“एक ना धड, भाराभर चिंध्या” अशीच आज चळवळीची अवस्था झाली आहे. भूछत्राप्रमाणे जणू नवी संघटना जन्माला येते; पण विचार, संघटनशक्ती, दीर्घकालीन कार्यक्रम आणि जनाधार यांच्या अभावामुळे अशा अनेक संघटना काही काळातच निष्प्रभ होतात किंवा समाजात दखलपात्रही ठरत नाहीत.
आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येक गल्लीबोळात “राष्ट्रीय अध्यक्ष” निर्माण झाले आहेत; पण राष्ट्रीय पातळीवर प्रभाव निर्माण करणारे नेतृत्व मात्र दिसत नाही. परिणाम स्वरूप चळवळीमध्ये सुसूत्रता राहत नाही. प्रत्येक संघटना वेगवेगळ्या दिशेने धावत असल्यामुळे सामूहिक ताकद विखुरते.
याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे ठोस मागण्यांचा अभाव. कोणत्या मुद्द्यावर संघर्ष करायचा, कोणत्या मागणीसाठी जनदबाव उभा करायचा आणि कोणत्या दिशेने समाजाला न्यायचे याबाबत स्पष्टता दिसत नाही. त्यामुळे “प्रेशर पॉलिटिक्स” उभी राहत नाही. सत्ताधाऱ्यांवर प्रभाव टाकण्यासाठी आवश्यक असलेली संघटित ताकद तयार होत नाही. उलट पाकीटबाजी व दलालांना सुकाळ येतो.
इतिहास पाहिला तर आंबेडकरी चळवळ एका स्पष्ट अजेंड्यावर उभ्या राहिल्या. त्यांच्याकडे विचार होता, दिशा होती, शिस्त होती आणि व्यापक नेतृत्व होते. आज मात्र व्यक्तिकेंद्रीकरण वाढले आहे. संघटना समाजासाठी कमी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी जास्त उभ्या राहताना दिसतात.
देशव्यापी नेता अचानक निर्माण होत नाही; त्यासाठी दीर्घकालीन सामाजिक काम, वैचारिक प्रगल्भता, त्याग आणि व्यापक स्वीकार आवश्यक असतो. त्याचप्रमाणे देशव्यापी अजेंडाही फेसबुक पोस्ट किंवा घोषणांनी तयार होत नाही; तो जनतेच्या वास्तविक प्रश्नांशी भिडून सातत्यपूर्ण संघर्षातून घडतो.
पण संघटनांच्या अधोगतीमागे केवळ विखुरलेपणा कारणीभूत नाही. वैचारिक अपरिपक्वता, अज्ञान, अहंकार आणि परस्परांतील द्वेष यांतून आंतरिक संघर्ष निर्माण होतात. त्यातच स्वार्थासाठी होणारी दलाली, गटबाजी आणि व्यक्तिपूजा यामुळे चळवळीची दिशा भरकटते. हजारो संघटना असूनही चालले असते केवळ त्यांची मागणी एकसुरात संघटीत हवी होती मात्र तसेही दिसत नाही.
अशा सर्व वातावरणात प्रामाणिक, समर्पित, त्यागी, वैचारिक आणि सुशिक्षित कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होते. त्यांच्या प्रामाणिकपणाचा उपयोग करून घेतला जातो; पण निर्णयप्रक्रियेत त्यांना स्थान दिले जात नाही. अनेकदा त्यांची फसवणूक, पिळवणूक आणि मानसिक उपेक्षा केली जाते.
परिणामी संघटना समाजपरिवर्तनाचे माध्यम न राहता काही स्वार्थी लोकांचा अड्डा बनते. विचारांपेक्षा व्यक्ती मोठ्या होतात, तत्त्वांपेक्षा अंधनिष्ठा महत्त्वाची ठरते आणि कार्यकर्त्यांपेक्षा चापलूस लोकांना स्थान मिळते. अशा संघटनांमध्ये अभ्यास, शिस्त, नैतिकता आणि जनतेशी असलेले जिवंत नाते हळूहळू नष्ट होत जाते.
याचा गंभीर परिणाम म्हणजे प्रामाणिक कार्यकर्ता निराश होतो. समाजासाठी काम करण्याची जिद्द असलेली माणसे अशा वातावरणापासून दूर जातात. सामान्य जनतेचाही विश्वास उडतो. कारण जनता केवळ घोषणा पाहत नाही; ती संघटनांचे वर्तन, अंतर्गत संस्कृती आणि नेतृत्वाची नैतिकता देखील पाहते.
ज्या संघटनांमध्ये संवादाऐवजी कटकारस्थान, विचाराऐवजी अंधनिष्ठा आणि समाजकारणाऐवजी स्वार्थाचे व्यवहार चालतात, त्या संघटना काही काळ गाजल्या तरी टिकाऊ परिवर्तन घडवू शकत नाहीत. चळवळ उभी राहते ती त्याग, प्रामाणिकपणा, वैचारिक स्पष्टता आणि जनतेशी असलेल्या विश्वासाच्या नात्यावर. भीती, द्वेष आणि स्वार्थावर नाही.
म्हणूनच चळवळ मजबूत करायची असेल तर संघटनांची संख्या वाढवण्यापेक्षा विचारांची एकजूट, सामूहिक नेतृत्व, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, आत्मपरीक्षण आणि समान किमान कार्यक्रम यावर भर द्यावा लागेल. शीलवान नेतृत्व स्वीकारावे व घडवावे लागेल. कॉमन मिमिमम प्रोग्रामवर एकजूट करावी लागेल. अन्यथा प्रत्येकजण स्वतःचा झेंडा घेऊन उभा राहील; पण समाजाची सामूहिक ताकद मात्र कमकुवतच राहील.

0 comments: