Thursday, 19 March 2026

वैचारिक मतभेद

मला टोकाचे वैचारिक मतभेद मान्य आहेत. कारण विचारभिन्नता ही कोणत्याही व्यक्तीला, समूहाला, संघटनेला व समाजाला अधिक समृद्धच करत असते. ती समाजाची, संघटनेची ताकद असते. वेगवेगळे दृष्टिकोन हे आपल्या भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक माहिती व ज्ञान यावर अवलंबून असतात. त्यामुळे आपसुकच भिन्न अनुभव आणि भिन्न विचारधारा असु शकतात. खरतर यामुळेच समाजात निरंतन चिंतनाची प्रक्रिया चालू राहते. मतभेद असणे हे धोकादायक नसते; उलट ते बौद्धिक प्रामाणिकतेचे आणि स्वातंत्र्याचे लक्षण असते.

प्रामाणिक बुद्धिवंत म्हणजे आपण जे मानतो ते प्रामाणिकपणे मांडणे व आचरण करणे. तर्काने चर्चा करणे आणि गरज पडली तर स्वतःची चूक मान्य करण्याची तयारी ठेवणे. मी म्हणतो केवळ तेच बरोबर हा अट्टाहास न करता. आणखीन, नवीन बाजु अधिक योग्य असु शकते यावर विश्वास ठेवणे होय. 

परंतु; जेव्हा चर्चा सत्य शोधण्यासाठी नसते, तर दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी असते. जेव्हा विचार मांडणे हा उद्देश नसतो, तर बौद्धिक चातुर्य व आकडेवारीचा खेळ करून. दिशाभूल करणे हा हेतू असतो. तेव्हा ती चर्चा राहत नाहीत, ती लबाडी, खोडसाळपणा आणि बौद्धिक दिवाळखोरी ठरते. अशा हुशार असणाऱ्या व्यक्तींना प्रामाणिक बुद्धिवंत म्हणता येणार नाही.

तेव्हा अशी चर्चा केवळ मतभेदांची राहत नाही; ती नैतिक अध:पतनाची सुरुवात असते. कदाचित होऊ घातलेल्या संकटाची पेरणी असते.

म्हणूनच शतदा टोकाचे वैचारिक मतभेद मान्य आहेत. तुम्ही माझ्याशी असहमत असू शकता, माझ्या विचारांवर कठोर टीका करू शकता. त्यात काहीच गैर नाही. पण चर्चा प्रामाणिक असावी, तर्कावर आधारित असावी आणि नैतिकतेची किमान सीमा तरी पाळणारी असावी. कारण एकता म्हणजे आपण सगळे एकसारखे होणे,किंवा एकच ध्येयाप्रती एकसमान वेगाने व दिशेने विचार करणे नव्हे. खरी एकता म्हणजे वैचारिक मतभिन्नता असून व त्या मत स्वातंत्र्याचा आदर करत विविधतेत देखील एकता साधणे होय. 

कारण शेवटी विचारांचा संघर्ष समाजाला पुढे नेतो; पण लबाडी आणि खोडसाळपणा समाजाला अंधाराकडे ढकलतात. म्हणूनच मला अज्ञान व अशिक्षितपणा मान्य आहेत. अशांना सज्ञानी व सुशिक्षित केले जाऊ शकते. परंतु बौद्धिक आणि नैतिक भ्रष्टता अधिक घातक आहे व ती मला कधीच मान्य नाही.

Wednesday, 18 March 2026

शोषितांचे अंधानुकरण


🟦🟨🟥🟧

शोषित वर्ग (वर्ण) म्हणजे: ज्यांचे शोषण होत आहे. शोषण हे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, लैंगिक अशा अनेक अर्थाने व अंगाने असू शकते . भारतात शोषित वर्ग आणि शोषित वर्ण अनेकदा एकाच आहे. हा शोषित वर्ग अनेकदा शोषक वर्गाच्या जीवनशैलीचे (संस्कृती), वर्तनाचे, भाषेचे किंवा (निकृष्ठ )मूल्यांचे आंधळेपणाने अनुकरण करत असतो. ब्राम्हो-भांडवली व्यवस्था तसे करवून घेत असते.

हे अंधअनुकरण प्रामुख्याने मानसशास्त्रीय दडपणातून आणि सामाजिक स्वीकाराच्या इच्छेतून जन्माला येते. शोषित वर्गास वाटते की, असे केल्याने त्यांना समाजात मान-पान , प्रतिष्ठा (सगे-सोयरे ) आणि उच्च स्थान मिळेल.परंतु अशी प्रतिष्ठा अनेकदा आभासी असते. ती बाह्य स्वरूपावर आधारलेली असते, आत्मसन्मानावर नव्हे. शोषित वर्गाने शोषक वर्गाचे आंधळे अनुकरण करणे हा केवळ वर्तनाचा प्रश्न नसून तो मानसिक गुलामगिरी स्वीकारण्याचा प्रकार देखील आहे. मूलत: सत्ता, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान यांच्या परस्परसंबंधांचा तो परीपाक असतो.

प्रथम, या विचारामागील सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे. समाजात जेव्हा आर्थिक, सांस्कृतिक किंवा शैक्षणिक विषमता वाढते, तेव्हा श्रेष्ठत्वाची प्रतिमा शोषक वर्गाशी जोडली जाते. परिणामी, शोषित वर्गाला त्या प्रतिमेचे अनुकरण करणे म्हणजे सामाजिक उन्नतीचा मार्ग आहे असे वाटते. मानसशास्त्रीयदृष्ट्या पाहता, ही कृती स्वीकृतीची गरज आणि निम्नगंड यांमधून उद्भवते. त्यामुळे हे अनुकरण त्यांना तात्पुरती आत्मतृप्ती आणि आभासी सामाजिक प्रतिष्ठा प्रदान करते.

मात्र, या प्रक्रियेत एक मूलभूत विरोधाभास दडलेला आहे. ते स्वीकारतांना शोषक उलट, स्वतःच्या संस्कृतीचा, भाषेचा आणि ओळखीचा त्याग करत असतो.व त्यास दुय्यम स्थान देत असतो. अशा प्रकारचे अनुकरण हे सामाजिक संरचनेतील असमानतेला आव्हान देत नाही; ते त्या असमानतेला अधिक दृढ करते. म्हणूनच शोषित वर्गाने व त्यांच्या वर्तमानातील म्होरक्यांनी याचे ‘भान ठेवावे’.

तथापि, या चिकित्सा करताना एक दुसरा पैलूही लक्षात घ्यावा. सर्वच अनुकरण हे नकारात्मक असते असे नाही. प्रगतीसाठी, शिक्षणासाठी किंवा जीवनमान उंचावण्यासाठी काही मूल्यांचे स्वीकारणे आवश्यक असू शकते. प्रश्न आंधळेपणाचा आहे.जिथे विवेक हरवतो आणि स्वतःची अस्मिता दुय्यम ठरते. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय नाही. तेथे अनुकरण आणि आत्मविकास यांमध्ये भेद करणे आवश्यक आहे. हा भेद उलगडून सांगणे हे जुन्या जाणत्या व प्रज्ञाशीलांचे काम आहे.

शोषितांना आत्मभान जागृत करण्याचा संदेश देऊन. खरी प्रतिष्ठा ही दुसऱ्याचे रूप धारण करण्यात नसून, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून समानतेसाठी उभे राहण्यात आहे. हे अधोरेखीत व्हावे व होत राहावे इतकंच.

Sunday, 8 February 2026

निद्रिस्त जन आणि भरकटलेल्या संघटना

 निद्रिस्त जन आणि भरकटलेल्या संघटना

मी जेथे उभा आहे तेथून मला चळवळी बाबत फार आशादायी चित्र दिसत नाही . मुळात सामाजिक सुधारणावादी चळवळ आणि वैचारिक भुमिकांच्या शेवटाचा हा काळ असावा असे एकूण चित्र आहे . जगभरात भांडवशाही  ही हुकूमशाही सोबत मिरवत आहे. असे असले तरी सामाजिक जाणिवेतून आलेले कार्यकर्ते आणि मोजक्या संघटना खिंड लढवत आहेत. परंतु त्यांच्यापाठी जनसमूह प्रामाणिकपणे उभा राहताना दिसत नाही.  समाजाला आता चळवळीची गरज उरली नाही काय? हा प्रश्न पडावा. अशी स्थिती आहे. कारण ज्यांच्यासाठी कार्यकर्ते हि चळवळ चालवतात त्यांनीच पाठ फिरवलेली दिसते आहे. 


वर्तमान स्तिथीत व्यवस्थेने घडवून आणलेली एक गोष्ट म्हणजे संघटनांची केलेली मोडतोड. संघटित नसल्यामुळे कार्यकर्ते एकाकी लढत आहेत .व्यवस्थेशी थेट दोन हात करत आहेत. मात्र अशा असंघटित लढ्याला चिरडणे, खच्चीकरण व  खिळखिळे करणे. व्यवस्थेला सहज शक्य असते .


सुमारांच्या सद्दीचा हा काळ आहे . असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . माथी भडकावणारी भाषणबाजी आणि त्यात रील स्टार्सनी उथळपणाचे हिडीस प्रदर्शन करण्याची जणू स्पर्धाच सुरु केली आहे .


भुछत्रा प्रमाणे उगवणाऱ्या संघटना आहेत. निवडक तरुण काही तरी करायचे आहे हा उद्देशाने बाहेर पडत आहेत. परंतु त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन करणारे नेतृत्व जवळपास दिसत नाही.


अस्तित्वात असणाऱ्या संघटना नामधारी व बहुतांशी भरकटलेल्या आहेत. सांस्कृतिक दहशतवादाच्या संकटाचे आकलन नसल्याने सांस्कृतिक चळवळीकडे सपशेल कानाडोळा आहे. फसव्या पुरोगाम्यांची धर्माबाबत बोटचेपी भुमिका जैसेथे सुरूच आहे.

मीडियाच्या माध्यमातून विकासाची धुळफेक, धर्माची अफू व द्वेषाची पेरणी करून जनतेला बेअक्कल केले आहे. 


आता पुन्हा सगळे नव्याने सुरू करणासाठी अवधी उरलेला नाही. आपण साध्या शिक्षण संस्था उभ्या करू शकलेलो नाहीत. होत्या त्या सांभाळू शकलो नाहीत. सगळीकडे लोकशाहीच्या स्तंभांची पोखरणी झालेली आहे.

Saturday, 7 February 2026

चळवळीची गरज काय?

 मुळात या देशात सामाजिक, आर्थिक, धार्मिक, लैंगिक विषमता हजारो वर्षापासून आहे; आणि ही विषमता फक्त व्यवहारात नसून व्यक्तींच्या विचारात, मना-मनात ठासून भरलेली आहे. ही विषमता कायम त्यांच्या मनात धगधगती राहो यासाठी काही समाज विघटनकारी शक्ती कायम कार्यरत असतात. अगदी या विषमतावादी व्यवहाराला वैचारीक समर्थन व पाठबळ देणारी पुस्तके, धर्मग्रंथ देखील लिखीत आहेत. या विषमतावादी विचारांच्या संघटना मग त्या राजकीय , धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक स्तरावरील असतील. जाती वा या जातींचा  मिळून तयार झालेला शोषक वर्ग असेल. संस्कृतीच्या नावाने आर्थिक शोषण करणारे, वैचारिक दारिद्र्य देणारे असतील अथवा शैक्षणिक क्षेत्रात कायम स्वतःचे अजिंडे पिढ्यान पिढ्या राबवणारे भामटे असतील.हे सर्व या विषमतावादी व्यवस्थेला बळ देत असतात. स्वतःच्या स्वार्थासाठी  विषमतावादी व्यवस्था पुढे नेत असतात. बहुसंख्य समाजाचे शोषण करत असतात.








जोपर्यंत ही विषमतावादी शोषण करणारी व्यवस्था आहे. त्या विषमतावादी व्यवस्थेचे लाभार्थी व पुरस्कर्ते आहेत. अन्याय करणारे अन्यायकर्ते आहेत. शोषण करणारे शोषक आहेत. जातीवाद करणारे जात्यांध आहेत. 


अगदी उलट त्याच्या दुसऱ्या बाजूला शोषित आहेत. जे पीडित आहेत. दीन दलित व वंचित आहेत. जेव्हा-जेव्हा शोषितांना गुलामीची, अन्याय अत्याचाराची जाण होईल. स्वाभिमानाची जाग येईल. 

तेव्हा त्या व्यक्तीला, समाजाला, देशाला चळवळीची गरज असेल. 


प्रस्थापितांच्या विरोधात ज्यांना- ज्यांना म्हणून स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय हवा आहे. त्यांना चळवळीची गरज आहे. प्रत्येक काळात स्वतःच्या न्याय हक्कासाठी बंडाचे निशाण घेऊन लढाईच्या मैदानात उतरणाऱ्या सैनिकांना चळवळीची गरज आहे. सामाजिक अस्थिरता, अगतिकता व अल्पसंख्यांकांच्या दडपशाहीच्या काळात तर चळवळी शिवाय त्यांना गत्यंतर नाही. चळवळ करणे हा त्यांच्या जगण्याचा अपरिहार्य भाग आहे. त्यांना जगण्यासाठी देखील चळवळ करावी लागेल. ज्यांना गुलामीच्या बेडीतुन मुक्त व्हायचं असेल ;तर त्यांना चळवळ करावी लागेल. जरी ते थेट चळवळीत नसतील तरी चळवळ नाकारण्याचे प्रिव्हिलेज त्यांच्याकडे नाही. त्यांचे जिवंत असणेच हे चळवळ आहे. तुमचे उच्च शिक्षण घेणे, तुमचे उंची कपडे परिधान करणे, मोठ-मोठ्या हुद्यावर काम करणे, तुम्ही नेतृत्व करणे हे सगळे चळवळ आहे. कारण या सगळयालाच त्यांचा विरोध आहे.


त्यामुळे जोपर्यंत विषमतावादी व्यवस्था आहे. तोपर्यंत आपसुकच चळवळ असेल. ही संविधानवादी व्यवस्था टिकवून ठेवणे हे या चळवळीचे काम आहे.