दमा, अस्थमा, मधुमेह असो की उच्चरक्तदाब या सारख्या आजारांना बळी पडण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये महिलांपेक्षा अधिक आहे. या आजाराने मृत्यू पावण्याचे देखील प्रमाण अधिक आहे. स्त्रियांच्या तुलनेत मानसिक आजार देखील पुरुषांमध्ये अधिक आहेत. साधारण आयुर्मान देखील स्त्रियांहून पुरुषांचे कमी आहे. अकाली वृद्धत्व पुरुषांमध्ये अधिक आहे. अपघाती मृत्यूत देखील पुरुष पुढे आहेत. आत्महत्या मग तो शेतकरी असो की नोकरदार त्यात देखील पुरुषांची संख्या जास्त आहे.
या सर्वांच प्रमुख कारण आहे. जबाबदारी… जबाबदारी मग ती कौटुंबिक, सामाजिक व पुरुष प्रधान संस्कृतीने दिलेलीही असेल. या जबाबदाऱ्यांतून येणारा मानसिक- शारीरिक ताण. त्या जबाबदारी व बाजारी गरजा पूर्ण करण्यासाठी सतत घराबाहेर राहून केलेली ओढाताण. घराबाहेर राहून आहार-विहार यामुळे होणारे शारीरिक परिणाम . कुटुंबापासून आपसूकच वेळ व संपर्क नसल्यामुळे तुटल्यागेल्याची भावना व चिंता.
पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांना परावलंबी, दीन व शोषित बनवले असेल तर पुरुषाला शोषक बनवून व्हिलन तर केलेच आहे. परंतु संस्कृतीच्या या काटेरी मुकुटात त्याचेही सामूहिक शोषण झाले आहे . त्यामध्ये त्याला यंत्रमानव बनवून त्याचेही माणूसपण हिरावून घेतले आहे. जीवनाच्या रहाटगाड्यात त्याला सतत जुंपून ठेवण्याचे काम येथील सिस्टीमने केले आहे. एवढे करूनही त्याला सामाजिक- कौटुंबिक स्थैर्य, प्रेमभाव त्याच्या वाट्याला येईलच याची खात्री नसते. किंबहुना अनेकदा त्याला समाज कवी लेखक व कुटुंबीयही घराचा खांब, पाषाण हृदयी समजून तुसड्या सारखी वागणूक देतात. बापाची आणि क्रेडिटकार्डची गरजेपुरता आठवण.
पुरुष सतत ढाल बनून पुढे राहण्याच्या स्पर्धेत..तो आपसूक जन्मताच ढकलला जातो आणि आयुष्यभर ऊसाच्या त्या चरख्यात पिळून टाकला जातो.
त्याला थकायची, थांबायची आणि रडायची मुभा आणि उसंत नसते. कारण तो थकला की बिनकामी. तो थांबला तर रिकाम टेकडा. रडला तर बाईल्या होतो.
स्त्रियांना झुकते माप देणारे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे कायदे आहेत. पुरुषांनीच निर्माण केलेले हे पुरुषी जग आहे. जे शोषणावर व जीवघेण्या स्पर्धेवर चालते. या भांडवली युगाने स्त्रियांना देखील पुरुषी मानसिकता,वागणूक,अहंकार व संस्कार-सोपस्कार दिला आहे व केला आहे. इथल्या स्त्रीवादी चळवळी स्त्रियांना पुरुष बनवण्यात चळवळ मानतात तो वेगळाच विषय.

0 comments: