Monday, 6 July 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : सामाजिक न्यायाबरोबरच आर्थिक न्यायाचेही प्रणेते

 

अनेकांना वाटते की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य केवळ सामाजिक न्याय, अस्पृश्यता निर्मूलन आणि आरक्षणापुरते मर्यादित होते. परंतु हे पूर्ण सत्य नाही. बाबासाहेबांचे ध्येय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या तिन्हींची स्थापना करणे हे होते. म्हणूनच भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत "सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय" या मूल्यांना अग्रक्रम देण्यात आला आहे.

सामाजिक न्यायासाठी त्यांनी संविधानिक हक्क, मूलभूत अधिकार, प्रतिनिधित्व आणि आरक्षणाची व्यवस्था केली. परंतु आर्थिक न्यायासाठीही त्यांनी एक स्पष्ट आणि दूरदृष्टीचा आराखडा मांडला होता.

१९४७ मध्ये त्यांनी States and Minorities या दस्तऐवजात *राज्य समाजवाद (State Socialism)* ही संकल्पना मांडली. त्यांचा उद्देश कोणत्याही प्रकारच्या हुकूमशाहीची स्थापना करणे नव्हता, तर लोकशाही मार्गाने आर्थिक विषमता कमी करणे हा होता.

बाबासाहेबांच्या मते भारतातील आर्थिक विषमतेचे एक प्रमुख कारण म्हणजे जमिनीचे असमान वाटप. काही मोजक्या जमीनदारांकडे मोठ्या प्रमाणावर जमीन होती, तर लाखो शेतकरी आणि शेतमजूर भूमिहीन किंवा अल्पभूधारक होते. त्यामुळे त्यांनी पुढील उपाय सुचवले:

* सर्व शेतीजमीन राज्याच्या मालकीची असावी.

* खाजगी जमिनदारी व्यवस्था संपुष्टात यावी.

* राज्याने जमीन प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भाडेपट्ट्याने (Lease) द्यावी.

* सामूहिक किंवा सहकारी पद्धतीने शेतीला प्रोत्साहन द्यावे.

* सिंचन, बियाणे, खत, यंत्रसामग्री, कर्ज इत्यादी सुविधा राज्याने उपलब्ध करून द्याव्यात.

* शेतीतील उत्पन्नाचे वाटप न्याय्य नियमांनुसार व्हावे.

याचा अर्थ सरकार स्वतः शेती करणार, असा नव्हता. जमिनीची मालकी राज्याकडे, पण शेती प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी करावी, ही त्यांची संकल्पना होती.

बाबासाहेबांचा दृष्टिकोन पारंपरिक साम्यवादापेक्षा वेगळा होता. ते हिंसक क्रांती, एकपक्षीय हुकूमशाही किंवा वैयक्तिक स्वातंत्र्याच्या दडपशाहीचे समर्थक नव्हते. त्यांनी संसदीय लोकशाही, घटनात्मक शासन, मूलभूत अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांना सर्वोच्च स्थान दिले.

म्हणूनच त्यांच्या आर्थिक विचारांना *लोकशाही राज्य समाजवाद (Democratic State Socialism)* असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

भूमिहीनांच्या प्रश्नावर भारतात तीन मार्ग समोर आले होते.

१. तामिळनाडू आणि कम्युनिस्ट चळवळी:

तामिळनाडूत तसेच इतर काही राज्यांत (विशेषतः तेलंगणा, केरळ, पश्चिम बंगाल) कम्युनिस्ट शेतकरी चळवळी झाल्या. काही ठिकाणी त्या हिंसकही झाल्या. कारण त्यांचा विचार असा होता की जमीनदार स्वेच्छेने जमीन देणार नाहीत; म्हणून वर्गसंघर्ष अपरिहार्य आहे.

हा दृष्टिकोन मार्क्सवादी होता.


२. विनोबा भावे यांचे भूदान

भूदान चळवळीचा आधार नैतिक परिवर्तन होता.

विनोबा भावे यांचा विश्वास होता की जमीनदारांनी स्वेच्छेने काही जमीन भूमिहीनांना द्यावी. यात संघर्षापेक्षा सद्भावना आणि नैतिक आवाहन यावर भर होता. या चळवळीमुळे लाखो एकर जमीन दान म्हणून जाहीर झाली; परंतु प्रत्यक्षात सर्व जमीन कायदेशीररीत्या भूमिहीनांना मिळालीच असे नाही. अनेक जमिनी वादग्रस्त, नापीक किंवा हस्तांतरणास अयोग्य होत्या.


३. दादासाहेब गायकवाडांचा भूमिहीनांचा सत्याग्रह

हा बाबासाहेबांच्या विचारांशी जोडलेला होता.

दादासाहेब गायकवाडांनी भूमिहीनांसाठी मोठा सत्याग्रह उभारला. घोषवाक्य होते:

"कसेल त्याची जमीन; नसेल त्याचे काय?"

हा हिंसक नव्हता.त्यात संविधानिक मार्ग,सत्याग्रह,अटक,मोर्चे,लोकशाही आंदोलन यांचा अवलंब करण्यात आला.

या चळवळीमुळे महाराष्ट्रात भूमिहीनांना सरकारी पडीत जमीन वाटपाचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला.


बाबासाहेबांचा मार्ग नेमका कोणता?

मला वाटते, येथे एक महत्त्वाचा फरक समजून घ्यायला हवा.

बाबासाहेब:

भूदानासारख्या केवळ स्वेच्छेच्या मार्गावर अवलंबून नव्हते.

कम्युनिस्टांप्रमाणे हिंसक क्रांतीचे समर्थकही नव्हते.


त्यांनी तिसरा मार्ग सुचवला:

राज्याने कायद्याने जमीनव्यवस्था बदलावी.

जमिनीचे राष्ट्रीयीकरण करावे.

भूमिहीनांना लागवडीचा हक्क द्यावा.

हे सर्व संविधान आणि लोकशाहीच्या चौकटीत करावे.


म्हणूनच त्यांच्या आर्थिक विचारांना लोकशाही राज्य समाजवाद (Democratic State Socialism) असे संबोधले जाते.


 क्रमशः

Friday, 29 May 2026

बाबासाहेब


 

Cultivation Of Mind Should Be The 

Ultimate Aim Of The Human Existence.


-Dr. B.R. Ambedkar 

🌸🌸🌸


बाबासाहेब सांगतात की, धर्माच्या अधिष्ठानावर उभी असलेली जातव्यवस्था ही अशी रचना आहे की ती शोषितांविषयी सहानुभूती निर्माण करत नाही; उलट अस्पृश्यांविरुद्ध ‘धार्मिक रोष’ निर्माण करते. परिणामी, माणसाची न्यायबुद्धी बोथट होते आणि तो धार्मिक शिकवणीच्या प्रभावाखाली अन्यायातही सहभागी होतो. इतकंच नव्हे, तर त्या अन्यायालाच न्याय्य समजू लागतो. 


म्हणूनच, सामाजिक परिवर्तनाचा प्रश्न केवळ शोषितांच्या सक्षमीकरणापुरता मर्यादित राहत नाही. उलट, ज्या समाजघटकांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यातच जाणीव (consciousness) निर्माण करणे अधिक महत्त्वाचे ठरते. कारण अन्याय ‘न्याय्य’ आहे अशी धारणा सतत पेरली जाते आणि तीच व्यवस्था टिकवून ठेवते. त्यामुळे या चुकीच्या समजुतींना आव्हान देणारे, त्यांचे चिकित्सक विश्लेषण करणारे आणि नैतिकतेच्या नव्या चौकटी उभ्या करणारे प्रयत्न अत्यावश्यक ठरतात.


व्यक्तीच्या विचारात बदल करणे महत्त्वाचे असते. न्यायव्यवस्था, वकिली आणि धोरणनिर्मिती हाताळणारे हेच, लोक समाजातील नैतिक दिशा ठरवणार आहेत.परंतु अशा जाणीवा शैक्षणिक संस्था क्वचितच निर्माण करतात

जयंती - 02

 



पोस्ट क्रमांक ०२

🟦🟨🟥⬜️🟧

📖 पुस्तक आणि बाबासाहेब 


बाबासाहेबांना ५०,००० हून अधिक पुस्तके होती. मुंबईतील राजगृह हे बाबासाहेबानी खास ग्रंथालयासाठी बनविले होते. त्यात इंग्रजी,मराठी,उर्दू,संस्कृत,पारसी,फ्रेंच,जर्मन अशा अनेक भाषांतील ग्रंथांचा समावेश होता. साधारणपणे सोशल सायन्स चे पंधरा भाग,हिस्ट्री ऑफ दि वर्ल्ड चे पंचवीस भाग होते,तसेच इतिहासावर २६००,कायद्यावर आधारित ५०००,राजकारणा संबंधित ३०००,धर्मशास्त्रावर २००० तर १२०० चरित्रे ग्रंथ होती. अर्थशास्त्राची १०००,तत्त्वज्ञानावर ६०००,युद्धशास्त्रावर ३०००,इतर साहित्य ३००० आणि इतर वेगवेगळ्या विषयांवर ७९०० ग्रंथ होते.


राजगृहाच्या या ग्रंथालयामध्ये त्यांच्या गैरहजेरीत कोणालाही जाण्याची मुभा नव्हती,त्यांचा पाळीव कुत्रा पीटर हा राजगृहाच्या दाराशी ग्रंथालयाची राखण करीत असे,हे ग्रंथ वर्गीकरण करून लेबलसह रचून ठेवले होते, त्यामुळे इतक्या प्रचंड ग्रंथालयात त्यांना कोणतेही पुस्तक हवे असल्यास ते अचूक मिळत होते,इंग्लंड मधील ठक्कर कंपनीतुन त्यासाठी बाबासाहेबानी ग्रंथालय कार्ड बनवून घेतले होते,व श.शा.रेगे यांच्याकडे ती जबाबदारी देऊन पुस्तकांची यादी पूर्ण करून घेतली होती.


बाबासाहेबांनी अभ्यास केलेले तत्वज्ञ :

बाबासाहेबांनी हिंदु धर्म ग्रंथ व पुराणे, बौद्ध साहित्य, ख्रिश्चन व मुस्लिम धर्मांचा तौलनिक अभ्यास केला होता.

त्यांनी हेगल, मार्क्स,एंगेल्स,लेनिन,मुसोलिनी,

वोल्टअर,प्लेटो, सोक्रेटीस,महात्मा फुले,कार्लाईल, जॉन ड्युई, प्रो. सेलिंगमन, बरंट्रँड रसेल, फ़्रेंड्रिंक नितशे, लासकी, मॅक्स म्युलर, एडमंड बर्के, वूल्फ गँग गॉथे, सिगमांड फ्राईड , जॉन स्टुअर्ट मिल,जेरेमी बेंथम, जेम्स मिल, थॉमस पेन, अॅडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो इत्यादी विचारवंतांचे लेखन व विचार अभ्यासले होते.


त्यांनी बुद्ध, कबीर आणि फुले यांना अभ्यासांती गुरु मानले.


📚 बाबासाहेबांची ग्रंथसंपदा

॰ कास्ट्स इन इंडिया: त्यांची रचना, उत्पत्ती आणि विकास (1917)

॰ स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमेडीज (1918)

॰ द प्रॉब्लेम ऑफ द रुपी: त्याची उत्पत्ती आणि उपाय (1923)

॰ दि इव्हॉल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (1925)

॰ वेटिंग फॉर अ व्हिसा (1935–36)

॰ अनायलेशन ऑफ कास्ट (1936)

॰ मिस्टर गांधी अँड द एमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स (1943)

॰ रानडे, गांधी अँड जिन्ना (1943)

॰ थॉट्स ऑन पाकिस्तान (1941 / 1945)

॰ व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स (1945)

॰ महाराष्ट्र अॅज अ लिंग्विस्टिक स्टेट

॰ हू वेअर द शूद्राज? (1946)

॰ स्टेट्स अँड मायनॉरिटीज (1947)

॰ द अनटचेबल्स: हू वेअर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स (1948)

॰ थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स (1955)

॰ बुद्ध ऑर कार्ल मार्क्स

॰ कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सॉल्व इट (1945)

॰ बुद्ध अँड द फ्युचर ऑफ हिज रिलिजन (1950)

॰ द फ्युचर ऑफ पार्लियामेंटरी डेमॉक्रसी

॰ लिंग्विस्टिक स्टेट्स नीड फॉर चेक्स अँड बॅलन्सेस

॰ बुद्धिझम अँड कम्युनिझम (1956)

॰ द बुद्धा अँड हिज धम्मा (1957)

॰ द राईज अँड फॉल ऑफ हिंदू विमेन


बाबासाहेबांच्या जिवन व तत्वद्यानावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत.

अनेकांनी आपापल्या वैचारिक बैठकीनुसार आंबेडकरांवर लेखन केले आहे. व्यक्तीगत समज आणि वैचारिक दृष्टिकोनानुसार वेगवेगळ्या लोकांनी लिहलेली वेगवेगळी चरित्र, लेख आणि पुस्तके लिहिली आहेत. वसंत मून ( इंग्रजी, मराठी), सहारे, कुबेर, चांगदेव खैरमोडे, शंकरराव खरात, झेलीयट बाई, ख्रिस्तोफर जेपरलॉट, डी. आर. जाटव, कंवल भारती, उमेश बगाडे, रावसाहेब कसबे, बी. सी. कांबळे, डी. आर कांबळे, आनंद तेलतुंबडे, गेल ऑम्वेट, धनंजय कीर, दत्तोपंत ठेंगडी, रमेश पंतगे, विमलसुर्य चिमनकर, य. दी. फडके, भा. ल. भोळे, शेषराव मोरे, नानकचंद रत्तु, सोहनलाल शास्त्री, आर. संगीता राव,  सुधाकर गायकवाड, सुरेश माने अशा सगळ्यांची ( अजूनही अनेक जन आहेत)  पुस्तके आहेत आणि सोबतच, बाबासाहेबांचे मूळ साहित्य प्रामुख्याने वाचावेत.


लक्षात घ्या. बाबासाहेब केवळ तत्वज्ञानी नव्हते. त्यांनी कृतियुक्त संघर्षपूर्ण जीवन व्यतीत केल. अर्थशास्त्र, संविधान तज्ञ, लेखक, पत्रकार, इतिहास, मानववंशशास्त्र, धर्मशास्र इत्यादीमध्ये ते पारंगत होते.

चळवळ - 02

चळवळ वाढायची असेल, तर संघटक घडवावे लागतात. पण आज संघटक उरलेत कुठे? आज प्रत्येकाला influencer प्रभावशाली व्हायचं आहे. ही केवळ पिढी बदलल्याची गोष्ट नाही; ही सामाजिक-राजकीय संस्कृती बदलल्याची खूण आहे.


संघटक होणं म्हणजे स्वतःला केंद्रस्थानी न ठेवता समाजाला केंद्रस्थानी ठेवणं. संघटक प्रकाशझोतात नसतो; तो पडद्यामागे असतो. तो भाषणांपेक्षा संवाद करतो. तो भक्त गोळा करत नाही; तो कार्यकर्ते घडवतो. त्याचं काम संथ, कठीण आणि अनेकदा नाव प्रसिद्धीस न येणार असतं. म्हणूनच संघटक होण्यासाठी संयम, सातत्य, वैचारिक स्पष्टता आणि लोकांविषयी खोल आस्था लागते.


इटालियन मार्क्सवादी विचारवंत अँटोनियो ग्रामशीने सांगितलं होतं की ,सत्ता केवळ पोलिस, कायदे किंवा दडपशाहीने टिकत नाही; ती लोकांच्या मनांवर सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करून टिकते. लोकांना एखादी व्यवस्था “नैसर्गिक” वाटू लागते, तेव्हा त्या व्यवस्थेचं खऱ्या अर्थाने वर्चस्व निर्माण होतं. ग्रामशी याला सांस्कृतिक वर्चस्व म्हणतो. हे वर्चस्व मोडायचं असेल, तर समाजात पर्यायी विचार, पर्यायी संस्कृती आणि पर्यायी संघटनात्मक शक्ती उभी करावी लागते. आणि ते काम influencer (प्रभावी वक्ते) करत नाहीत; संघटक करतात.


माणसं घडवणं ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. एखाद्या गावात, वस्तीत किंवा कामगार भागात जाऊन लोकांचा विश्वास जिंकावा लागतो. त्यांच्या दुःखात उभं राहावं लागतं. त्यांच्या भाषा, भीती, आशा समजून घ्याव्या लागतात. एकेक व्यक्ती जोडावी लागते. त्यातून लहान गट तयार होतात, गटातून संघटना तयार होते आणि संघटनांतून चळवळ जन्म घेते. ही प्रक्रिया एका प्रसिद्ध video पोस्टने किंवा एका भाषणाने होत नाही. यासाठी वर्षानुवर्षे काम करावं लागतं.


ग्रामशीने पारंपरिक बुद्धिजीवी आणि लोकमान्य बुद्धिजीवी असा एक महत्त्वाचा भेद केला होता. पारंपरिक बुद्धिजीवी म्हणजे विद्यापीठं, परिसंवाद, लेखन, चर्चांमध्ये रमणारे; पण अनेकदा जनतेपासून दूर गेलेले बुद्धिजीवी. तर लोकमान्य बुद्धिजीवी हे लोकांमधून उभे राहतात. ते फक्त विचार मांडत नाहीत; ते लोकांना संघटित करतात, संघर्षाला दिशा देतात आणि सामाजिक शक्ती निर्माण करतात. ते समाजाविषयी केवळ बोलत नाहीत; ते समाजासोबत उभे राहतात.


आज आपल्या चळवळींसमोरची मोठी समस्या हीच आहे की संघटक कमी होत आहेत आणि दिखाऊ बुद्धिजीवी वाढत आहेत. समाजात जाऊन कार्यकर्ते घडवण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा मोठी करणं महत्त्वाचं वाटू लागलं आहे. प्रदर्शनतेला बांधिलकी / निष्ठा पेक्षा जास्त किंमत मिळू लागली आहे.


एकेकाळी भारतातील डाव्या, समाजवादी, आंबेडकरी आणि इतर पुरोगामी चळवळींमध्ये संघटनात्मक कार्य / संघटन उभारणी ही केंद्रस्थानी कल्पना होती. पन्नास, साठ, सत्तरच्या दशकातील कार्यकर्ते तळागाळात राहत, लोकांमध्ये मिसळत, अभ्यासवर्ग घेत, पत्रकं वाटत, संघटनात्मक बैठका घेत. त्यांना माहिती होतं की परिवर्तन हे फक्त विचारांनी होत नाही; ते संघटित लोकशक्तीने होतं.


याच संघटनात्मक कार्य / संघटन उभारणी च्या तत्त्वाला संघ परिवाराने अत्यंत गंभीरपणे समजून घेतलं. शाखा, नियमित बैठक, वैचारिक प्रशिक्षण, स्थानिक संपर्क, सांस्कृतिक कार्यक्रम, शाळा, सेवा उपक्रम या सगळ्यांतून त्यांनी सातत्याने माणसं जोडली. त्यांनी समाजात खोलवर शिरकाव केला. त्यांची विचारधारा विषमता वाढवणारी आणि द्वेष पसरवणारी असू शकते; पण संघटन उभारणीचं महत्त्व त्यांनी कधीच कमी लेखलं नाही. त्यांनी भाषणबाजांपेक्षा पेक्षा प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी निर्माण केले.


दुसरीकडे, अनेक पुरोगामी प्रवाहांनी हळूहळू संघटनेची परंपरा गमावली. वैचारिक पातळीवर ते मजबूत असले, तरी जनतेशी त्यांचा जिवंत संपर्क कमी होत गेला. विद्यापीठं, परिसंवाद, लेखन, सोशल मीडिया हे महत्त्वाचे असले तरी ते जनसंघटनांची जागा घेऊ शकत नाहीत. विचार जर लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडले गेले नाहीत, तर ते केवळ बौद्धिक, अकादमीक चर्चांपुरते मर्यादित राहतात.


१९८० नंतर स्वयंसेवी संस्था संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला. समाजकारणाचं प्रकल्पकेंद्रीकरण झालं. निधी, अहवाल, कार्यशाळा, देणगीदार याभोवती अनेक उपक्रम फिरू लागले. काही चांगलं काम नक्कीच झालं; पण संघर्षाची जागा उत्तम व्यवस्थापनाने घेतली. कार्यकर्त्याचं रूपांतर व्यावसायिक कार्यकर्ता मध्ये होऊ लागलं. त्यानंतर नवउदारवादी अर्थव्यवस्थेने व्यक्तिवादाला आणखी आक्रमक बनवलं. “स्वतःचा विकास”, “वैयक्तिक प्रगती ”, “वैयक्तिक यश” या मूल्यांनी सामूहिक राजकारण कमकुवत केलं.


सोशल मीडिया आल्यानंतर दिखाऊपणा म्हणजेच कार्य, अशी समजूत निर्माण झाली. likes, shares, followers, reels, viral clips याभोवती राजकीय-सामाजिक अभिव्यक्ती फिरू लागली. त्यामुळे आंदोलनवादी भाषणबाजांचा एक नवा वर्ग तयार झाला. हा वर्ग सतत दिसतो, बोलतो, प्रतिक्रिया देतो; पण जमिनीवर संघटनात्मक कामात त्याचा सहभाग मर्यादित असतो.


यातली मोठी समस्या म्हणजे चळवळ ही “विक्रीयोग्य आशय” बनते. दुःख, अन्याय, संघर्ष हे लोकांच्या जगण्याचे प्रश्न न राहता लोकांचं लक्ष वेधून घेणारा प्रतिसाद मिळवण्याची, टाळीखाऊ साधनं बनतात. वर्तमाना व भविष्याविषयी सांगायला काही नसले की इतिहासाचे अलंकारिक उदात्तीकरण होते. भाषणं, पोस्ट्स, घोषणा यांना महत्त्व राहतं; पण माणसांशी नातं बांधणं मागे पडतं. अशा परिस्थितीत चळवळीचा गाभा कमकुवत होतो.


भाषणबाज वक्ता लोकांवर प्रभाव टाकतो; संघटक लोकांना सक्षम करतो.

भाषणबाज स्वतःभोवती केंद्र निर्माण करतो; संघटक सामूहिक नेतृत्व घडवतो.

भाषणबाज ला दुखाऊपणा लागते; संघटकाला विश्वास लागतो.

भाषणबाजचा प्रभाव अनेकदा क्षणिक असतो; संघटक व संघटनेची ची उभारणी दीर्घकालीन असते.


चळवळींचा इतिहास पाहिला, तर कोणतीही मोठी सामाजिक क्रांती भाषणबाजमुळे घडलेली नाही. त्या संघटित लोकांच्या शक्तीने घडल्या आहेत. कामगार चळवळी, शेतकरी आंदोलनं, स्त्रीवादी लढे, दलित आंदोलनं, स्वातंत्र्य चळवळ या सगळ्यांच्या केंद्रस्थानी संघटक होते. अशी माणसं जी स्वतःपेक्षा ध्येयाला मोठं मानत होती.


आज सर्वात मोठी गरज आहे ती संघटन निर्माण करण्याची. लोकांमध्ये राहणारे, अभ्यास करणारे, ऐकणारे, संयमाने काम करणारे संघटक . जे समाजाला फक्त प्रतिक्रियावादी करायला नाही, तर संघटीत व्हायला शिकवतील. कारण ग्रामशीच्या भाषेत सांगायचं तर, प्रतिवर्चस्ववादी संस्कृती उभी करायची असेल तर तळागाळातील संघटक आणि जनआधारित, लोकमान्य, लोकाभिमुख बुद्धिजीवी निर्माण करावे लागतील.


कारण शेवटी चळवळ भाषणांने ने नाही, संस्थात्मक बांधणी ने उभी राहते.

ती hashtags ने नाही, तर मानवी नात्यांनी टिकते.

ती प्रसिद्धीने नाही, तर संघटित जनतेच्या विश्वासाने वाढते.


आणि म्हणूनच :

चळवळ भाषणबाज नाही, संस्थात्मक बांधणीने संघटक उभे करतात.

Saturday, 4 April 2026

जयंती - 2026




पोस्ट क्रमांक ०१

🟦🟨🟥⬜️🟧


🔹 १. बालपण आणि शिक्षण (१८९१–१९१६)

१८९१ (१४ एप्रिल) जन्म – महू (मध्यप्रदेश)

१९०७ मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण (दलित समाजातील पहिले)

१९१२ पदवी (कला शाखा) पूर्ण

१९१३ वडिलांचे निधन, बडोदा शिष्यवृत्ती मिळून अमेरिकेला प्रस्थान

१९१५–१९१६ कोलंबिया विद्यापीठ येथे पदव्युत्तर शिक्षण. “भारतातील जातीव्यवस्था” या विषयावर संशोधन.


🔹 २. परदेश शिक्षण व करिअरची सुरुवात (१९१७–१९२४)

१९१७ इंग्लंडला शिक्षणासाठी प्रयाण (नंतर शिष्यवृत्ती बंद → भारतात परत)

१९१८ सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक

१९२० (३१ जानेवारी) ‘मूकनायक’ वर्तमानपत्र सुरू.

१९२२–१९२३ कायद्याची पदवी व उच्च शिक्षण पूर्ण (लंडन)


🔹 ३. सामाजिक क्रांतीची सुरुवात (१९२४–१९३५)

१९२४ बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापना.

१९२७ (२० मार्च) महाड चवदार तळे सत्याग्रह

१९२७ (२५ डिसेंबर) मनुस्मृती दहन 

१९३० कालाराम मंदिर प्रवेश आंदोलन (नाशिक)

१९३०–३२ गोलमेज परिषदेत सहभाग

१९३२ (२४ सप्टेंबर) पुणे करार

१९३५ येवले येथे धर्मांतराची घोषणा.


🔹 ४. राजकारण आणि विचारक्रांती (१९३६–१९४६)

१९३६ “जातिभेदाचा नाश” ग्रंथ प्रकाशित.

स्वतंत्र कामगार पक्ष स्थापना

१९३७ निवडणूक विजय

१९४२ व्हाइसरॉयच्या कार्यकारी परिषदेवर कामगार सदस्य.

१९४५–४६ पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना. संविधान सभेत प्रवेश.


🔹 ५. संविधान निर्मिती (१९४७–१९५०)

१९४७ भारताचे पहिले कायदामंत्री, संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष

१९४९ (२६ नोव्हेंबर) भारतीय संविधान स्वीकारले गेले.

१९५० (२६ जानेवारी) संविधान लागू.


🔹 ६. शेवटची वर्षे (१९५१–१९५६)

१९५२ (५ जून) कोलंबिया विद्यापीठाकडून सन्माननीय कायद्याची पदवी.

१९५२ राज्यसभा सदस्य.

१९५६ (१४ ऑक्टोबर) नागपूर येथे बौद्ध धम्म स्वीकार.

१९५६ (६ डिसेंबर) महापरिनिर्वाण (दिल्ली) 

Sunday, 31 August 2025

तुमचा पुरोगाम्यांवर विश्वास नाही. का?

 



तुमचा पुरोगाम्यांवर विश्वास नाही. का? त्यांनी असे काय करावे ज्यामुळे विश्वासार्हता येईल?

सदर प्रश्नावर माझे उत्तर मी येथे देत आहे.

———-

भारत स्वातंत्र्य झाला. परकीय उच्चभ्रू इंग्रजांकडून भारतीय उच्चभ्रू नेत्यांकडे शक्तीचे हस्तांतरण करण्यात आले. ते आजतागायत राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा अनेक आघाड्यांवर टिकून आहे. त्यामुळे लोकशाही हि जरी "एकमत म्हणजे एक मूल्य" असे कागदोपत्री सांगत असली तरी; हि बहुसंख्य प्रतिनिधित्व लोकशाही आहे. तुमच्या मताला येथे केराची टोपली दाखवली जाते हि वास्तविकता आहे. अनुपाती प्रतिनिधित्व (Proportional Representation) देणारी निवडणूक पद्धती असती तर आपल्याला तसे म्हणत आले नसते. स्वातंत्र्यानंतरही अशी व याहून विदारक स्थिती असल्या कारणाने येथील बुद्धिजीवीवर्ग काय करतोय हे पाहणे क्रमप्राप्त होते .


पुरोगामीवर्ग हा भारतीय बुद्धीजीवी वर्ग आहे आणि तो उच्चभ्रू देखील आहे. तो खरंच बुद्धिजीवी आहे का तो विषय निराळा. असो.  तरीही अशी एक साधारण मान्यता आहे. जनसामान्य नेहमी या उच्चभ्रू / बुद्धिजीवी वर्गाचे अनुकरण करत असतो. त्यामुळे या वर्गावर आपसूकच अधिकची नैतिक जबाबदारी येते. पुरोगामी हे आंबेडकरी चळवळीचे उघड मित्र आहेत? बाबासाहेबांमुळे जसे गांधीजी बदलत व अधिक वृद्धिंगत होत गेले. असे पुरोगामी म्हणतात. तसे पुरोगम्यांनी देखील आंबेडकरवाद्यांकडून शिकावे व अधिक व्यापक व मूळ भूमिकेवर यावे असे माझे मला वाटते. 


त्यामुळे तत्सम बुद्धीजीवी वर्गाने केवळ आंबेडकरी विचारमंचावर, आंबेडकर नगरात, आंबेडकरी जनतेला बुद्ध आणि बाबासाहेब भाषणातून सांगण्याची तितकीशी गरज उरली नाही. त्या उलट इतर मोठमोठ्या वस्तीत, सण-उत्सवात प्रामुख्याने प्रबोधनाचे कार्यक्रम करावेत.ज्यांच्यावर अन्याय झालाय व ज्यांनी बौद्धधम्म व आंबेडकरवाद स्वीकारलाय अशा शोषितांनाच भाषणं देण्यात काय हाशील ? शोषितांचे नेतृत्व हडपण्याची ही कला असू शकते फार तर. जे अन्याय करतात आणि जे शोषक आहेत त्यांचे परिवर्तन पुरोगाम्यानी करावे. ते खरे कार्य होईल.


आंबेडकर वादाचा अभ्यास व अनुभव आंबेडकरवाद्यांना जास्त आहे. आंबेडकरी विचारवंत केवळ एट्रोसिटी व समाजकल्याण विभाग यापुर्ती सीमित नाहीत. त्यामुळे पुरोगाम्यांनी आंबेडकरी नेत्यांना व विचारवंतांना त्यासाठी पाचारण करावे. यासाठी त्यांनी श्रीधर टिळकांचा आदर्श घ्यावा.


या पुरोगामी / बुद्धीजीवी मंडळीने श्रीधर टिळकांच्या प्रमाणे SSD स्थापन करावी. नुसते भाषण न देता कृतीतून रिपब्लिकन, वंचित सारख्या पक्षात प्रवेश करावा. धर्मांतर करून बौद्ध व्हावे. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन, पाठिंबा द्यावा. बाबासाहेब स्वीकारताना संविधानिक बाबासाहेब, राजकीय बाबासाहेब व धार्मिक बाबासाहेब असे वेगवेगळे व सोईस्कर बाबासाहेब न स्वीकारता समग्र बाबासाहेब स्वीकारावेत. भाषणात बाबासाहेबानी १९५६ धम्मक्रांती केली सांगायची आणि व्यक्तिगत जीवनात अंगीकार नाही करायचा. हा मुखवटेबाजपणा नव्हे काय? बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, लोकशाही सामाजिक समतेशिवाय चालू शकत नाही.


स्कॉलरशिप, आरक्षण, एट्रोसिटी, बैकलॉग भरणा, जल-जमीन-जंगल समान वाटप, झोपडपट्टी बचाव यासाठी मोर्चात यावे. मोर्चात येऊन, नेते न बनता. कार्यकर्ता बनावे. शाहू महाराजांकडून हे गुण त्यांनी शिकावेत. 

पुरोगामी व प्रतिगामी अशा दोन्ही छावण्यात नेतृत्व उच्चवर्णीय असेल तर झाले कल्याण. त्यामुळे आंबेडकरवादी चळवळीने खोट्या पुरोगामी, बुद्धिजीवी लोकांपासून अंतर ठेवावे, यामागे काही मूलभूत वैचारिक आणि व्यावहारिक कारणे देखील आहेत. 


वैचारिक भिन्नता:

आंबेडकरवादी चळवळ ही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित आहे, जी प्रामुख्याने जातीव्यवस्थेच्या विरोधात आणि शोषित-वंचित समाजाच्या उत्थानासाठी लढते. पुरोगामी विचारसरणी, जरी ती सामाजिक बदल आणि समानतेची भाषा बोलत असली, तरी बऱ्याचदा ती उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय दृष्टिकोनातून येते. यामुळे ती जातीच्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने समजून घेण्यात किंवा त्यावर ठोस उपाययोजना करण्यात कमी पडते. बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता, कारण ती प्रत्यक्षात जातीच्या मुद्द्यांना टाळते किंवा त्यांचे गांभीर्य कमी करते.


त्यांचे लक्ष प्रामुख्याने आर्थिक विषमता, धर्मनिरपेक्षता किंवा इतर व्यापक मुद्द्यांवर असते. याउलट, आंबेडकरवादी चळवळीचा मुख्य केंद्रबिंदू आहे जातीचा प्रश्न आणि त्यामुळे होणारा सामाजिक भेदभाव आहे. 


सांस्कृतिक आणि ऐतिहासिक फरक:

पुरोगामी विचारसरणी बऱ्याचदा हिंदू धर्मातील सुधारणांवर आधारित असते, ज्यामध्ये हिंदू संस्कृती आणि परंपरांचा स्वीकार काही प्रमाणात असतो. याउलट, आंबेडकरांनी हिंदू धर्मातील जातीव्यवस्था आणि त्याच्या मूळ संरचनेला नाकारले आणि बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे आंबेडकरवादी चळवळ हिंदू संस्कृतीच्या सुधारणांपेक्षा संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनावर भर देते. पुरोगामी लोकांचा हिंदू संस्कृतीशी असलेला संबंध आंबेडकरवादी चळवळीच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत आहे. 


राजकीय स्वार्थ आणि वापर:

बऱ्याचदा पुरोगामी गट किंवा राजकीय पक्ष आंबेडकरवादी चळवळीचा वापर आपल्या राजकीय फायद्यासाठी करतात, पण दलित आणि शोषित समाजाच्या खऱ्या समस्यांना प्राधान्य देत नाहीत. उदाहरणार्थ, काही राजकीय पक्ष आंबेडकरांचे नाव घेतात, पण त्यांच्या विचारांचा खरा अंमल करताना दिसत नाहीत. अन्याय अत्याचाराच्या शेकडो घटना या काळात घडल्या आहेत. त्यावेळी पुरोगामी भाषणबाज लोक मुग गिळतात.  न्याय मिळत नाही. खैरलांजी, सोनाई, शिर्डी, जवखेडा, नितीन आगे, लातूर, बुलढाणा शेकडो प्रकरणात न्याय नाही. ७००० प्रकरण प्रलंबित आहेत. याउप्पर बावडा, वरळी दंगल, बीडीडी चाळ, नामांतर, पँथरवर केसेस, हिंदू कोड बील प्रकरण असे अनेक ठळक हल्ले झालेत ज्यात वेळेवर न्याय नाही.

मंडल कमिशन असेल,आरक्षणचा बॅकलॉक असेल, शिष्यवृत्ती कपात असे अनेक विषय आहेत. ज्यांत  न्यायसंगत भूमिका नाही किंवा अनुल्लेखाने मारण्याचे प्रकार आहेत. 

 

पुरोगामी राजकीयसत्ता बदलाची भाषा व अवाहन करत असतात. परंतु सत्ता असताना ते अपेक्षित कार्य करत नाहीत. राजकीय सत्ताबदल हे कागदोपत्री होत असतात. त्याउप्पर सांस्कृतिक सत्ताबदल हा मोठा, स्थायी व करण्यास अवघड असतो. पुरोगामी प्रतिगाम्यांसोबत साटेलोटे असल्यासारखे उगी मलमपट्टी करत बसतात. समग्र परिवर्तन करण्यासाठी व खरा सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय बदल करण्याची प्रामाणिक धमक दाखवत नाही.


स्वायत्ततेची गरज:

अल्पसंख्यांकांना जगभरात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वायत्ततेची गरज लागते.

आंबेडकरवादी चळवळीने आपली स्वायत्तता आणि स्वतंत्र ओळख कायम ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून ती आपल्या ध्येयापासून विचलित होणार नाही. पुरोगामी गटांशी खूप जवळीक ठेवल्यास चळवळीचे मूळ उद्दिष्ट, म्हणजे दलित आणि शोषित समाजाचे सक्षमीकरण, धोक्यात येऊ शकते. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनसारख्या स्वतंत्र संस्था स्थापन करून ही स्वायत्तता दाखवली होती.