवादी सामूहिक शक्ती मानली होती. संघटना म्हणजे केवळ कार्यालय, बॅनर किंवा पदांची यादी नाही; संघटना म्हणजे विचारांचे कृतीत रूपांतर करणारी सामाजिक ऊर्जा. जर त्या ऊर्जेऐवजी निष्क्रियता आली, तर चळवळींचा र्हास अटळ आहे.

चळवळ - 02

चळवळ वाढायची असेल, तर संघटक घडवावे लागतात. पण आज संघटक उरलेत कुठे? आज प्रत्येकाला influencer प्रभावशाली व्हायचं आहे. ही केवळ पिढी बदलल्याची गोष्ट नाही; ही सामाजिक-राजकीय संस्कृती बदलल्याची खूण आहे.


संघटक होणं म्हणजे स्वतःला केंद्रस्थानी न ठेवता समाजाला केंद्रस्थानी ठेवणं. संघटक प्रकाशझोतात नसतो; तो पडद्यामागे असतो. तो भाषणांपेक्षा संवाद करतो. तो भक्त गोळा करत नाही; तो कार्यकर्ते घडवतो. त्याचं काम संथ, कठीण आणि अनेकदा नाव प्रसिद्धीस न येणार असतं. म्हणूनच संघटक होण्यासाठी संयम, सातत्य, वैचारिक स्पष्टता आणि लोकांविषयी खोल आस्था लागते.


इटालियन मार्क्सवादी विचारवंत अँटोनियो ग्रामशीने सांगितलं होतं की ,सत्ता केवळ पोलिस, कायदे किंवा दडपशाहीने टिकत नाही; ती लोकांच्या मनांवर सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करून टिकते. लोकांना एखादी व्यवस्था “नैसर्गिक” वाटू लागते, तेव्हा त्या व्यवस्थेचं खऱ्या अर्थाने वर्चस्व निर्माण होतं. ग्रामशी याला सांस्कृतिक वर्चस्व म्हणतो. हे वर्चस्व मोडायचं असेल, तर समाजात पर्यायी विचार, पर्यायी संस्कृती आणि पर्यायी संघटनात्मक शक्ती उभी करावी लागते. आणि ते काम influencer (प्रभावी वक्ते) करत नाहीत; संघटक करतात.


माणसं घडवणं ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. एखाद्या गावात, वस्तीत किंवा कामगार भागात जाऊन लोकांचा विश्वास जिंकावा लागतो. त्यांच्या दुःखात उभं राहावं लागतं. त्यांच्या भाषा, भीती, आशा समजून घ्याव्या लागतात. एकेक व्यक्ती जोडावी लागते. त्यातून लहान गट तयार होतात, गटातून संघटना तयार होते आणि संघटनांतून चळवळ जन्म घेते. ही प्रक्रिया एका प्रसिद्ध video पोस्टने किंवा एका भाषणाने होत नाही. यासाठी वर्षानुवर्षे काम करावं लागतं.


ग्रामशीने पारंपरिक बुद्धिजीवी आणि लोकमान्य बुद्धिजीवी असा एक महत्त्वाचा भेद केला होता. पारंपरिक बुद्धिजीवी म्हणजे विद्यापीठं, परिसंवाद, लेखन, चर्चांमध्ये रमणारे; पण अनेकदा जनतेपासून दूर गेलेले बुद्धिजीवी. तर लोकमान्य बुद्धिजीवी हे लोकांमधून उभे राहतात. ते फक्त विचार मांडत नाहीत; ते लोकांना संघटित करतात, संघर्षाला दिशा देतात आणि सामाजिक शक्ती निर्माण करतात. ते समाजाविषयी केवळ बोलत नाहीत; ते समाजासोबत उभे राहतात.


आज आपल्या चळवळींसमोरची मोठी समस्या हीच आहे की संघटक कमी होत आहेत आणि दिखाऊ बुद्धिजीवी वाढत आहेत. समाजात जाऊन कार्यकर्ते घडवण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा मोठी करणं महत्त्वाचं वाटू लागलं आहे. प्रदर्शनतेला बांधिलकी / निष्ठा पेक्षा जास्त किंमत मिळू लागली आहे.


एकेकाळी भारतातील डाव्या, समाजवादी, आंबेडकरी आणि इतर पुरोगामी चळवळींमध्ये संघटनात्मक कार्य / संघटन उभारणी ही केंद्रस्थानी कल्पना होती. पन्नास, साठ, सत्तरच्या दशकातील कार्यकर्ते तळागाळात राहत, लोकांमध्ये मिसळत, अभ्यासवर्ग घेत, पत्रकं वाटत, संघटनात्मक बैठका घेत. त्यांना माहिती होतं की परिवर्तन हे फक्त विचारांनी होत नाही; ते संघटित लोकशक्तीने होतं.


याच संघटनात्मक कार्य / संघटन उभारणी च्या तत्त्वाला संघ परिवाराने अत्यंत गंभीरपणे समजून घेतलं. शाखा, नियमित बैठक, वैचारिक प्रशिक्षण, स्थानिक संपर्क, सांस्कृतिक कार्यक्रम, शाळा, सेवा उपक्रम या सगळ्यांतून त्यांनी सातत्याने माणसं जोडली. त्यांनी समाजात खोलवर शिरकाव केला. त्यांची विचारधारा विषमता वाढवणारी आणि द्वेष पसरवणारी असू शकते; पण संघटन उभारणीचं महत्त्व त्यांनी कधीच कमी लेखलं नाही. त्यांनी भाषणबाजांपेक्षा पेक्षा प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी निर्माण केले.


दुसरीकडे, अनेक पुरोगामी प्रवाहांनी हळूहळू संघटनेची परंपरा गमावली. वैचारिक पातळीवर ते मजबूत असले, तरी जनतेशी त्यांचा जिवंत संपर्क कमी होत गेला. विद्यापीठं, परिसंवाद, लेखन, सोशल मीडिया हे महत्त्वाचे असले तरी ते जनसंघटनांची जागा घेऊ शकत नाहीत. विचार जर लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडले गेले नाहीत, तर ते केवळ बौद्धिक, अकादमीक चर्चांपुरते मर्यादित राहतात.


१९८० नंतर स्वयंसेवी संस्था संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला. समाजकारणाचं प्रकल्पकेंद्रीकरण झालं. निधी, अहवाल, कार्यशाळा, देणगीदार याभोवती अनेक उपक्रम फिरू लागले. काही चांगलं काम नक्कीच झालं; पण संघर्षाची जागा उत्तम व्यवस्थापनाने घेतली. कार्यकर्त्याचं रूपांतर व्यावसायिक कार्यकर्ता मध्ये होऊ लागलं. त्यानंतर नवउदारवादी अर्थव्यवस्थेने व्यक्तिवादाला आणखी आक्रमक बनवलं. “स्वतःचा विकास”, “वैयक्तिक प्रगती ”, “वैयक्तिक यश” या मूल्यांनी सामूहिक राजकारण कमकुवत केलं.


सोशल मीडिया आल्यानंतर दिखाऊपणा म्हणजेच कार्य, अशी समजूत निर्माण झाली. likes, shares, followers, reels, viral clips याभोवती राजकीय-सामाजिक अभिव्यक्ती फिरू लागली. त्यामुळे आंदोलनवादी भाषणबाजांचा एक नवा वर्ग तयार झाला. हा वर्ग सतत दिसतो, बोलतो, प्रतिक्रिया देतो; पण जमिनीवर संघटनात्मक कामात त्याचा सहभाग मर्यादित असतो.


यातली मोठी समस्या म्हणजे चळवळ ही “विक्रीयोग्य आशय” बनते. दुःख, अन्याय, संघर्ष हे लोकांच्या जगण्याचे प्रश्न न राहता लोकांचं लक्ष वेधून घेणारा प्रतिसाद मिळवण्याची, टाळीखाऊ साधनं बनतात. वर्तमाना व भविष्याविषयी सांगायला काही नसले की इतिहासाचे अलंकारिक उदात्तीकरण होते. भाषणं, पोस्ट्स, घोषणा यांना महत्त्व राहतं; पण माणसांशी नातं बांधणं मागे पडतं. अशा परिस्थितीत चळवळीचा गाभा कमकुवत होतो.


भाषणबाज वक्ता लोकांवर प्रभाव टाकतो; संघटक लोकांना सक्षम करतो.

भाषणबाज स्वतःभोवती केंद्र निर्माण करतो; संघटक सामूहिक नेतृत्व घडवतो.

भाषणबाज ला दुखाऊपणा लागते; संघटकाला विश्वास लागतो.

भाषणबाजचा प्रभाव अनेकदा क्षणिक असतो; संघटक व संघटनेची ची उभारणी दीर्घकालीन असते.


चळवळींचा इतिहास पाहिला, तर कोणतीही मोठी सामाजिक क्रांती भाषणबाजमुळे घडलेली नाही. त्या संघटित लोकांच्या शक्तीने घडल्या आहेत. कामगार चळवळी, शेतकरी आंदोलनं, स्त्रीवादी लढे, दलित आंदोलनं, स्वातंत्र्य चळवळ या सगळ्यांच्या केंद्रस्थानी संघटक होते. अशी माणसं जी स्वतःपेक्षा ध्येयाला मोठं मानत होती.


आज सर्वात मोठी गरज आहे ती संघटन निर्माण करण्याची. लोकांमध्ये राहणारे, अभ्यास करणारे, ऐकणारे, संयमाने काम करणारे संघटक . जे समाजाला फक्त प्रतिक्रियावादी करायला नाही, तर संघटीत व्हायला शिकवतील. कारण ग्रामशीच्या भाषेत सांगायचं तर, प्रतिवर्चस्ववादी संस्कृती उभी करायची असेल तर तळागाळातील संघटक आणि जनआधारित, लोकमान्य, लोकाभिमुख बुद्धिजीवी निर्माण करावे लागतील.


कारण शेवटी चळवळ भाषणांने ने नाही, संस्थात्मक बांधणी ने उभी राहते.

ती hashtags ने नाही, तर मानवी नात्यांनी टिकते.

ती प्रसिद्धीने नाही, तर संघटित जनतेच्या विश्वासाने वाढते.


आणि म्हणूनच :

चळवळ भाषणबाज नाही, संस्थात्मक बांधणीने संघटक उभे करतात.

चळवळ


दलित-बहुजन समाजातील शिक्षण, नोकरी आणि आर्थिक संधींमुळे निर्माण झालेला मध्यमवर्ग हा एक महत्त्वाचा सामाजिक बदल आहे. पण त्या वर्गातील काही घटकांनी सामाजिक बांधिलकी विसरून केवळ वैयक्तिक प्रगतीवर भर दिला, तर त्यातून चळवळीची सामूहिक ताकद कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो.


सत्तेच्या जवळ राहून लाभ मिळवणारा, मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाखाली सामाजिक विषमता दुर्लक्षित करणारा आणि स्वतःच्या उन्नतीसाठी आपल्या समाजातील लोकांचाच वापर करणारा मध्यमवर्ग ही अनेक सामाजिक चळवळींसमोरची वास्तविक समस्या आहे. हा प्रश्न फक्त आर्थिक नाही; तो नैतिक आणि राजकीयही आहे.


मात्र याचवेळी संपूर्ण मध्यमवर्गाला एकसारखे ठरवणेही योग्य ठरणार नाही. कारण याच वर्गातून शिक्षक, लेखक, वकील, कार्यकर्ते, पत्रकार आणि सामाजिक नेतृत्वही उभे राहिले आहे. प्रश्न “मध्यमवर्ग” असण्याचा नाही, तर आपल्या उन्नतीची दिशा समाजाशी जोडलेली आहे का याचा आहे.


म्हणूनच संघर्ष दोन पातळ्यांवर आहे.

अन्यायकारक सत्ताव्यवस्थेविरुद्ध,

आणि समाजातील स्वार्थी, चळवळविरोधी प्रवृत्तीविरुद्ध.


डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी “Educate, Agitate, Organize” दिलेला संदेश केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हता; तो सामूहिक मुक्तीसाठी होता. समाजातून वर आलेल्या प्रत्येकाने “मी समाजासाठी काय परत देतो?” हा प्रश्न विचारणे तितकेच आवश्यक आहे.


बाबासाहेबांनी बुद्धाला डोळे मिटलेला बुद्ध म्हणून समोर न आणता बुद्ध हा सामाजिक क्रांतिकारक म्हणून मांडला आहे हे आपण समजलो पाहिजे. धम्माचा उद्देश त्यांना या जगाची पुर्रचना करणे व ती धम्माचा तत्त्वांवर करणे अपेक्षीत होते.

दलित-बहुजन समाजातील शिक्षण, नोकरी आणि आर्थिक संधींमुळे निर्माण झालेला मध्यमवर्ग हा एक महत्त्वाचा सामाजिक बदल आहे. पण त्या वर्गातील काही घटकांनी सामाजिक बांधिलकी विसरून केवळ वैयक्तिक प्रगतीवर भर दिला, तर त्यातून चळवळीची सामूहिक ताकद कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो.


सत्तेच्या जवळ राहून लाभ मिळवणारा, मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाखाली सामाजिक विषमता दुर्लक्षित करणारा आणि स्वतःच्या उन्नतीसाठी आपल्या समाजातील लोकांचाच वापर करणारा मध्यमवर्ग ही अनेक सामाजिक चळवळींसमोरची वास्तविक समस्या आहे. हा प्रश्न फक्त आर्थिक नाही; तो नैतिक आणि राजकीयही आहे.


मात्र याचवेळी संपूर्ण मध्यमवर्गाला एकसारखे ठरवणेही योग्य ठरणार नाही. कारण याच वर्गातून शिक्षक, लेखक, वकील, कार्यकर्ते, पत्रकार आणि सामाजिक नेतृत्वही उभे राहिले आहे. प्रश्न “मध्यमवर्ग” असण्याचा नाही, तर आपल्या उन्नतीची दिशा समाजाशी जोडलेली आहे का याचा आहे.


म्हणूनच संघर्ष दोन पातळ्यांवर आहे 

१. अन्यायकारक सत्ताव्यवस्थेविरुद्ध,

२. समाजातील स्वार्थी, चळवळविरोधी प्रवृत्तीविरुद्ध.


बाबासाहेबांनी “Educate, Agitate, Organize” दिलेला संदेश केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हता; तो सामूहिक मुक्तीसाठी होता. समाजातून वर आलेल्या प्रत्येकाने “मी समाजासाठी काय परत देतो?” हा प्रश्न विचारणे तितकेच आवश्यक आहे.


बाबासाहेबांनी बुद्धाला डोळे मिटलेला बुद्ध म्हणून समोर न आणता बुद्ध हा सामाजिक क्रांतिकारक म्हणून मांडला आहे हे आपण समजलो पाहिजे. धम्माचा उद्देश त्यांना या जगाची पुर्रचना करणे व ती धम्माचा तत्त्वांवर करणे अपेक्षीत होते.

जयंती महामानवांची भाषणाचा अंश

 


आजच्या काळात बोलणे हि जणूकाही क्रांतीच झाली आहे. वर्तमानात अनेक मुद्दे सुरु आहेत. EVM ,एप्सटिन फाईल सारखे मुद्धे आहेतच. त्यासोबत डेलिमिटेशन, जंगलतोड व त्यामुळे झालेली प्रचंड तापमानवाढ, महाबोधी विहार मुक्तीआंदोलन, पालीभाषा आंदोलन,डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या समितीतील आक्षेपार्ह सभासदांची वर्णी आणि अर्थात वर्गीकरण असे अनेक मुद्दे आहेत. वर्गीकरण होऊ नये परंतु जर झालेच तर ते किमान लोकसंख्येचा आधारावर, इम्पिरिकल डेटाच्या आधारावर व्हावे असे साहजिक वाटते.


यानंतर आपण मुख्य विषयाकडे वळूयात तो म्हणजे महामानवांची जयंती. आज १ मे अर्थात कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा असा हा त्रिवेणी संगम. बुद्धांच्या जीवनात वैशाख पौर्णिमेचे विशेष स्थान आहे. बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण. बुद्धांचा जन्म इसवीसन पूर्व ५६३ साली झाला . त्यांच्या वडिलांचे नाव शिद्धोधन व मातेचे नाव महामाया. त्याकाळात गणराज्य पद्धती होती. शक्य गणातील शिद्धोधन हे राजा होते. कपिलवस्तू हे राजधानी होती. या दाम्पत्याला अनेकवर्ष संतानप्राप्ती नव्हती आणि अशातच एका रात्री महामायेला एक सुंदर स्वप्न पडते. सुमेध नावाचे मुनी स्वप्नात येऊन महामायेला तू माझी माता होशील का? अशी विचारणा करतात. एक पांढरा शुभ्र हत्ती महामायेच्या स्वप्नात येतो. या स्वप्नाचा अर्थ विचारण्यासाठी महाराज दुसऱ्या दिवशी आठ विद्वान ब्राह्मणांना पाचारण करतात. ते अर्थबोध सांगतात कि राजे तुम्हाला पुत्ररत्नाचा लाभ होणार आहे तसेच हे बालक सार्वभौम सम्राट होईल किंवा एक संन्याशी बनून जगाचा मार्गदर्शक बनेल, बुद्ध होईल.


बुद्धांच्या जन्माची देखील मोठी रंजक कथा आहे. त्यांचा जन्म लुम्बिनी येथील वनात शाल वृक्षाखाली झाला आहे. त्यांच्या जन्मानंतर असितमुनी नावाचे महान तपस्वीचे आगमन या बालकाला पाहण्यासाठी होते. ते भरल्या डोळ्याने बालकाचे दर्शन घेतात आणि एक दुःखद भविष्यवाणी करतात. ती भविष्यवाणी खरी ठरून अवघ्या ७ दिवसांनी महामायेचे देहावसन होते. बाळाची मावशी महाप्रजापती सर्व लालन पालन करते. सिद्धार्थ बालपणापासून करून आणि गहाण विचार करणारे होते. वयाच्या १२ -१३ व्य वर्षी त्यांचा आत्येभाऊ देवदत्त यासोबत झालेला वाद व बुद्धाची करुणा व दृष्टिकोन आपणास ज्ञात आहे. मारणाऱ्या पेक्षा तारणारा श्रेष्ठ आहे व न्यायासनाने न्यायदान करतांना शिकार करणाऱ्याच्या बाजूने न्यायदान करण्यापेक्षा जीवदान करणाऱ्याच्या बाजूने न्यायदान केले पाहिजे असे पटवून दिले.


बुद्धांचा विवाह हा वयाच्या १६ व्या वर्षी दंडपाणी यांची मुलगी यशोधरा सोबत झाला. वयाच्या २० व्या वर्षी सिद्धार्थ शक्य संघाचे सदस्य झाले. काही वर्षांनी शाक्य आणि कोलीय या गणात रोहिणी नदीच्या पाणीवाटपावरून वाद झाला. शाक्य संघाने व सेनापतीने युद्धाचा निर्णय घेतला या संघाच्या निर्णयाला बुद्धाने विरोध केला व सामोपचाराने चर्चेने वाद मिटवण्याचा पर्याय सुचवला. बुद्धाने संघाच्या विरोधात गेल्याने त्यांना देशत्याग, देहत्याग अथवा सामाजिक बहिष्कार अशा पर्यायांपैकी एक शिक्षा स्वीकारण्याचे सुनावण्यात आले. बुद्धाने परिव्राजक होण्याचा मार्ग स्वीकारला. हि बातमी वायुवेगाने शुद्धोधन, प्रजापती व माता यशोधरे पर्यंत पोहचते. माता यशोधरा सिद्धार्थाच्या निर्णयाला योग्य ठरवून आल्या माता पित्याची व पुत्र राहुलची मी माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत देखभाल करेन. तुम्ही एक असा जीवनमार्ग शोधून काढा कि, तो सकाळ मानवजातीला कल्याणकारी ठरेल. अशी इच्छा व्यक्त करते.


सिद्धार्थ भारतद्वज यांच्याहस्ते माता पिता व पत्नी समक्ष परिव्रजा घेतात. त्यावेळी त्यांचे वय २९ वर्ष असते.

छन्न हा सेवक व कंठक घोडा अनोभा नदीच्या तीरापर्यंत सोबत येतात. सिद्धार्थ आता कपिलवस्तू कडून राजगृहाकडे प्रयाण करतात. राजा बिंबिसार सन्यस्थ होण्यापासून सिद्धार्थाचे मन अनेक प्रलोभने देऊन वळवण्याचा निष्फल प्रयत्न करतात. कपिलवस्तूमध्ये स्त्री-पुरुष घोषणांचे फलक हातात युद्धाचा विरोध करतात व एक लवादमंडळाची स्थापना करून युद्ध कायमचे टाळले जाते.


सिद्धार्थ मात्र परतीचा प्रवास न करता भृगऋषी यांच्याकडे जातात निरनिराळे आत्मक्लेश देणारे तपस्येचे वैराग्य मार्ग तेथे पाहतात. त्यानंतर आलारकालाम यांच्याकडे सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करतात त्यानंतर ते उदक रामपुत्त यांच्याकडून ध्यान व समाधी मार्गाची शिकवणूक घेतात. त्यानंतर निरंजना नदीच्या काठी वैराग्यमार्गाचा अभ्यास करतात. अत्यंत उग्र आत्मक्लेश, पीडा, अन्नत्याग अशी सहा वर्ष जातात. शरिर अगदी जर्जर, पिंजरा व क्षीण होऊन जाते. उरुवेला ठिकाणावरील सुजाताने दिलेल्या खीर प्राशन केल्याने वैराग्य कसोटी भंग होते. त्यानंतर पुन्हा निश्चयाने पिंपळवृक्षाखाली बसून चार आठवडे चार पायऱ्याने त्याने ज्ञान प्राप्त केले.


क्रमश: