जगभरात उपलब्ध धर्म, पक्ष,संघटना विचारसरणी,अथवा नेतृत्व याचे परफेक्ट मॉडेल जिवंत अथवा ऐतिहासिक देखील असू शकत नाही. ते कधीच असत नाही. तसे झाले असते तर निरनिराळ्या संघटना,धर्म,नेते इत्यादी उदयास व लयास कधी गेले/गेल्या नसत्या.
आपल्याला अपेक्षित नेता,धर्म,पक्ष,संघटना कशा असायला हव्यात. याचे आपले काही ठोकताळे असतात. ते ठोकताळे आपल्याला आलेले अनुभव, समस्या आणि आपल्या मर्यादित सामाजिक शैक्षणिक,भौगोलिक,ऐतिहासिक ज्ञान/ अज्ञान या सर्वाचे झालेले आकलन व त्याचा आपण लावलेला अन्वयार्थ या गोष्टीवर अवलंबून असतो .
परंतु व्यक्तीचे अनुभव अथवा ज्ञान हे काही वैश्विक अथवा कालातीत असत नाही. त्याला अनेक आर्थिक,भौगोलिक,सामाजिक मर्यादा असतात.
त्यामुळे वर्तमानातील उपलब्ध पर्यायांपैकी अधिक उचित / योग्य/ परफेक्ट पर्याय निवडणे अथवा निर्माण करणे. ही प्रक्रिया असते असे मला वाटते.
ज्यांना-ज्यांना म्हणून परिवर्तन हवे आहे. त्यांना या प्रवाहात यावेच लागेल. प्रवाहाच्या बाहेर राहुन केवळ निरर्थक उपदेश अथवा टीका-टिप्पणी करता येईल. जे करणे सोपे ही आहे. नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तिरावर जाण्यासाठी पाण्यात उतरणे ही एकमेव अनिर्वार्यता असते. त्यामुळे ज्यांना परिवर्तन हवे त्यांना पाण्यात/ संघटनेत उतरावेच लागेल. व तो प्रवाह योग्य दिशेने न्यावा लागेल.
संघटनेत उतरणाऱ्या व्यक्तीला त्याचा हेतू स्पष्ट असावा. तुम्ही चळवळीला देण्यासाठी आलात की घेण्यासाठी हे स्पष्ट असावे. असे जरी असले तरी चळवळीच्या नावाने भावनिक करून अनेकांना राबवून/ वापरून घेण्याचा प्रकार देखील होतो. त्यामुळे विद्यार्थीदशेत आपण विद्यार्जन करावे. आपला स्वाभिमान जपता येईल इतके अर्थार्जन करावे. कारण बौद्धिक व आर्थिक दुर्बल कार्यकर्ता चळवळ दुबळी करतो. ज्यांना लिहिता येईल त्यांनी लिहावे, बोलत येईल त्यांनी बोलावे, आर्थिक दान देता येईल त्यांनी ते करावे. परंतु कार्यकर्त्याने आपल्या क्षमता व मर्यादा ओळखून चळवळीत उतरावे.
लक्षात घ्या. चळवळ अथवा त्यातील नेते,पदाधिकारी हे काही परग्रहावरून येत नाहीत. त्यामुळे त्यांना राग,प्रेम,लोभ,मद, मोह,मत्सर असते. या सगळ्यांतून सगळेच यशस्वी होऊन बाहेर पडत नाहीत. त्यामुळे तुम्ही संकटातून सम्राट अशोकाच्या मार्गाने जाता,की बुद्धांच्या मार्गाने जाता, की बाबासाहेबांच्या मार्गाने जाता हे तुमच्या क्षमतेवर अवलंबून असते.


0 comments: