मी विपश्यना प्रकारावर लिहिण्याचे अनेकदा टाळले आहे. परिवर्तनवादी मित्र दुखावले जावु नयेत म्हणुन; परंतु गेल्या पंधरा दिवसांत पाली भाषा व साहित्य संबंधी प्रवचन ऐकताना मला काही मुलभूत प्रश्न पडले. ते प्रश्न आणि त्यातून निर्माण झालेले विचार मांडणे आवश्यक वाटले म्हणून हा लेखप्रपंच.
त्या शिबिरात अरहंत होण्यासाठी चमत्कार (जादू) दाखवणे ही कसोटी होती, असे उदाहरणासह सांगण्यात आले. बुद्धपूर्वी २८ (सम्यक) बुद्ध होऊन गेले आणि प्रत्येक जन्माचा दुसऱ्या जन्माशी संबंध होता, असेही सांगितले गेले. तसेच बुद्धत्वाच्या सोतापन्न → सकृदागामी → अनागामी अशा पायऱ्या असतात, असेही मांडण्यात आले. विपश्यना केल्याने "पॉझिटिव्ह एनर्जी" जाणवते, हाही एक मुद्दा सांगितला गेला.
या संदर्भात काही प्रश्न उपस्थित होतात.
१. अरहंत होण्यासाठी चमत्कार दाखवणे ही कसोटी होती, असे बाबासाहेबांनी कुठे म्हटल्याचे माझ्या निदर्शनास आले नाही. उलट बाबासाहेबांच्या मांडणीत बुद्धांचा धम्म विवेक, नैतिकता, समता आणि चिकित्सक दृष्टिकोनावर आधारित दिसतो.
२. २८ बुद्धांची संकल्पना ही पारंपरिक बौद्ध साहित्यात आढळते. (डी डी कोसंबी) परंतु बाबासाहेबांनी आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात या संकल्पनेला स्थान दिलेले दिसत नाही. पुनर्जन्माच्या बाबतीतही त्यांची मांडणी पारंपरिक बौद्ध व्याख्यांपेक्षा वेगळी आणि अधिक चिकित्सक स्वरूपाची वाटते.
३. सोतापन्न, सकृदागामी, अनागामी हे टप्पे पारंपरिक बौद्ध साहित्यात आहेत. मात्र बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात त्यांना स्थान दिलेले मला आढळले नाही.
४. पॉझिटिव्ह एनर्जी या संकल्पनेबद्दल मला स्वतःला कोणताही अनुभव नसल्यामुळे त्याबाबत मी आता भाष्य न करता तटस्थ राहतो.
आता बाबासाहेबांच्या काही विचारांचा संदर्भ घेऊया. त्यातील अर्थ लावताना माझ्याकडून चुका होऊ शकतात, याची नम्र जाणीव ठेवून हे लिहित आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये बौद्ध धम्म स्वीकारण्यापूर्वी मानवास धर्माची गरज काय? (मुक्ती कोण पथे?) व इतर ठिकाणी स्पष्ट केले आहे. बाबासाहेबांच्या लेखनात “धम्म” हा शब्द पारंपरिक अध्यात्माच्या अर्थाने नाही, तर नैतिक-सामाजिक नियमव्यवस्था म्हणून आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार म्हणून पुढे येतो.. बाबासाहेब बुद्धाला चमत्कारिक आध्यात्मिक गुरु म्हणून नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा सामाजिक क्रांतिकारक म्हणून पाहतात. त्यांना उघड्या डोळ्यांचा व चालता बोलता बुद्ध अभिप्रेत होता.
त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात बुद्धधम्माचा पाया प्रज्ञा, करुणा आणि समता यांवर उभारलेला दिसतो. त्यांच्यासाठी धम्म म्हणजे केवळ कर्मकांड किंवा वैयक्तिक मोक्षाचा मार्ग नव्हता. धम्माने समाजातील दुःख, अन्याय, विषमता आणि शोषण कमी केले पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. धम्म म्हणजे नीती व धम्माचा उद्देश या जगाची पुनर्रचना करणे हा होय.
विपश्यनेच्या संदर्भात असे म्हणता येईल की पारंपरिक बौद्ध परंपरेत विपश्यना ही मनाचे निरीक्षण, दुःखाचे स्वरूप समजून घेणे आणि एकाग्रता विकसित करण्याची साधना मानली जाते. बाबासाहेबांनी ध्यान-साधनेला थेट नाकारले असे म्हणता येणार नाही; मात्र त्यांच्या धम्माच्या मांडणीत नैतिकता, प्रज्ञा आणि सामाजिक परिवर्तनाला केंद्रस्थान आहे.
४ डिसेंबर १९५४ ला म्यानमार ला रंगून येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद झाली.या परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकराचे भाषण झाले.आपल्या भाषणाचे ते म्हणाले की,ध्यान,मनाचे निरीक्षण व अभीधम्म यावर फार भर दिला जात आहे .या मार्गाने भारता मधे बौद्ध धम्म नवनिर्मित ग्रंथात प्रस्तुत केला तर आमच्या धेय्यात अडथळा निर्माण होईल.
त्यांचा प्रसिद्ध विचार आहे:
"मला असा धर्म आवडतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो."
म्हणून आंबेडकरी दृष्टिकोनातून मला प्रश्न असा उभा राहतो की कोणतीही साधना व्यक्तीला अंतर्मुख करण्याबरोबरच समाजातील अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देते का?
१९५६ नंतरचा धम्म हा पारंपरिक मोक्षकेंद्रित अध्यात्मापेक्षा सामाजिक परिवर्तनाशी अधिक जोडलेला दिसतो.
बाबासाहेबांचा दृष्टिकोन समजून घेताना एक गोष्ट विशेष महत्त्वाची आहे. त्यांनी नागपूर येथे बौद्ध धम्म स्वीकारला आणि त्याच वेळी २२ प्रतिज्ञा दिल्या. हा केवळ वैयक्तिक आध्यात्मिक निर्णय नव्हता; तर जातिव्यवस्था, सामाजिक गुलामी आणि मानवी अपमानाविरुद्धचा सार्वजनिक विद्रोह होता.
म्हणूनच धम्माला केवळ वैयक्तिक साधनेपुरते मर्यादित करणेही चुकीचे ठरेल. त्यांच्या मते धम्म हा मनुष्याच्या अंतर्मुक्तीहुन अधिक सामूहिक समाजाच्या मुक्तीचाही मार्ग आहे. केवळ व्यक्तिगत विकास हा हेतू नसुन सामाजिक विकास हेतु आहे.
त्यामुळे व्यक्तिगत नैतिक परिवर्तन हे सामाजिक परिवर्तनाचे साधन बनले, तरच धम्माचा क्रांतिकारी आशय जिवंत राहील; अन्यथा तो परिवर्तनाच्या मूळ उद्देशापासून दूर नेणारा घटक ठरू शकतो.”
क्रमश:

0 comments: