Saturday, 7 February 2026

चळवळीची गरज काय?

 मुळात या देशात सामाजिक, आर्थिक, धार्मिक, लैंगिक विषमता हजारो वर्षापासून आहे; आणि ही विषमता फक्त व्यवहारात नसून व्यक्तींच्या विचारात, मना-मनात ठासून भरलेली आहे. ही विषमता कायम त्यांच्या मनात धगधगती राहो यासाठी काही समाज विघटनकारी शक्ती कायम कार्यरत असतात. अगदी या विषमतावादी व्यवहाराला वैचारीक समर्थन व पाठबळ देणारी पुस्तके, धर्मग्रंथ देखील लिखीत आहेत. या विषमतावादी विचारांच्या संघटना मग त्या राजकीय , धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक स्तरावरील असतील. जाती वा या जातींचा  मिळून तयार झालेला शोषक वर्ग असेल. संस्कृतीच्या नावाने आर्थिक शोषण करणारे, वैचारिक दारिद्र्य देणारे असतील अथवा शैक्षणिक क्षेत्रात कायम स्वतःचे अजिंडे पिढ्यान पिढ्या राबवणारे भामटे असतील.हे सर्व या विषमतावादी व्यवस्थेला बळ देत असतात. स्वतःच्या स्वार्थासाठी  विषमतावादी व्यवस्था पुढे नेत असतात. बहुसंख्य समाजाचे शोषण करत असतात.








जोपर्यंत ही विषमतावादी शोषण करणारी व्यवस्था आहे. त्या विषमतावादी व्यवस्थेचे लाभार्थी व पुरस्कर्ते आहेत. अन्याय करणारे अन्यायकर्ते आहेत. शोषण करणारे शोषक आहेत. जातीवाद करणारे जात्यांध आहेत. 


अगदी उलट त्याच्या दुसऱ्या बाजूला शोषित आहेत. जे पीडित आहेत. दीन दलित व वंचित आहेत. जेव्हा-जेव्हा शोषितांना गुलामीची, अन्याय अत्याचाराची जाण होईल. स्वाभिमानाची जाग येईल. 

तेव्हा त्या व्यक्तीला, समाजाला, देशाला चळवळीची गरज असेल. 


प्रस्थापितांच्या विरोधात ज्यांना- ज्यांना म्हणून स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय हवा आहे. त्यांना चळवळीची गरज आहे. प्रत्येक काळात स्वतःच्या न्याय हक्कासाठी बंडाचे निशाण घेऊन लढाईच्या मैदानात उतरणाऱ्या सैनिकांना चळवळीची गरज आहे. सामाजिक अस्थिरता, अगतिकता व अल्पसंख्यांकांच्या दडपशाहीच्या काळात तर चळवळी शिवाय त्यांना गत्यंतर नाही. चळवळ करणे हा त्यांच्या जगण्याचा अपरिहार्य भाग आहे. त्यांना जगण्यासाठी देखील चळवळ करावी लागेल. ज्यांना गुलामीच्या बेडीतुन मुक्त व्हायचं असेल ;तर त्यांना चळवळ करावी लागेल. जरी ते थेट चळवळीत नसतील तरी चळवळ नाकारण्याचे प्रिव्हिलेज त्यांच्याकडे नाही. त्यांचे जिवंत असणेच हे चळवळ आहे. तुमचे उच्च शिक्षण घेणे, तुमचे उंची कपडे परिधान करणे, मोठ-मोठ्या हुद्यावर काम करणे, तुम्ही नेतृत्व करणे हे सगळे चळवळ आहे. कारण या सगळयालाच त्यांचा विरोध आहे.


त्यामुळे जोपर्यंत विषमतावादी व्यवस्था आहे. तोपर्यंत आपसुकच चळवळ असेल. ही संविधानवादी व्यवस्था टिकवून ठेवणे हे या चळवळीचे काम आहे.