“आर्थिक, सामाजिक आणि जातीय विषमता या नैसर्गिक किंवा दैवी नसतात; त्या ऐतिहासिक सत्तासंबंध, संसाधनांवरील अनाधिकृत नियंत्रण आणि संस्थात्मक सिस्टेमॅटिक शोषण यांच्या दीर्घ प्रक्रियेतून निर्माण झालेले आपत्ये असतात. समाजातील काही वर्चस्वशाली गटांनी आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय साधनांवर नियंत्रण ठेवून ही विषमता टिकवून ठेवली.”
परंतु या व्यवस्थेचं सर्वात मोठं कौशल्य म्हणजे ही विषमता “न्याय्य”, “नैसर्गिक” आणि “धार्मिक” आहे असा भास निर्माण करणे. त्यामुळे मुळात विषमता अस्तित्वात आहे हेच अनेकांना मान्य होत नाही.
आज जगभरातील व्यवस्थांनी सामान्य लोकांच्या मनात एक गोष्ट खोलवर रुजवली आहे. तुमच्या दुरवस्थेला व्यवस्था किंवा सरकार जबाबदार नाही. तुमच्या आयुष्यातील अपयशासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात, नाहीतर तुमचं नशीब; आणि कधी दुसऱ्या जातीचा, धर्माचा, परप्रांतीय किंवा परदेशी माणूस. परंतु वेल्फेअर स्टेट म्हणून ही सरकारंअपयशी ठरलीत हे ते मान्य करणार नाहीत.
म्हणजेच व्यवस्थेला प्रश्न विचारायचा नाही; तुमच्या प्रश्नांची उत्तरं इतरत्र शोधायची. फेक न्यूज, फेक मीडिया व नीतिशून्य, विवेकहीन समाजात हा विषारी, विखारी विचार फोफावला आणि हा विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी सर्वात प्रभावी अस्त्र ठरली; माध्यमं.
सोशल मीडिया, सिनेमा, टीव्ही, वर्तमानपत्रं आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून जनमत घडवलं जातं, भीती निर्माण केली जाते, दिशाभूल केली जाते आणि खऱ्या प्रश्नांपासून लोकांचं लक्ष हटवलं जातं.
याच कारणामुळे सत्ताधारी वर्ग शिक्षण आणि संस्कार प्रक्रियेवर विशेष लक्ष केंद्रित करतो. सत्ताधारी विचारसरणी लोकांच्या मनात संस्कारांच्या रूपाने रुजवली जाते. त्याला पूरक अजेंडे राबवले जातात आणि शिक्षणाच्या मूळ उद्देशालाच शेंदूर फासला जातो. परिणामी “होयबा वर्ग” निर्माण होतो.
हा होयबा वर्ग सामाजिक, राजकीय किंवा नैतिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेत नाही. अन्याय, विषमता आणि शोषण दिसत असूनही “आपल्याला काय करायचं?” अशी भूमिका घेऊन तो तटस्थ राहतो. परिवर्तनाच्या चळवळींपासून दूर राहणारा, सत्तेच्या भीतीने गप्प बसणारा आणि सुरक्षित तटस्थतेत राहणारा हा वर्ग व्यवस्थेला सर्वाधिक सोयीचा असतो.
म्हणूनच अन्याय ओळखणे, त्याची कारणमीमांसा करणे आणि तो दूर करण्यासाठी सक्षम साधन उभे करणे आवश्यक ठरते. या परिवर्तन प्रक्रियेतील सर्वात प्रभावी आणि मूलभूत साधन म्हणजे शिक्षण.
शिक्षण म्हणजे केवळ शाळा किंवा महाविद्यालयातील अध्यापन नव्हे; तर समाज, कुटुंब, धर्म, सण-उत्सव, परंपरा आणि संस्कृती यांच्या माध्यमातून घडणारी विचारप्रक्रियाही शिक्षणाचाच भाग असते. समाजातील सांस्कृतिक व्यवहार लोकांना “काय योग्य आहे” आणि “काय स्वाभाविक आहे” हे शिकवत असतात.
म्हणूनच प्रश्न विचारणं, चिकित्सक विचार करणं आणि शिक्षणाला मुक्तीचं साधन बनवणं आज पूर्वीपेक्षा अधिक आवश्यक आहे.

0 comments: