Friday, 29 May 2026

चळवळ - 03


नामधारी पदाधिकारी आणि निष्क्रिय संघटना : चळवळीच्या क्षयाची लक्षणे


कोणतीही चळवळ तिच्या घोषणांनी मोठी होत नाही; ती मोठी होते कार्यकर्त्यांच्या सामाजिक हस्तक्षेपाने, वैचारिक प्रगल्भतेने आणि जनतेशी असलेल्या जिवंत नात्याने. पण आज अनेक सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संघटनांमध्ये एक गंभीर वास्तव दिसून येते ती म्हणजे पदांची वाढ आणि कार्याची घट. यातुन अनेकदा निष्क्रिय, नाममात्र, निकामी व मरणासन्न अवस्थेतील संघटना दिसतात.


पूर्वी चळवळींमध्ये पद हे कामातून निर्माण होत असे. लोक एखाद्याला “नेता” म्हणत, कारण तो समाजात सक्रिय असे. आज अनेक ठिकाणी उलट चित्र दिसते.  आधी पद घेतले जाते आणि नंतर काम शोधले जाते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संघटक अशा पदांच्या घोषणा मोठ्या उत्साहात होतात; पण प्रत्यक्ष समाजकार्य, प्रश्नांवर संघर्ष, लोकांशी संवाद, अभ्यास किंवा नवीन कार्यकर्ते घडवण्यामध्ये त्यांचा सहभाग दिसत नाही.


ही केवळ संघटनात्मक समस्या नाही; हा वैचारिक ऱ्हास आहे.


ज्या चळवळीमध्ये अभ्यास कमी होतो, तिथे घोषणाबाजी वाढते. जिथे सामूहिक नेतृत्व संपते, तिथे व्यक्तिपूजा सुरू होते. जिथे कार्यकर्ते घडत नाहीत, तिथे “फोटोतील पदाधिकारी” निर्माण होतात. प्रत्येकाला प्रभावशाली दिसायचे असते; पण समाजासाठी सातत्याने काम करणारा कार्यकर्ता व्हायचे नसते.


आज सोशल मीडियाने या प्रवृत्तीला अधिक खतपाणी घातले आहे. पोस्टरवर फोटो असणे, नावापुढे मोठे पद लिहिणे आणि कार्यक्रमानंतर अभिनंदनाच्या पोस्ट टाकणे.  यालाच अनेकांनी सामाजिक काम समजले आहे. पण चळवळ ही डिजिटल प्रतिमांनी उभी राहत नाही; ती उभी राहते लोकांच्या विश्वासावर, त्यागावर आणि सातत्यपूर्ण कृतीवर.


पद जबाबदारीचे प्रतीक असते, प्रतिष्ठेचे नाही. पण जेव्हा पद हे केवळ ओळख आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचे साधन बनते, तेव्हा संघटना बाहेरून जिवंत दिसते पण आतून निष्क्रिय होत जाते. अशा संघटना समाजात विश्वास निर्माण करू शकत नाहीत. लोकांना भाषणे नको असतात; त्यांना कृती दिसावी लागते.अन्यथा संघटनेचे अस्तित्व केवळ नावापुरते उरते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघटन ही केवळ लोकांची गर्दी नसून शिस्तबद्ध, अभ्यासू आणि ध्येयवादी सामूहिक शक्ती मानली होती. संघटना म्हणजे केवळ कार्यालय, बॅनर किंवा पदांची यादी नाही; संघटना म्हणजे विचारांचे कृतीत रूपांतर करणारी सामाजिक ऊर्जा. जर त्या ऊर्जेऐवजी निष्क्रियता आली, तर चळवळींचा र्हास अटळ आहे.

0 comments: