Sunday, 18 May 2025

बुद्ध पोर्णिमा (१२ मे, २०२५) पोस्ट क्रमांक ०३

बुद्ध पोर्णिमा (१२ मे, २०२५)    पोस्ट क्रमांक ०३

 


————————————

बौद्ध धम्म हा रूढ अर्थाने धर्म नसून ते तत्त्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान शिकवण्याची बौद्ध धम्म ही एक शिक्षण पद्धती आहे. स्वतः भगवान गौतम बुद्ध वयाची ४५ वर्ष चारिका करून धम्म सांगतात, धम्म शिकवतात. स्वतः तथागत भगवान बुद्ध एक आदर्श शिक्षक,गुरु आहेत. त्यांनी निर्माण केलेला संघ ज्याला आदर्श शिक्षण दिले जात होते. व तो संघ जगभरात बौद्धतत्त्वज्ञानाची शिकवण सद्धधम्माची शिकवण, शिक्षण देत होता. या धम्म आणि संघापासून निर्माण झालेली विहारे, लेण्या हे बौद्ध शिक्षणाचे शैक्षणिक स्थान होते. 


बौद्ध धम्माचा हेतूच या जगाची पुनर्रचना करणे हा आहे. त्यासाठी धम्मात माणसाच्या मनाला योग्य वळण लावण्यावर सर्वाधिक भर दिला गेला आहे. बुद्ध धम्मात (प्रतुत्य समुत्पादात) सर्व दुःखाचे मूळ कारण म्हणजे अज्ञान असे सांगितले आहे. माणसाचे अज्ञान नष्ट करण्यासाठी त्याला योग्य ते शिक्षण दिले पाहिजे. शिक्षणात त्याची प्रगती होण्यासाठी त्यांनी आपले मन केंद्रित केले पाहिजे .कारण शीलवान मनुष्य आपले मन केंद्रित करू शकतो. जो मनुष्य शीलवान नाही; तो आपले मन केंद्रित करू शकत नाही. त्याचे मन इकडे तिकडे भटकत राहते म्हणून खरंतर बौद्ध धम्मात मनाच्या संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नीतिमत्ता, मनाची एकाग्रता आणि यथाभूत ज्ञान आलेले शहाणपण म्हणजेच शील,समाधी आणि प्रज्ञा या भगवान बुद्धांनी दाखवल्या मार्गाच्या पायऱ्या शिकविल्या जातात. 


तथागत भगवान गौतम बुद्धांची शिकवण्याची एक पद्धती होती. ते त्यांना जो सांगावयाचा मुद्दा आहे. त्याचे पूर्ण विश्लेषण करून सांगत. त्या मुद्द्याचे बारीक-सारीक अंग प्रत्यांग सांगितले जायचे. आपला मुद्दा पटवून देताना भगवान बुद्ध उपमा, उत्पेक्षा रूपक यांचा वारंवार उपयोग करीत असत. प्रामुख्याने दररोजच्या व्यवहारात आढळणाऱ्या उदाहरणांचा दाखला दिला जात असे. तथागत प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देत असत. चर्चेतून त्या मुद्द्याला अधिक स्पष्ट करून सांगावयाला ते लावत असत. जर त्यांना तो मुद्दा आवडला नाही तर त्याबद्दल ते विरोधी पक्षाची हेटाळणी करत नसत. तर ते विरोधी पक्षाला प्रश्न विचारून अधिक गोंधळात पाडत असत. त्या प्रतिप्रश्नांमुळे विरोधी पक्षाला मिथ्या धारणांची जाणीव करून देत असत. किंबहुना त्याच्याकडून त्या मिथ्या धारणेबद्दल वदवून घेत असत. अशा तऱ्हेने प्रश्नोत्तरांची अनेक उदाहरणे  सुत्त पिटक, विनयपिटकात जागोजागी पाहावयास मिळतात. 


तथागत भगवान गौतम बुद्ध चर्चा करतांना प्रवचन देतांना अथवा वादविवाद करतांना आपल्या विद्यार्थ्यांची, श्रोता वर्गाची बौद्धिक पातळी लक्षात घेऊन त्यांच्याशी त्या पातळीवर बोलत असत. भगवान बुद्धांनी केवळ मौखिक ज्ञानाला महत्त्व दिले नाही. तर आचरणत्मक ज्ञानाला त्यांनी अधिक महत्त्वाचे मानले. 


भगवान गौतम बुद्धांची शिकविण्याची आणखीन एक अनोखी पद्धत होती. ते शोध घेऊन स्वतः शिकणे या पद्धतीचा उपयोग देखील करत.  किसा गौतमीचे उदाहरण आपण पाहू शकता. किसा गौतमीला शोध घेऊन आणि स्वतः शिकण्यास बोध घेण्यास त्यांनी प्रवृत्त केले. 


आकृती काढून किंवा चित्ररूपात विषय समजावून घेण्याची पद्धती भगवान बुद्धांच्या काळात अस्तित्वात आली. दिव्यवनात महामोग्घलायन प्रत्युत्य समुत्प्पाद शिकविताना बारा निदान (कड्या)असल्याची आकृती काढून शिकविले आहे.


शिकण्याविषयी आणि शिकविण्या विषयाची भगवान बुद्धांची मते महत्त्वाचे आहेत. सिगाल सुत्तात 

भगवान बुद्धांनी शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांचे कर्तव्य सांगितले आहेत. 


भगवान बुद्धांनी लोकांना धम्म शिकवण्याचे ठरविल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, एवढ्या मोठ्या प्रदेशातील लोकांना धम्म शिकवण्यासाठी लोकांत जाऊन त्यांच्या भाषेत धम्म समजावून सांगणारे प्रशिक्षित शिक्षक हवेत. त्यांनी त्यासाठी त्या शिक्षकांचा एक संघ त्यांनी स्थापन केला. त्या संघाचे व्यवस्थापन नीट करण्यासाठी विनयाचे नियम बनविले.

बुद्धांनी पहिल्यांदा साठ भिक्खूंना प्रशिक्षित केले. प्रशिक्षित केलेल्या त्या भिक्खूंना बहुजनांत जाऊन धम्म शिकवण्यास सांगितले.


“धम्म साकच्छा” म्हणजे धम्म विषयक चर्चा करणे. भगवान बुद्धांनी शिकवलेल्या धम्मतत्वज्ञानाचे स्पष्टीकरण करणे, मूल्यमापन करणे आणि त्याचे विश्लेषण करणे. हे एक देखील संघाचे महत्त्वाचे बौद्धिक कार्य होते. या “धम्म साकच्छा” मुळे अभिधम्मपिटकासारखे त्रिपीटकातील ग्रंथ निर्माण झाले. धम्म साकच्छा चे ठळक उदाहरण म्हणजे “मिलिंद प्रश्न” मिलिंद पन्नास भिक्खु नागसेन आणि राजा मिलिंद यांची धम्मावर झालेली चर्चा होय.


बौद्ध धम्माच्या शिक्षण पद्धतीतूनच पुढे नालंदा,विक्रमशीला,तक्षशिला,ओदांतपुरी, घोसरावा, सोमपुरी,जगद्दल इत्यादी उत्तर भारतातील आणि वल्लभी, अमरावती, कान्हेरी, अजंठा, नागार्जुनकोंडा, कांची इत्यादी दक्षिण भारतातील विश्वविद्यालय निर्माण झाली. 


भारतातील सर्वधर्मांची तुलना करता असे दिसून येते की, 

बौद्धांनी सर्वात प्रथम साक्षरतेचे महत्व जाणले इसवी सन पूर्व 84  साली बौद्धांनी सर्व त्रिपिटक लीपीबद्ध केले. छांद किंवा छांदस ही त्यावेळीची वैदिक भाषा होती. संस्कृत भाषा ही भगवान बुद्धांच्या नंतर २०० वर्षांनी पालीचे भाषांतर संस्कार करून बनवली म्हणून त्या भाषेला संस्कृत असे म्हणतात.


भारतात वैदिक ब्राह्मणी धर्माच्या आणि जैन, लोकायत वगैरे इतर धर्मांच्या विरोधाला बौद्धांना तोंड द्यावे लागले. प्रतिस्पर्तांशी वादविवाद करण्यासाठी लागणारे कौशल्य वाढवण्यासाठी आणि स्पर्धकावर मात करण्यासाठी बौद्ध शिक्षण पद्धतीत व अभ्यासक्रमात बदल होऊन धम्माशी प्रत्यक्ष संबंध नसलेले औषधोपचार शास्त्र,  खगोलशास्त्र,गणित इत्यादी लौकिक विषय सुद्धा बौद्ध शिक्षणातून शिकवले जाऊ लागले. बुद्धांनी भिक्खूंना तिथीचा जाणकार होण्यास सांगितल आहे.


बौद्ध समाजाचे मुख्य दोन विभाग आहेत. एक “संघ” आणि दुसरा “उपासक” संघ हा पुरुष व महिला भिक्खू संघाचा मिळून बनलेला असतो. हा भिक्खू संघ त्यांच्या ठाई असणाऱ्या शिक्षण, ज्ञानामुळे होय.

बुद्ध पोर्णिमा (१२ मे, २०२५) पोस्ट क्रमांक ०२

बुद्ध पोर्णिमा  (१२ मे, २०२५)    पोस्ट क्रमांक ०२

 



तथागत भगवान गौतम बुद्धांनी प्रामुख्याने चार आर्य सत्य सांगितले. 

१. जगात दुःख आहे.

२. दुःखाला कारण आहे. 

३. ⁠दुःख निरोध तृष्णेच्या नाशातून दुःख निरोध करता येतो.

४. ⁠दुःख निरोधगामीमार्ग 


दुःख निरोधगामी मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग.

१. सम्यक दृष्टी 

२. ⁠सम्यक संकल्प 

३. ⁠सम्यक वचन 

४. ⁠सम्यक कर्म 

५. ⁠सम्यक जीविका 

६. ⁠सम्यक प्रयत्न 

७. ⁠सम्यक स्मृती 

८. ⁠सम्यक समाधी 


गाडीच्या चाकाला बारा कड्या असतात तसे दुःखाला बारा निदाने,कारण वा हेतू असतात असे बुद्ध म्हणतात.


बौद्ध धर्मातील द्वादश निदान (१२ कड्या) म्हणजेच प्रतीत्यसमुत्पादाची साखळी पुढीलप्रमाणे आहे:

१. अविद्या (अज्ञान)

२. संस्कार – कर्म आणि मानसिक

३. विज्ञान – चेतना 

४. नामरूप – शरीर आणि मन

५. षडायतन – सहा इंद्रिये 

६. स्पर्श – इंद्रिय आणि विषय

७. वेदना – (आनंद, दुःख इत्यादी)

८. तृष्णा – इच्छा किंवा आसक्ती

९. उपादान – आसक्तीला ठेवणे हाव

१०. भव– (अस्तित्व)

११. जाति – जन्म

१२. जरामरण – वार्धक्य आणि मृत्यू


ही साखळी आहे. एका मेकावर ती अवलंबून असते. हे असले की ते होते. या कार्यकारणभावालाच बुद्ध प्रतीत्य (कारण) समुत्पाद (कार्य) म्हणतात. जर आपण अविद्या (अज्ञान) नष्ट केली, तर पुढचं सगळं साखळीतून आपोआप गळून पडतं – आणि त्यामुळे दुःखाची समाप्ती होते वा निर्वाणप्राप्ती होते!


बुद्ध सर्व वस्तुमात्र अनित्य वा क्षणिक असे मानतात. तेव्हा जे अनित्य वा क्षणिक नाही ते सत्य नाही असे ते सांगतात. म्हणून त्यांच्या तत्त्वज्ञानाला  क्षणिकवाद किंवा अनित्यवाद असे देखील म्हणतात.


संदर्भ: बुद्ध भिक्खू आनंद विशाखा- शरद पाटील

बुद्ध पोर्णिमा (१२ मे, २०२५) पोस्ट क्रमांक ०१


बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोंबर, १९५६ रोजी बहुसंख्य अस्पृश्यांना नागभूमीत स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित व भारतीय संविधानाला पुरक अशा बौद्ध धम्माची दीक्षा देऊन बौद्ध धम्माच्या ओटीत टाकले. त्यासोबतच धम्म आणि संविधान अशी दुतर्फा जिम्मेदारी देखील दिली. 


बाबासाहेबांच्या हयातीतच सन १९५६ साली ते सिलोन येथे गेले असता बौद्ध धम्मातील पूजा पाठ व गाथा त्यांनी संग्रहित व रेकॉर्ड करून घेतल्या होत्या.


बाबासाहेब म्हणाल्या प्रमाणे त्यांनी बायबल सदृश्य धम्म ग्रंथ १९५६ ला आपल्यासाठी लिहून देखील ठेवला. परंतु आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “दि बुद्धा अँड हिस धम्मा” या अप्रतिम ग्रंथाला वैश्विक पातळीवरील बौद्धांचा एक आदर्शभूत बायबल सारखा ग्रंथ म्हणून मान्यता मिळवू शकलो नाही आहोत. ही शोकांतिका म्हणावी लागेल.


धम्मदीक्षा दिल्यानंतर अवघ्या ५३ दिवसांत म्हणजे ०६ डिसेंबर, १९५६ रोजी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाले. अर्थातच त्यामुळे बौद्ध धम्माचा प्रचार, प्रसार व संस्कार करण्यासाठी पुरेसा वेळ त्यांना मिळाला नाही. त्यामुळे ही जबाबदारी अपसुकच ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्या नवदीक्षित व शिक्षित उपासकांवर आली. 


या नवदीक्षित आणि शिक्षित आंबेडकरी समाजाला आपण स्वीकारलेल्या नवीन जीवन मार्गाच्या संपन्नते बाबत कुतूहल, निकड व ज्ञान जालसा निर्माण होणे स्वाभाविक होते. त्यामुळे चौफेर वैचारिक घुसळणीतुन अनेक धम्म संस्कार पुस्तकांपासून ते थेट पाली त्रिपीपटकापर्यंतच्या अनुवादापर्यंत अशा अनेक अप्रतिम व उत्तम ग्रंथ संपदा व साहित्य निर्मिती झाली. 


आचार्य राहुल संस्कृत्यायन लिखित “बुद्धचर्या”, पी.एल.नरसू लिखित “इसेन्स ऑफ बुद्धिझम”, पॉल कॅरोस लिखित “दि गॉस्पेल ऑफ बुद्धा”, रा.धर्मानंद कोसंबी लिखित “बुद्धलीलासार”, पंडित कोसंबी लिखित “बुद्ध धर्म आणि संघ”, वा.गो. आपटे यांचे “बौद्ध पर्व”, केळुस्कर गुरुजींचे लिखित “भगवान बुद्धांचे चरित्र”, आचार्य बुद्धघोष लिखित अठ्ठकथा तसेच भदंत कौसल्यायन लिखित असे नानाविध साहित्य संपदा उपलब्ध झाली. 


त्यानंतरच्या टप्प्यात अनेक विद्वानांनी वेळोवेळी लेखन केले आहे. जसे पँथर राजा ढाले सर संपादित “धम्म लिपी” अंक. डॉ. गंगाधर पानतावणे सर संपादित “अस्मितादर्श” मधील समीक्षात्मक लेख असतील. एडवोकेट विमल सूर्य चिमणकर सर “दी पीपल” या मासिकातून संपादित लेख असतील असे अनेक विद्वानांनी निर्लोप लिखाण केले.


पुढील काळात बहुजनवादी,मूलनिवासीवाद,शिवधर्म व गोयंका गुरुजींचे विपश्यना असे अनेक प्रयोग देखील येथे घडले. ते कितपत हितकारक अथवा अहितकारक त्यावर अनेकांनी आपली मते मांडलीच आहेत. राज ढाले, यशवंत मनोहर व तत्सम दोन्ही बाजूचे लिखाण झाले.


बाबासाहेबांनंतर नव दीक्षित आणि शिक्षित समाज आणि त्याची सामाजिक चळवळ याची वर्तमान स्थिती ही निश्चितच काळजी करण्यासारखी आहे. काळजी करण्यासारखी जरी असली तरीही आंबेडकरी चळवळ संपलीआहे का? या बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. 


मात्र विविध महाविद्यालयातून विद्यापीठांमधून प्राध्यापक ,अभ्यासक, भिक्कू संघ, उपासक,साहित्यिक लेखक यांच्याकडून बौद्ध साहित्य,संस्कृती,लेणी, धम्माचे तत्त्वज्ञान व आंबेडकरवाद या सर्वांचा अभ्यास करून अधिक स्पष्ट नवसर्जन नवनिर्माण साहित्य, ग्रंथ निर्मिती व संस्थात्मक काम होणे अपेक्षित आहे.

बौद्ध पौर्णिमा

 



▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🌹  सुखद बुद्धांचा जन्म  🌹


सुखो बुद्धानं उप्पादो सुखा

सद्धम्मदेसना

सुखा संघस्स सामग्गी समग्गानं तपो सुखो ।

      (धम्मपद-बुद्धवग्ग)


▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬


बौद्ध धम्मात पौर्णिमेला खूप महत्व आहे,. सर्व पौर्णिमा ह्या सणासारख्या साजऱ्या झाल्या पाहिजेत. बौद्ध व्यक्तिने विहारात /घरात  सफेद वस्त्र परिधान करून त्रिरत्नांना वंदन केले पाहिजे, वंदना म्हटल्या पाहिजेत व अनुसरण केले पाहीजे.


 पौर्णिमा साजरी कशी करावी.

१. सकाळी लवकर उठून आदर्शना वंदन करून, वंदना सुत्त पठन करावे.

२. ⁠पांढरे वस्त्र परिधान करावे.

३. ⁠खीरदान करावे. 

४. ⁠भिक्कूंना घरी आमंत्रित करून धम्मदेसना घ्यावी.

५. ⁠विहारात जावे.

६. ⁠दिवसभर उपोसथचे पालन करावे.


उपोसथ म्हणजे काय?


 उपोसथ  म्हणजे उपास-तापास करणे किंवा केवळ उपाशी राहणे नव्हे. उपोसथात धम्म जीवनाच्या आठ मूलभूत शीलांचे पालन करीत आपल्यातील  सत्यतेचा  शोध घेत राहावयाचे असते. त्यातून आपल्यातील गुणदोषाचे दर्शन घ्यायचे असते आणि त्या अनुभूतीतून दोषांचे निवारण करून गुणांचे संवर्धन करायचे असते. बाह्य जगातून घडणाऱ्या कुसंस्कारांना ओळखून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा असतो. उपासक-उपासिका म्हणून सांगितलेल्या आठ सद्गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न करायचा असतो.


१. "पाणातिपाता वेरमणी                 सिक्खापदं समादियामि"।

 २."अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि"।

३."अब्रह्मचरिया वेरमणी सिक्खापदं समादियामि"।

४ " मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि"।

५." सुरामेरयमज्जपमाद्ट्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि"।

६ "विकालभोजना वेरमणी सिक्खापदं समादियामि"।

७. नच्च- गीत-वादित-विसुक-दस्सना;माला गंध विलेपन-धारण-  मंडण-विभुसनठ्ठना वेरमणी, सिक्खापदं समादियामि"।

८. "उच्चायसन- महासयाना वेरमणी सिक्खापदं समादियामि"।


 याचा अर्थ असा:

१. प्राणी हिंसा न करण्याचा शिकवणीचा मी स्वीकार करतो.

२. न  दिलेले न घेण्याचा शिकवणीचा मी स्वीकार करतो.

३. अब्रह्मचर्ये पासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.

४. असत्य बोलण्यापासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.

५. सुरा, मेरय, मद्य वगैरे प्रकारच्या मद्यपानापासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.

६. अकाली भोजन करण्यापासून अलिप्त राहण्याच्या शिकवण्याचा मी स्वीकार करतो.

७. नाचगाणे संगीत नाट्य तसेच हार-तुरे घालणे,गंध लावणे, श्रृंगार करणे, अलंकार घालणे, यापासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.

८ ऐषारामी गाद्या गिरदयांचा  वापर करण्यापासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.


दुपारी १२ च्या आत जेवण ग्रहन करावे आणि त्या नंतर दिवसभर काही खाऊ नये त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर अन्न ग्रहण करावे .अश्या रीतीने पंचशील, अष्टशील यांचे पालन करत उपोसथ ग्रहण करावे.


भवतु सब्ब मंगलम !!


तथागत भगवान गौतम बुद्धांच्या २५८७ व्या जयंती निमित्ताने सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

कुटुंब दिन

 


दमा, अस्थमा, मधुमेह असो की उच्चरक्तदाब या सारख्या आजारांना बळी पडण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये महिलांपेक्षा अधिक आहे. या आजाराने मृत्यू पावण्याचे देखील प्रमाण अधिक आहे. स्त्रियांच्या तुलनेत मानसिक आजार देखील पुरुषांमध्ये अधिक आहेत. साधारण आयुर्मान देखील स्त्रियांहून पुरुषांचे कमी आहे. अकाली वृद्धत्व पुरुषांमध्ये अधिक आहे. अपघाती मृत्यूत देखील पुरुष पुढे आहेत. आत्महत्या मग तो शेतकरी असो की नोकरदार त्यात देखील पुरुषांची संख्या जास्त आहे.


या सर्वांच प्रमुख कारण आहे. जबाबदारी… जबाबदारी मग ती कौटुंबिक, सामाजिक व पुरुष प्रधान संस्कृतीने दिलेलीही असेल. या जबाबदाऱ्यांतून येणारा मानसिक- शारीरिक ताण. त्या जबाबदारी व बाजारी गरजा पूर्ण करण्यासाठी सतत घराबाहेर राहून केलेली ओढाताण. घराबाहेर राहून आहार-विहार यामुळे होणारे शारीरिक परिणाम . कुटुंबापासून आपसूकच वेळ व संपर्क नसल्यामुळे तुटल्यागेल्याची भावना व चिंता.


पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांना परावलंबी, दीन व शोषित बनवले असेल तर पुरुषाला शोषक बनवून व्हिलन तर केलेच आहे. परंतु संस्कृतीच्या या काटेरी मुकुटात त्याचेही सामूहिक शोषण झाले आहे . त्यामध्ये त्याला यंत्रमानव बनवून त्याचेही माणूसपण हिरावून घेतले आहे. जीवनाच्या रहाटगाड्यात त्याला सतत जुंपून ठेवण्याचे काम येथील सिस्टीमने केले आहे. एवढे करूनही त्याला सामाजिक- कौटुंबिक स्थैर्य, प्रेमभाव त्याच्या वाट्याला येईलच याची खात्री नसते. किंबहुना अनेकदा त्याला समाज कवी लेखक व कुटुंबीयही घराचा खांब, पाषाण हृदयी समजून तुसड्या सारखी वागणूक देतात. बापाची आणि क्रेडिटकार्डची गरजेपुरता आठवण.


पुरुष सतत ढाल बनून पुढे राहण्याच्या स्पर्धेत..तो आपसूक जन्मताच ढकलला जातो आणि आयुष्यभर ऊसाच्या त्या चरख्यात पिळून टाकला जातो.


त्याला थकायची, थांबायची आणि रडायची मुभा आणि उसंत नसते. कारण तो थकला की बिनकामी. तो थांबला तर रिकाम टेकडा. रडला तर बाईल्या होतो. 


स्त्रियांना झुकते माप देणारे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे कायदे आहेत. पुरुषांनीच निर्माण केलेले हे पुरुषी जग आहे. जे शोषणावर व जीवघेण्या स्पर्धेवर चालते. या भांडवली युगाने स्त्रियांना देखील पुरुषी मानसिकता,वागणूक,अहंकार व संस्कार-सोपस्कार दिला आहे व केला आहे. इथल्या स्त्रीवादी चळवळी स्त्रियांना पुरुष बनवण्यात चळवळ मानतात तो वेगळाच विषय.