🟦🟨🟥⬜️🟧
शोषित वर्ग (वर्ण) म्हणजे: ज्यांचे शोषण होत आहे. शोषण हे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, लैंगिक अशा अनेक अर्थाने व अंगाने असू शकते . भारतात शोषित वर्ग आणि शोषित वर्ण अनेकदा एकाच आहे. हा शोषित वर्ग अनेकदा शोषक वर्गाच्या जीवनशैलीचे (संस्कृती), वर्तनाचे, भाषेचे किंवा (निकृष्ठ )मूल्यांचे आंधळेपणाने अनुकरण करत असतो. ब्राम्हो-भांडवली व्यवस्था तसे करवून घेत असते.
हे अंधअनुकरण प्रामुख्याने मानसशास्त्रीय दडपणातून आणि सामाजिक स्वीकाराच्या इच्छेतून जन्माला येते. शोषित वर्गास वाटते की, असे केल्याने त्यांना समाजात मान-पान , प्रतिष्ठा (सगे-सोयरे ) आणि उच्च स्थान मिळेल.परंतु अशी प्रतिष्ठा अनेकदा आभासी असते. ती बाह्य स्वरूपावर आधारलेली असते, आत्मसन्मानावर नव्हे. शोषित वर्गाने शोषक वर्गाचे आंधळे अनुकरण करणे हा केवळ वर्तनाचा प्रश्न नसून तो मानसिक गुलामगिरी स्वीकारण्याचा प्रकार देखील आहे. मूलत: सत्ता, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान यांच्या परस्परसंबंधांचा तो परीपाक असतो.
प्रथम, या विचारामागील सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे. समाजात जेव्हा आर्थिक, सांस्कृतिक किंवा शैक्षणिक विषमता वाढते, तेव्हा श्रेष्ठत्वाची प्रतिमा शोषक वर्गाशी जोडली जाते. परिणामी, शोषित वर्गाला त्या प्रतिमेचे अनुकरण करणे म्हणजे सामाजिक उन्नतीचा मार्ग आहे असे वाटते. मानसशास्त्रीयदृष्ट्या पाहता, ही कृती स्वीकृतीची गरज आणि निम्नगंड यांमधून उद्भवते. त्यामुळे हे अनुकरण त्यांना तात्पुरती आत्मतृप्ती आणि आभासी सामाजिक प्रतिष्ठा प्रदान करते.
मात्र, या प्रक्रियेत एक मूलभूत विरोधाभास दडलेला आहे. ते स्वीकारतांना शोषक उलट, स्वतःच्या संस्कृतीचा, भाषेचा आणि ओळखीचा त्याग करत असतो.व त्यास दुय्यम स्थान देत असतो. अशा प्रकारचे अनुकरण हे सामाजिक संरचनेतील असमानतेला आव्हान देत नाही; ते त्या असमानतेला अधिक दृढ करते. म्हणूनच शोषित वर्गाने व त्यांच्या वर्तमानातील म्होरक्यांनी याचे ‘भान ठेवावे’.
तथापि, या चिकित्सा करताना एक दुसरा पैलूही लक्षात घ्यावा. सर्वच अनुकरण हे नकारात्मक असते असे नाही. प्रगतीसाठी, शिक्षणासाठी किंवा जीवनमान उंचावण्यासाठी काही मूल्यांचे स्वीकारणे आवश्यक असू शकते. प्रश्न आंधळेपणाचा आहे.जिथे विवेक हरवतो आणि स्वतःची अस्मिता दुय्यम ठरते. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय नाही. तेथे अनुकरण आणि आत्मविकास यांमध्ये भेद करणे आवश्यक आहे. हा भेद उलगडून सांगणे हे जुन्या जाणत्या व प्रज्ञाशीलांचे काम आहे.
शोषितांना आत्मभान जागृत करण्याचा संदेश देऊन. खरी प्रतिष्ठा ही दुसऱ्याचे रूप धारण करण्यात नसून, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून समानतेसाठी उभे राहण्यात आहे. हे अधोरेखीत व्हावे व होत राहावे इतकंच.

0 comments: